मुंबई : आपल्या कौशल्यपूर्ण खेळीने भारतीय क्रिकेट संघासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने सोमवारी आपल्या राज्यासाठीही एक अनोखे योगदान दिले. मातृभूमीप्रती सहृदयता आणि जाणिवेचे दर्शन घडविताना अजिंक्यने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली. याशिवाय लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळानेही दुष्काळग्रस्तांसाठी 25 लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरत आहेत. त्यामुळे या योजनेसाठी सामाजिक उत्तरदायित्त्वाच्या भावनेने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. या आवाहनाला सोमवारी अनोखा प्रतिसाद मिळाला. भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळणारा महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य रहाणे याने सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे स्वयंस्फूर्तीने पाच लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या भेटीत अजिंक्यने दुष्काळग्रस्तांबाबत आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. श्रीलंका दौऱ्यानिमित्ताने महाराष्ट्राबाहेर असलो तरी राज्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती वाचून अस्वस्थ होत होतो. सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेने राज्यातील बांधवांना मदत केली पाहिजे, या जाणिवेने मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी अजिंक्यने सांगितले.
या मदतीबाबत आभार मानताना मुख्यमंत्री म्हणाले, अजिंक्यची मदत अतिशय मोलाची असून समाजाला विधायकतेची प्रेरणा देणारी आहे. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी सरकारच्या सामाजिक उपक्रमात अशा पद्धतीने सहयोग दिल्यास समाजासमोर सकारात्मकतेचा आदर्श उभा राहू शकेल. तसेच ही कृती आपद्ग्रस्तांना मोठा दिलासा देण्यासह भावनिक आधार निर्माण करणारी आहे. याच पद्धतीने समाजातील इतर प्रमुख व समर्थ घटकांनी मदतीचा हात पुढे केल्यास राज्यासमोरील संकटाचे निवारण अधिक वेगाने होऊ शकेल, असेही ते म्हणाले.