पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने आज राज्यभरात विविध ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आले आज मोठ्या उत्साहाने जोरदारपणे हे आंदोलन झाले पण आता पुढे … ? असा प्रश्न उरतोच आहे .
आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जालना-वडीगोद्रि महामार्गावर जेलभरो आंदोलनाचे नेतृत्व पुण्यातील खा. सुप्रिया सुळे यांनी केले . दुष्काळी परिस्थितीकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी मराठवाड्यात हे आंदोलन केले .
नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कलामंदिर येथे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाळी रास्ता रोको आंदोलन व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष डॉ. सुनिल कदम, जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर, कार्याध्यक्ष दत्ता पवार आणि सभापती सविता कंठेवाड यांनी सहभाग घेतला होता. नांदेडमधील लोहा-कंधार मतदारसंघातील दहा हजाराहून अधिक शेतकरी आंदोलकांना तसेच आ. शंकरअण्णा धोंडगे यांना अटक करण्यात आली. तसेच लोहामधीलच सोनखेड गावी जि.प. उपाध्यक्ष आणि कृषी सभापती दिलीप धोंडगे यांच्या नेतृत्वाखालीही रास्ता रोको, जेलभरो आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक, बीड येथे जेलभरो आंदोलन झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, सय्यद सलीम, उषा दराडे आणि सुभाष राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाळी रा.म. २११ येथे उमापूर फाट्याजवळ हजारो शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह आंदोलन केले. जि.प. सभापती विजयसिंह पंडित यांनाही भेंड टाकळी फाटा येथे हजारो कार्यकर्त्यांसहीत स्वतःला अटक करून घेतली. आष्टी तालुक्यातील खडकत चौकामध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तसेच शिरूर कासार तालुक्यात मेहबुब शेख यांनी आंदोल केले
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मुनिर पटेल आणि तालुकाध्यक्ष संजय दराडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते आज महामार्गावर जेलभरो आंदोलन करत होते. तब्बल पाच तास तीनही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. मधल्या काळात थोडा पाऊस झाला तरी कार्यकर्ते अटक झाल्याशिवाय मार्गावरून हटले नाहीत. दरम्यान शशिकांत शिंदेंसह सर्व कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले.
परभणी जिल्ह्यातील विसावा फाटा येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सरचिटणीस उमेश पाटील यांनी बैलगाडीवर स्वार होऊन जेलभरो आंदोलनाचे नेतृत्व केले. धनंजय मुंडे यांनी स्वतः रस्त्यावर बसून दिशाहीन सरकारविरोधी घोषणाबाजी केली. यामुळे जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आणि सरकारविरोधी प्रचंड अंसतोष एकाच वेळी पाहायला मिळत होता. यावेळी प्रताप देशमुख, स्वराजसिंह परिहार आणि प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभेचे माजी अध्यक्षदिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाड गावातील जालना-औरंगाबाद मार्गावर आंदोलन करण्यात आले
पाच हजार माणसे, शेकडो बैलगाड्या आणि जनावरे घेऊन आंदोलन सुरू झाले . सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनाला उत्तरोत्तर प्रतिसाद वाढत गेला . मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पांडुरंग तागंडे, पुंडलिक आंभोरे, अभिजीत देशमुख, माजी आमदार किशोर पाटील आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते .