चित्रपट २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार
” काही वर्षापूर्वी मराठवाड्यातील ‘किल्लारी’ भागात झालेल्या भीषण भूकंपाने लाखो घरे उद्ध्वस्त झाली आणि हजारो जणांचे बळी गेले. त्या भयाण वास्तवतेचे भीषण पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. भूकंपानंतर भोगाव्या लागणाऱ्या या भीषण मानसिक पडसादाचे चित्रण ‘ ३:५६ किल्लारी’ या नव्या चित्रपटात करण्यात आले असे प्रसिध्द अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. किल्लारीमधील भूकंपावर आधारित ‘३:५६ किल्लारी’ हा चित्रपट येत्या २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या प्रसंगी या चित्रपटाचे निर्माते गिरीश साठे, दिग्दर्शक दीपक भागवत, वेशभूषा तज्ज्ञ चैत्राली डोंगरे आदी उपस्थित होते. या चित्रपटात बालकलाकार गौरी इंगवले हिची मध्यवर्ती भूमिका असून सई ताम्हणकर बरोबरच बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेते जैकी श्रॉफ तसेच ज्येष्ठ मराठी अभिनेते श्रीकांत मोघे, अनुराग शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाचे निर्माते गिरीश साठे या वेळी म्हणाले की, हा चित्रपट बनवताना कोणती ही तडजोड केली नाही. चित्रपट चांगला बनवण्यासाठी कलाकारांकडून खूप मोलाची साथ मिळाली. विषेता म्हणजे जैकी श्रॉफ यांनी मला खूप सहकार्य केले. या चित्रपटातील ‘फादर’च्या भूमिकेसाठी अभिनेते जैकी श्रॉफ हेच योग्य होते म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनीही लगेच या भूमिकेला संमती दिली. शुटींगच्या आगोदरच आमचे खूप छान मैत्रीचे संबध जुळले होते.
या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली की, माझी भूमिका एका शिक्षिकेची असून ती केवळ शिक्षिका नाही तर एक फिलौसौफर आणि उत्तम मार्गदर्शिका आहे. ही भूमिका तशी नॉन ग्लैमरस असली तरी फार वेगळी आहे असेही तिने सांगितले. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते जैकी श्रॉफबरोबर दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळाली असे सांगताना सई म्हणाली, जैकी श्रॉफ हे अतिशय मोठे कलावंत असून त्यांच्याबरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळाले त्यामुळे माझा अभिनय समृद्ध होण्यास मदतच झाली.
या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक भागवत म्हणाले, या चित्रपटात भुकंपापलीकडच्या काही गोष्टी दाखविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्यासाठी भूकंपानंतर झालेल्या तेथील जनतेच्या मानसिक परिवर्तनाचा खूप अभ्यास केला आहे. भूकंपानंतर एका मुलीच्या मानसिकतेत कसा बदल होत गेला त्याचेच चित्रण या चित्रपटात पहावयास मिळणार आहे. या चित्रपटाला महेश-चिनार यांनी संगीत दिले असून चंद्रशेखर सानेकर यांनी लिहिलेली गीते गायक हरिहरन आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायली आहेत.
‘डीजीएस एन्टरटेन्मेंट’ ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा-पटकथा दीपक भागवत यांनीच लिहिली असून विजय मिश्रा यांनी छायांकन केले आहे. तसेच विजय मिश्रा यांनी दिग्दर्शनातही सहाय्य केले आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांनी केले असून संकलन जयंत जठार यांचे तर वेशभूषा चैत्राली डोंगरे यांनी केली.
हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२५ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा आमचा मानस असून येत्या २१ ऑगस्ट रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे असे चित्रपटाचे निर्माते गिरीश साठे यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.