एखाद्या व्यक्तीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवणे सोपे नसते. मात्र काळासोबत जोडीदारात होणारे बदल सांभाळून, हे बदल स्वीकारून जोडीदाराची साथ देणारे प्रेमाची खरी परिभाषा सांगतात. एकमेकांना दिलेल वचन पूर्ण करण्यासाठी ते जोडीदार बांधील असतात. याच विचारावर आधारित एक उत्कृष्ट कथा झी युवा आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. दिनांक २९ जानेवारी आणि ३० जानेवारी ला रात्री ९:३० वाजता अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची संधी गुलमोहर या मालिकेतील पुढील कथा ‘वचन ‘ द्वारे झी युवा आपल्या प्रेक्षकांना देत आहे. मराठी हिंदी मनोरंजन सृष्टीतील दोन दिग्गज नावे विक्रम गोखले आणि सुहास जोशी या कथेत मुख्य भूमिका साकारत आहेत.
आपल्या ओळखीत अशी अनेक जोडपी असतात जी एकमेकांच्या साथीने वर्षोनुवर्षे प्रेमाचा संसार करतात.आयुष्यातील चढ उतारातही त्यांचे एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास एवढे दृढ असते की त्यांना इतर कोणाचीच गरज भासत नाही. गुलमोहर या मालिकेत पुढील येणारी ‘वचन’ कथा अशाच एका वृद्ध प्रेमळ जोडप्याने एकमेकांना दिलेल्या वचनाची आहे. गोदावरी आणि चिंतामणरावांनी स्वतःला मुलं नसण्याची खंत कधीच बाळगली नाही, अनेक अनाथ मुलांना मायेचं छप्पर देऊन त्यांना आपलंसं केलं. या कथेत गोदावरी आणि चिंतामणरावांनी वयाचा साठावा वाढदिवस साजरा करताना, आयुष्यातील अनेक घडामोडींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शरीराने वृद्ध पण मनाने युवा असलेल्या या जोडप्यातील दृढ नाते, प्रेम , विश्वास किती कणखर आहे याचा प्रत्यय क्षणोक्षणी आपल्याला अनुभवायला मिळेल . आणि एवढ्या सर्व आठवणीं जागवल्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुढे घडणारे प्रसंग तेवढेच अनपेक्षित आहेत. ‘वचन’ ही कथा आहे एका जोडप्याच्या प्रेमाची, आठवणींची, त्यांच्यातील घट्ट नात्याची आणि या नात्यावर येणाऱ्या संकटाची. झी युवावरील ही कथा आपल्याला निशब्द करून सोडेल यात काहीच शंका नाही.
विक्रम गोखले या मालिकेबद्दल बोलताना म्हणाले ” महिनोंमहिने चालणाऱ्या मालिका करण्यापेक्षा केवळ दोन दिवस दाखवली जाणारी एक उत्तम कथा करणे कधीही चांगल असतं. झी युवावरील ‘गुलमोहर’या मालिकेतील ‘वचन’ही कथा केवळ यासाठीच मी निवडली. या कथेत मी सुहास जोशीं सारख्या एक उत्तम अभिनेत्री बरोबर काम करीत आहे. गेली ३५ वर्षे आम्ही कलावंत म्हणून या मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत. आम्हाला एकमेकांबरोबर अभिनय करावा लागतंच नाही कारण एकमेकांचे कलाकार म्हणून जडलेले नाते आमच्याकडून काम करून घेते. ही कथा करताना मुख्य गोष्ट ही जाणवली की मंदार जोग सारख्या एका चांगल्या लेखकाने लिहिलेली उत्तम कथा, मंदार देवस्थळी सारखा उत्तम दिग्दर्शक आणखीन खुलवतो. मंदार देवस्थळी हा माझा चांगला तरुण मित्र असून तो एक ‘थिंकर दिग्दर्शक’ आहे. त्याला नीट माहित आहे की प्रेक्षकांना काय हवे आहे आणि त्यासाठी त्याला नक्की काय करायचे आहे. एका उत्तम टीम बरोबर काम करताना काम केल्याचे समाधान नक्कीच जाणवते. गुलमोहरमधील ‘वचन’या कथेत दाखवले गेलेले प्रेम एका वेगळ्या दर्जाचे आहे. सध्या सगळ्याच गोष्टी इतक्या इन्स्टंट झाल्या आहेत की, शुक्रवारी लोक प्रेम करतात, शनिवारी लग्न करतात , रविवारी मधुचंद्राला जातात आणि सोमवारी त्यांच्यात घटस्फोट होतो . अशा समाजात, आमच्या कथेत दाखवले गेलेले प्रेम बरंच काही सांगून जाईल आणि तुम्हालाही आत्मपरीक्षण करायला लावेल.