पुणे- नाटक आणि चित्रपट यांत नेमका काय फरक आहे, या दोन्हीच्या निर्मितीमधील दिग्दर्शक, संगीतकार, अभिनेते या सगळ्यांच्या भूमिका काय असतात, याची जाणीव मुलांच्या मनामध्ये आपण निर्माण करुन दिली पाहेजे. चित्रपट म्हणजे केवळ दृश्यचित्र किंवा हालचाल ही नाही,तर चित्रपट पाहिल्यानंतर कोणतीही विशेषणे न वापरता मुलांशी पालकांनी चर्चा केली पाहिजे. या चित्रटपटातली कुठली फ्रेम तुला आवडली, कुठला संवाद आवडला, कुठले पाश्वसंगीत आवडले, हे सर्व नसते तर काय झाले असते असे प्रश्न मुलांसमोर ठेवा असे सांगत बालसाहित्यीक राजीव तांबे यांनी पालकांसह मुलांना चित्रपट रसस्वादाचे धडे दिले.
निमित्त होते संवाद पुणे आणि कावरे आयस्क्रिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल चित्रपट महोत्सावाचे. नारायण पेठेतील विजय टॉकीज येथे आयोजित बाल चित्रपट महोत्सावाचे यंदा या 22 वे वर्ष असून त्याचे आैपचारिक उद्घाटन बालसाहित्यीक राजीव तांबे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महांडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, कावरे आयस्क्रिमचे संचालक राजूशेठ कावरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महांडळाच्या संचालिका निकीता मोघे, व्यवस्थापक नारायण मोकाशी, अरूण शेवते आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रपट महोत्सावाच्या उद्घाटनानंतर बच्चे कंपनीने बालशिवाजी या चित्रपटाचा आस्वाद घेतला. या महोत्सावात उद्या दिनांक 15 रोजी चार्ली चॅपलिन हा इंग्रजी चित्रपट हिंदी सबटायटलसह दाखविण्यात येणार आहे. तर दिनांक 16 रोजी श्यामची आई हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. रोज सकाऴी 10.30 वाजता मुलांना या चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.
यावेळी बोलताना राजीव तांबे म्हणाले की, मुलांना चांगला पर्याय उपलब्ध नसल्याने मुले नको ती कार्टूर्नस पाहतात. याबाबत आपण मुलांना दोष देऊ शकत नाही. त्यांना अस्सल काय आहे हे सांगण्यासाठी असे चित्रपट दाखवले पाहिजे. त्याच्यावर गप्पा मारल्या पाहिजेत, या माध्यमाचे वेगळे पण काय आहे हे इतरांवर टिका न करता सांगितले पाहेज. मुलांची शोध घेण्याची प्रवृत्ती वाढवली पाहिजे,त्यास खतपाणी घातले पाहिजे. अशा चित्रपट महोत्सावांच्या माध्यमातून त्यांची चांगली अभिरुची विकसीत झाली तर मुले असे दर्जेदार चित्रपट पाहण्यासाठी हट्ट करतील. खरे तर महिन्यातील किमान दोन रविवार ठरवून मुलांना असे चांगले चित्रपट दाखवले पाहिजे. मराठी चित्रपटांपासून सुरु करुन आंतरराष्ट्रीय स्तरवारील चांगले चित्रपट आपण त्यांना दाखविले पाहिजे. या मर्यादा हळुहळु अोलांडल्या तर त्याला व्यापक स्वरूप प्राप्त होईल. मराठी चित्रपट, भारतातले ग्रेट चित्रपट आणि जागतीक पातळीवरील चित्रपट या तीन स्तरावर काम झाले पाहिजे. अश्या पद्धतीने काम झाले तर मुले मॅड बाॅक्स समोर बसणार नाहीत. आपणच मुलांपर्यंत चांगले चित्रपट घेऊन जायला कमी पडतो. हा पालक म्हणुन आपलाच पराभव आहे. येथे आपणच नव्याने कंबर कसून सुरवात करायला पाहिजे. हा बालचित्रपट महोत्सव त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे,असे म्हटल्यास अतिषोक्ती होणार नाही.
या बाल चित्रपट महोत्सावाच्या आयोजनाची संकल्पना संवाद, पुणेचे सुनील महाजन यांची असून यावेळी बोलताना सुनील महाजन म्हणाले की, मुले दरवर्षी आतुरतेने या चित्रपट महोत्सवाची वाट पहात असतात. चांगले चित्रपट मुलांपर्यंत पोहचावे, हा या चित्रपट महोत्सावाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. चित्रपट हे एक प्रभावी माध्यम असून त्याद्वारे संस्कार करण्याचा हा प्रयत्न आहे. पालकांचा उत्तम प्रतिसाद मिऴतो. पालक आवर्जुन मुलांना हे चित्रपट दाखविण्यासाठी घेऊन येतात. ही एक परंपरा असून दरवर्षी साहित्य, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आवर्जुन या चित्रपट महोत्सावाला भेट देतात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या एकलव्य या सामाजिक संस्थेतील 50 मुलांना आजचा चित्रपट मोफत दाखविण्यात येत आहे. दरवर्षी दिव्यांग, अनाथ किंवा उपेक्षित मुलांना मोफत चित्रपट दाखविले जातात. चित्रपट बघायला येणाऱ्या मुलांना मोफत कावरे आइस्क्रिम देण्यातआले.