कर्वेनगर चौक,कर्वे शिक्षण संस्था,पाणंद रास्ता व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक समस्येची उपायुक्त डॉ प्रवीण मुंडे यांच्याकडून पाहणी
पुणे-कर्वेनगर चौकातील रेंगाळलेले उड्डाण पुलाचे काम आणि एकूणच या परिसरातील विविध प्रश्नांमुळे येथील वाहतूक समस्या गंभीर झाली असून वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना नागरिकांची दमछाक होत आहे.येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलीस उपयुक्त डॉ प्रवीण मुंडे यांनी स्वतः पाहणी करून योग्य निर्णय घ्यावा व परिसरातील दहा हजाराहून अधिक विद्यार्थिनींना दिलासा द्यावा अशी विनंती भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी त्यांना केली असता आज सकाळी डॉ मुंडे यांनी या परिसराला भेट दिली व नागरिकांची मते जाणून घेऊन उपयुक्त सूचना केल्या.भर पावसात पाहणी करताना डॉ मुंडे यांनी काही बाबींमध्ये त्वरित कार्यवाही चे आदेश देऊन आपल्या कार्याची चुणूक दाखवली.या वेळी शिक्षण मंडळ सदस्य सौ मंजुश्री खर्डेकर,विभीषण मुंडे,नंदकुमार घाटे,दत्ताजी देशमुख,दीपक राव,मयूर आटाळे,ह्रिषीकेश साळी,जगदीश डिंगरे,कर्वे शिक्षण संस्थेचे उपसचिव मुकुंद जोशी,संचालक किरण बराटे,श्रीपाद कुलकर्णी,पोलीस निरीक्षक महेश सरतापे,पोलीस निरीक्षक पंढरकर व अनेक नागरिक उपस्थित होते.यावेळी त्वरित उपाययोजनेचा भाग म्हणून खालील निर्णय घेण्यात आले
1) कर्वेनगर चौक ते राजाराम पुलापर्यंतचा पाणंद रस्ता हा डी पी मध्ये 20 मीटर प्रस्तावित असून तो कुठल्याही परिस्थितीत कमी केला जाऊ नये अशी आग्रही भूमिका शिवराम मेंगडे यांनी मांडली.यावर वाहतूक पोलीस उपायुक्त म्हणून आपण हि तसे पत्र शासनास पाठवू असे डॉ मुंडे यांनी स्पष्ट केले.
2) विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कर्वे शिक्षण संस्था ते कर्वेनगर कॅनॉल चौकापर्यंत रस्त्यावर सिंगल बॅरिकेड लावणे,तसेच शाळा महाविद्यालये सुटताना गेटवर वाहतूक नियमन करण्यासाठी ट्रॅफिक वार्डन नेमणे,विद्यार्थिनींनी आखून दिलेल्या पट्ट्यातून चालणे,पथारीवाले व भाजी विक्रेत्यांना हि आखून दिलेल्या पट्टयाबाहेर विक्री करण्यास वा सामान ठेवण्यास प्रतिबंध करणे या उपाययोजनांचा समावेश आहे.
3) पाणंद रस्त्यावर शिक्षण संस्था,सुवर्णरत्नं गार्डन येथे स्पीडब्रेकर उभारणे तसेच तेथे सम विषम पार्किंग करणे.
4) डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील सर्कल ची पुनर्बांधणी करणे व सध्याच्या जागेपासून सरकवणे तसेच तेथील पदपथ कमी करणे व रोड डिव्हायडर ला सलग ठेऊन त्यातून छेद न देणे अश्या उपाययोजनांचा समावेश आहे
5) उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यावर वाहतुकीसंदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे तसेच वनदेवी चौकातील सिग्नल सुरु करण्याबाबत ही सकारात्मक चर्चा झाली.
या उपाययोजनांबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियम पालनाबाबत जनजागृती अभियान घेण्यात येईल व त्यामाध्यमातून वाहतूक समस्येबाबत नागरिकांचे कर्तव्य व त्यांनी घ्यावयाची काळजी यावर भर देणार असल्याचे ही डॉ मुंडे यांनी स्पष्ट केले.
येत्या पंधरवड्यात या सर्व बाबींच्या पूर्ततेकडे लक्ष देऊन पाठपुरावा करून त्या पूर्ण करून घेतल्या जातील असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.