पुणे : मराठी साहित्य संमेलनाने राज्याच्या आणि देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. विदेशातील मराठी साहित्य संमेलन यशस्वी होत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी भाषा ज्ञान भाषेबरोबरच ती वैश्विक भाषा व्हावी म्हणून मराठी सारस्वतांनी काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषणहोण्यापूर्वीच मुख्यमंत्री आपणास पूर्वनियोजित कार्यक्रमाला जायचे असल्याचे सांगून निघून गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय चर्चेला येथे उधाण आले .
पिंपरी-चिंचवड येथील 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ गीतकार, कवी गुलजार, साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार सर्वश्री रामदास आठवले, शिवाजीराव आढळराव-पाटील, अमर साबळे, आमदार सर्वश्री श्रीरंग बारणे, लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, साहित्य संमेलनास एक खास पावित्र्य असते, अशी साहित्य संमेलने साहित्याला नवी दिशा दाखविणारे, नवीन विचार देणारे असतात. या व्यासपीठावरुन नवे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. साहित्य संमेलन हे साहित्याच्या व्यवहारासाठी झाले पाहिजे, साहित्यिकांनी साहित्यावर वाद-विवाद केला पाहिजे, साहित्यिकांनी साहित्यबाह्य वादापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांना पंढरीच्या वारीसारखे असते. या संमेलनात साहित्यिकांची स्वागत अध्यक्षांनी चांगली सोय केली आहे. या संमेलनास त्यामुळे भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. आपण जसे साहित्य संमेलन भरविण्यात यशस्वी झालो आहोत तसेच संमेलनातील विचार मंथनातून आपण किती लोकांच्या डोक्यात विचारांची बिजं रुजवतो, साहित्याचा ठसा उमटवितो यादृष्टीने विचार होण्याची गरज आहे.
मराठी भाषा ही जागतिक भाषा होण्याची गरज आहे. मराठी भाषेतील साहित्य जागतिक भाषांमध्ये जाण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात मराठी भाषेतील ग्रथांचे आणि साहित्याचे इतर जागतिक भाषात भाषांतर होत नाही, तोपर्यंत मराठी भाषेला वैश्विक स्वरुप प्राप्त होणार नाही. मराठी ही जशी वैश्विक भाषा व्हावी तशीच ती जागतिक ज्ञान भाषाही झाली पाहिजे. ही भाषा नव्या पिढीच्या संवादाची आणि नव्या सामाजिक माध्यमांचीही भाषा झाली पाहिजे. मराठी ही देशातील 10 ते 12 कोटी लोकांची भाषा आहे. म्हणजेच हे साहित्य संमेलन 10 ते 12 कोटी लोकांचे संमेलन आहे. महाराष्ट्रात वेगवेगळी साहित्य संमेलने होत असतात. यात जातीय, धार्मिक, विविध भाषिक, विभागीय अशा विविध संमेलनाचा समावेश असतो. परंतु हे सर्व मराठी भाषिकांचे एकमेव साहित्य संमेलन आहे. एवढे भव्य आणि मोठे साहित्य संमेलन अन्य कोणत्याही भाषेत होत नाही, असे गौरोद्गार मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी काढले.
साहित्यिकांनी नकारात्मक प्रसिद्धीपासून दूर राहून सकारात्मकतेचा प्रचार केला पाहिजे. सकारात्मक अभिव्यक्तीला प्राधान्य दिले पाहिजे. कारण सकारात्मकतेतून समाजाला ऊर्जा मिळत असते. हल्ली नकारात्मक प्रचारातूनही प्रसिद्धी मिळविण्याचे फॅड निर्माण झाले आहे. माध्यमेही अशा बाबींना प्रसिद्धी देत असतात. हे थांबविण्याची गरज व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले की, आमची संस्कती ही सहिष्णुतेची संस्कृती आहे. अंतिम सत्याकडे जाण्याचे मार्ग जरी वेगळे असले तरी हेतू आणि ध्येय एकच असतील तर दोन प्रवाहातील संघर्ष टाळले पाहिजेत.
शरद पवार म्हणाले की,साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीत माझा हात होता अशी अफवा पसरली होती. महाराष्ट्रात काहीही झाले तरी माझा त्यात हात होता असे सांगण्याची पद्धत आता रुढ झाली आहे. लातूर किंवा कोयनेत भूकंप झाला तरी माझे नाव घेतले जाईल की काय अशी परिस्थिती आहे. सबनिस यांची निवड झाल्यानंतर मी आयुष्यात पहिल्यांदा त्यांना भेटलो. त्यामुळे या केवळ चर्चाच होत्या. पण अशा प्रकारच्या चर्चा बंद करायच्या असतील तर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अधिक बळकट करावी लागेल, असे मत माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.हे संमेलन आगळं-वेगळं आहे, या संमेलनात अनेक विक्रम होतील. यात ग्रंथ विक्रीचे, इतर भाषेतील साहित्यिकांच्या उपस्थितीचे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सत्काराचा, गुलजार यांना ऐकण्याच्या मेजवानीचाही विक्रम येथे होत आहे. दर्जेदार कार्यक्रमाच्या नियोजनाबरोबरच दर्जेदार साहित्यिक संवादही येथे होईल, असा विश्वास व्यक्त केला.
हा सोहळा साहित्याचा, शब्दांचा, साहित्य निर्माण करणाऱ्या मनांचा सोहळा आहे. आज मराठीत अनेक तरुण दर्जेदार आणि जोरकस साहित्य लिहीत आहेत. साहित्यातील विविध प्रवाहामुळे मराठी साहित्य समृद्ध होत आहे. परंतु साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत मात्र नव्याने विचार करण्याची गरज आहे. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची समिती निर्माण करुन त्या समितीमार्फत अध्यक्ष निवडण्याची पद्धत सुरु करावी, अशी भावनाही श्री. पवार यांनी व्यक्त केली.
स्वागत गीत आणि दीपप्रज्ज्वलनाने संमेलनाची सुरुवात झाली. महाराष्ट्र साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पी. डी. पाटील यांनी स्वागतपर भाषणात साहित्याचा, संमेलनाच्या आयोजनामागच्या हेतूचा धांडोळा घेतला.
यावेळी पालकमंत्री श्री. बापट, श्रीमती धराडे, गुलजार यांच्या भाषणासह 89 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण झाले. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचेही भाषण झाले. यावेळी त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. सबनीस यांच्याकडे सुपुर्द केली.
यावेळी स्वागत ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. पवार यांच्या हस्ते झाले. विविध भाषेतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक सत्यव्रत शास्त्री, रेहमान राही, सिताकांत महापात्रा, प्रतिभा रॉय यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रकाशक येशू पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.