पुणे –
मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी माध्यमांवर आहे. पण ही माध्यमे जबाबदारी वागताना दिसत नाहीत. लोकशाहीचा चौथा स्तंभ नसून प्रसिद्धीमाध्यमे ही लोकशाहीच्या तिरडीची दांडी आहे, असे लोकांना वाटू नये, यासाठी पत्रकारांनीही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, मी कुणाचाही शत्रू नाही, पण सत्याचा पुजारी आहे. संपादक-पत्रकारांच्या लेखण्या भांडवलशाहीकडे गहाण पडणे, हा तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा सर्वात मोठा पराभव आहे.असे मत 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांबद्दल सहवेदना व्यक्त करत नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम.एम.कलबुर्गी यांना आदरांजली वाहून सबनीस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला प्रारंभ केला. यावेळी त्यांनी नथुराम गोडसेसारख्या प्रवृत्तीच्या सनातनी मारेकऱ्यांचाही निषेध केला. ते म्हणाले, “संतांच्या जातीनिहाय वाटणीमुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. आज जात संपलेला विद्वानच चांगले लिहू शकतो. सगळेच ब्राह्मण नथुराम गोडसे असतात का हा प्रश्न कधीतरी विचारला गेला पाहिजे. संत आणि सुधारक यांच्यात फूट पाडली जात असून साहित्य कुणा एकाची मक्तेदारी नाही. संतांना महापुरुषांना जातीत विभागणं ही शोकांतिका आहे.‘ तसेच “प्रस्थापित आणि विद्रोही यातील सीमारेषा ओलांडता आली पाहिजे. फडणवीस हे सत्तेचे तर सबनीस हे सत्याचे प्रतिनिधी. सत्य आणि सत्ता यात संघर्ष होऊ नये‘ असे म्हणत “माध्यमे सत्याचे खरे प्रतिबिंब मांडतात का?‘ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.मराठी वाङ्मयातील जाणकारांनी पत्रसृष्टीच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल सदैव ऋणी राहायला हवे. कारण पत्रकारांना वजा करुन मराठी वाङ्मयाची सांस्कृतिकता पूर्णांशाने हाती लागत नाही. जागतिकीकरणाच्या आधुनिक रेट्यात वृत्तपत्रीय मालकशाही, भांडवलशाहीच्या वळणावरुन संपादक-पत्रकारांना वागवू पाहतोय.शोषणमुक्त समाजाच्या स्वप्नांची लड काळजात घेऊन प्रत्येक शब्दात इमान पेरणा-या पत्रकारांचेच आर्थिक शोषण होत असेल तर लोकशाहीचा चारपैकी एक स्तंभ पोखरला जाईल. पाकीट संस्कृती प्रशासन, शिक्षणक्षेत्रांसह पत्रकारितेतील कलंकच म्हटली पाहिजे. मॅनेज होणारी लेखणी आणि विकले जाणारे इमान शब्दांचा डायरियाच म्हणायला हवा.पत्रकारांची सुरक्षितता म्हणजे 1/4 लोकशाही संरचनेची व प्रक्रियेची विधायक आश्वासकता होय. मी कुणाचाही शत्रू नाही, पण सत्याचा पुजारी आहे. संपादक-पत्रकारांच्या लेखण्या भांडवलशाहीकडे गहाण पडणे, हा तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा सर्वात मोठा पराभव आहे.असे त्यांनी नमूद केले