मुक्त विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळावा – सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील माजी विद्यार्थी संघ व ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. त्यात मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक आदी भागातील ७० विद्यार्थी सहभागी झाले. विद्यापीठातील यश इन सभागृहात झालेल्या या मेळाव्यास सुप्रसिद्ध लोककलावंत व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विद्यापीठ माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तसेच वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्यापीठ ललित कला केंद्राचे संचालक श्री. सचिन शिंदे, प्रा. दत्ता पाटील, विद्यापीठ माजी विद्यार्थी संघाचे सरचिटणीस डॉ. संतोष साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना सुप्रसिद्ध लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की नाटक हा नेहमीच समाजाचा आरसा राहिलेला आहे. समाजातील बऱ्या – वाईट घटना, घडामोडी यावर कधी नर्मविनोदी, कधी मार्मिक तर कधी परखडपणे तत्कालीन नाटकातून भाष्य करण्यात आलेले आहे. सामाजिक स्थित्यंतरे होत गेली तशी नाटकाने आपली कूस बदलली आहे. मात्र जेव्हा जेव्हा भारतीय नाट्य – रंगभूमीला मरगळ आलेली आहे तेव्हा भारतीय लोककलेने, लोकरंगभूमीने त्यास तारले आहे, सावरले आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत देखील लोककला व नाट्यरंग भूमीने आपले योगदान दिले असल्याचे प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सोदाहरण सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की प्रत्येकाच्या अंगी कलागुण – कौशल्य असते. त्यास संधी – प्रशिक्षण व पोषक वातावरण देण्याचे काम मुक्त विद्यापीठ करत आले आहे. विद्यार्थ्यांना केवळ प्रमाणपत्रे देणे हे विद्यापीठातील एखाद्या विभागाचे किंवा विद्याशाखेचे काम असू नये या विचाराने विद्यापीठाने स्वत:ची नाट्यनिर्मिती केली आहे, विद्यार्थी व समाज हिताचे अनेक उपक्रम राबवले विद्यापीठामार्फत राबवले जात आहेत. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांची व उपक्रमांची माहिती इतरांना देवून त्यांना विद्यापीठाशी जोडावे असे आवाहन मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले. आगामी काळात विद्यापीठ ललित कला केंद्राच्या माध्यमातून व विद्यार्थ्यांच्या सहभागातून नवीन कलाकृती विद्यापीठ विभागनिहाय सादर करण्याचे निश्चित करण्यात आले.
श्रीमती वीणा शिखरे, श्री. सुनील कुलकर्णी, श्रीमती वीणा यादव, श्री. वैभव बोराडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानिमित्ताने झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘नाटक: संहिता ते सादरीकरण’, ‘महाभारत – अंतर्मनाचा स्वर’ हे नाट्यअभिवाचन व ‘द्रौपदीचे मनोगत’ ही छोटी नाट्यअभिनयकृती सादर करण्यात आली. सूत्रसंचलन माजी विद्यार्थिनी श्रीमती सई मोने यांनी तर प्रास्ताविक डॉ. संतोष साबळे यांनी केले. श्री. सचिन शिंदे यांनी आभार मानले.

