पुणे- पुणे शहरात राहायला सर्वांनाच आवडते. हे शहर सुंदर असावे असे वाटते.मात्र, शहरात विकासाच्या नावाखाली विविध योजना आणून शहराची वाट लावण्याचे काम सुरु आहे अशी टीका सी.डी.एस.ए.च्या कार्यकारी संचालक आणि नगरविकास,विकासातील समतोलता आणि नगरनियोजन या क्षेत्रातील तज्ञ अनिता गोखले यांनी केली. पुरुषांच्या हातात इतक्या दिवस सत्ता दिली ते काही करू शकले नाहीत.त्यामुळे पुणे शहराचे गेलेले वैभव परत आणण्यासाठी महिलांना काम करावे लागेल असे आवाहनही अनिता गोखले यांनी केले.
शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवा त् त्या बोलत होत्या. अनिता गोखले यांना त्यांच्या कार्यातील योगदानाबद्दल तर जेष्ठ गायिका मालती पांडे यांची नात व गायिका प्रियांका बर्वे यांना ‘तेजस्विनी’ पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. स्मृती चिन्ह, अकरा हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रियांका बर्वे यांचा पुरस्कार त्यांच्या आई डॉ. सौ.बर्वे यांनी स्वीकारला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक माजी उपमहापौर,नगरसेवक आबा बागुल, अभिनेत्री श्वेता शिंदे, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, कोरिओग्राफर निकिता मोघे, डॉ. सौ.बर्वे, निर्माला जगताप, छाया कातुरे हे यावेळी उपस्थित होते.
अनिता गोखले म्हणाल्या, पुणे शहरात जमिनीचे व्यवहार होऊन त्यावर बांधकामे केली जात आहेत. ते करताना पुणे शहर व पर्यावरण गेले खड्यात हा ‘अॅटीट्युड’ सर्वत्र दिसतो. तो बदलण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता गृहामध्ये कुठलीही महिला जाऊ शकत नाही एवढी अस्वच्छता तिथे आहे. शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे झाली पाहिजेत ही मागणी महिलांनी करावी.
मुळा-मुठा नदीची गटारे झाली आहेत, त्याला आपण व पुणे महानगरपालिका जबादार आहोत. त्यासाठी एकत्र येऊन काहीतरी चांगली सुरुवात केली पाहिजे. नदीच्या कडेला, नदीपात्रात आपण कचरा टाकता कामा नये.तसेच नदीपात्रात प्रदुषणयुक्त पाणी सोडले जाते ते थांबवले पाहिजे. टेकड्यांवर पक्की बांधकामे झाली तर जन्मभर पाण्याचा प्रश्न निर्माण होईल याचा विचार कोणी करत नाही.
कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास अनेक लोक तयार नाहीत पण ते आपल्या भल्यासाठीच आहे. कचऱ्यामुळे रोगराई वाढत आहे. आज अनेक आजारांनी पुणे शहर त्रस्त आहे. आपल्या वागणुकीने पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे. त्यासाठी आपल्याला काम करावे लागेल असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.
श्वेता शिंदे यांनी पुणे नवरात्रौ महिला महोत्सावांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. आबा बागुल म्हणाले, समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो या भावनेतून मी व माझे सर्व कुटुंब काम करते. आईचे मूल्य कोणी करू शकत नाही. प्रत्येकाला आपली आई डोळ्यासमोर येईल असे ‘आई’ या संकल्पाने आधारित एक मंदिर आपण बांधत आहोत असे त्यांनी सांगितले.
जयश्री बागुल म्हणाल्या, महिला या संसारात आपल्या मुलाबाळांचे संगोपन करण्यात इतक्या गुरफटून गेलेल्या असतात की त्या स्वत:चे अस्तित्वच विसरतात. त्यामुळे महिलांसाठी काहीतरी करावे या विचारातून पुणे नवरात्रौ महिला महोत्सव हे व्यासपीठ त्यांच्यासाठी निर्माण झाले. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. अगदी वृध्द महिलाही तेवढ्याच उत्साहाने सहभागी होतात त्यामुळे जीवनात आलेले नैराश्य निघून जाते. डॉ.सौ.बर्वे यांनीही आपले मानोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी कलावार्धिनी ग्रुपच्या कलाकारांनी गणेश वंदना व देवी स्तुती सादर केली तर प्रसाद माळी डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी देवीचा गोंधळ सादर केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नम्रता जगताप यांनी तर आभार निर्मालाताई जगताप यांनी मानले.