पुणे : कलाकाराला कलेतून सदिच्छा देण्याच्या अनोख्या उद्देशाने, तालायन म्युझिक सर्कलतर्फे बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक पद्मभूषण पं. साजन मिश्रा यांच्या षष्ट्यब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे येत्या 15 ऑक्टोबरला सायंकाळी 5.30 वाजता हा ‘हर्षोत्सव’ सोहळा पार पडेल, अशी माहिती तालायनचे संस्थापक आणि प्रसिद्ध तबलावादक पं. अरविंदकुमार अाजाद यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी पं. राजन-साजन मिश्रा देखील उपस्थित होते.
सोहळ्याविषयी अधिक माहिती देताना आजाद म्हणाले की, कलाकाराला, कलाकारांमार्फत, कलेतून केलेले वंदन म्हणजे हा सोहळा होय. विदुषी गायिका डॉ. आश्विनी भिडे-देशपांडे आपल्या सुरेल गायकीने सोहळ्याची सुरुवात करतील. सुयोग कुंडलकर, प्रशांत पांडव, सोमनाथ मिश्रा आणि पं. अरविंदकुमार आजाद त्यांना साथसंगत करतील. त्यानंतर पं. साजन मिश्रा यांचा सत्कार सोहळा पार पडेल. या सोहळ्यास पं. साजन मिश्रा यांचे ज्येष्ठ बंधू राजन मिश्रा यांची देखील विशेष उपस्थिती लाभणार आहे. पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांच्या कथक प्रस्तुतीने कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध गायक रुपकुमार राठोड आणि सोनाली राठोड करतील. दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणारा हा हृद्य सोहळा रसिक पुणेकरांसाठी निश्चितच पर्वणी ठरेल.
याविषयी आपली भावना व्यक्त करताना पं. राजन मिश्रा म्हणाले की, पुण्याशी व रसिक पुणेकरांशी आमचे आपुलकीचे व ऋणानुबंधाचे नाते आहे. आजवर पुणेकरांनी आम्हाला भरभरून दिलेली दाद आणि साथ याचा आमच्या सांगतिक प्रवासात मोलाचा वाटा आहे. पुणे हे आमचे दुसरे घर आहे. अशा पुण्यात हा सोहळा पार पडणार असल्याने आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पं. किशन महाराज यांच्या कलेचा वारसा पुढे नेणाऱ्या संस्थेकडून आमचा सत्कार होणे, हे आमचे भाग्य आहे.
‘तालायन’
अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसाराच्या विधायक उद्देशाने पं. अरविंदकुमार आजाद यांनी ‘तालायन’ या संस्थेची स्थापना केली. शास्त्रीय कलेतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंतांचे नवोदित कलाकारांना मार्गदर्शन लाभावे, यासाठी विविध कार्यक्रमांचे संस्थेतर्फे आयोजन करण्यात येते. आजवर पं. रोहिणीताई भाटे, पं जसराज, विदुषी गिरिजा देवी, पं. जितेंद्र अभिषेकी यांसह अनेक दिग्गज कलाकारांचा सांगीतिक प्रवास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी ‘तालायन’च्या शिष्यांना लाभली आहे. कलेच्या प्रसाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यातही ‘तालायन’ अग्रेसर आहे. नैसर्गिक आपत्तीत वेळोवेळी संस्थेने आर्थिक मदत केली आहे. तसेच तालायनाच्या आर्थिक सहाय्यामुळे आज अनेक गरजू व होतकरु तरूण, शिष्य आपल्यातील उपजत कलेचे ज्ञान आत्मसात करू शकत आहे.