पुणे-कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक आबा बागुल यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढून ,राष्ट्रवादीने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन राष्ट्रवादी पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केले आहे .यामुळे तळजाई टेकडी वरील विकास कामावरून कॉंग्रेस राष्ट्रवादी मध्ये वादंग निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे .
या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,
आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पर्वती मतदारसंघामध्ये तळजाई येथे पवारसाहेबांना मैदानाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे, परंतु आमचे साहेब हे जाणते नेते आहेत आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न नगरसेवक आबा बागुल करीत आहेत हे त्यांच्या नजरेतून सुटणे अशक्य आहे. मैदान करण्यात आलेल्या जमिनीसाठी आमचे पक्षाचे सुभाष जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला व न्यायालयीन लढा हि दिला त्या नंतर स्वतः निधी देऊन विकास कामे हि केली तसेच याठिकाणी क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रयत्न केले. असे असताना तुटपुंजा निधी खर्च करून आयात पिठावर रेखोट्या मारण्याचा प्रकार नगर आबा बागुल करीत आहेत. त्यांचा हा बुरखा आम्ही फाडू या भीती पोटी त्यांनी ह्या मैदानाला कै. सदूभाऊ शिंदे यांचे नाव ठेवून पवारसाहेबांच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम ठेवला आहे. मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पेक्षाही पुढे होती. त्यामुळे आघाडी झाल्यास पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडेच राहणार आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडेच सक्षम उमेदवार असल्यामुळे आयात उमेदवाराची गरज हि नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद काँग्रेस आय पेक्षा पर्वती मतदारसंघामध्ये निश्चितच जास्त असून आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच वाट्याला पर्वती मतदारसंघ येणार व आमदारही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच होणार याबाबत आमचे ठाम मत आहे.या आगामी कार्यक्रमाला पर्वती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता स्वतःच्या इच्छे विरुद्ध परंतु फक्त आणि फक्त आमच्या पवारसाहेबांच्या प्रेमा खातरच उपस्थित राहील.
असे हि नितीन कदम यांनी म्हटले आहे .