यावेळी उत्तर देताना महापौर प्रशांत जगताप म्हणाले ,’ पक्ष संघटनेची भूमिका, पक्ष पदाधिकाऱ्यांची भूमिका वेगळी नाही ती एकच आहे. शहराला 24 तास पाणीपुरवठा मिळण्यापूर्वीच नवीन मीटर बसवणे हे अत्यंत चुकीचे होईल. तरी साठवण टाक्या व जुन्या जलवाहिन्या बदलल्यानंतरच पाण्याचे मीटर बसविण्याबाबत मागणीचे निवेदन मी स्वीकारत आहे. स्थायी समितीची बैठक आणि जनरल बॉडी मीटिंग मध्ये या प्रस्तावाला स्थगिती देऊ ‘.
पाण्यासाठी मीटर खरेदी प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी राष्ट्रवादीच्या जोरदार हालचाली
पुणे :पिण्याचे पाणी मीटर लावून पुणेकारांना देण्यासाठी एकीकडे निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असताना दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस ने प्रथम २४ तास पाणीपुरवठा करा नंतर मीटर खरेदी करा अशी भूमिका घेत मीटर खरेदीसाठी च्या निविदा प्रक्रियेला स्थायी समिती आणि मुख्य सभेत स्थगिती देण्यासाठी जोरदार प्रयत्न करू असे आज जाहीर केले आहे .
शहराला 24 तास पाणीपुरवठा मिळण्यापूर्वीच नवीन मीटर बसवणे हे अत्यंत चुकीचे होईल. तरी साठवण टाक्या व जुन्या जलवाहिन्या बदलल्यानंतरच पाण्याचे मीटर बसविण्याबाबत मागणीचे निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष, खासदार अॅड.वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले,आमदार अँड. जयदेवराव गायकवाड, रवीन्द्र अण्णा माळवदकर , नगरसेवक अप्पा रेणुसे, नगरसेवक रंजना मुरकुटे. ऍड.म. वि. अकोलकर , माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर मोहनसिंग राजपाल,पदाधिकारी, नगरसेवक सर्व सेल अध्यक्ष,कार्यकर्ते यांनी महापौर प्रशांत जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे, आयुक्त कुणाल कुमार यांना दिले.
यावेळी उपस्थित पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी या निवेदनावर सह्या केल्या.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यास महानगरपालिकेने पहिल्या टप्प्याची सुरूवात 103 पाण्याच्या टाक्या उभारण्याच्या निवेदनाला पालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. या पाण्याच्या साठवण टाक्यांचे काम पूर्ण व्हायला सुमारे दोन वर्षे लागणार आहेत. तसेच त्या पाठोपाठ 1600 किलोमीटर लांबीच्या पाण्याच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार आहेत, त्यालाही सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
ही दोन्ही कामे पुर्ण झाल्यास नागरिकांना 24 तास पाणी मिळू शकेल, अशी महापालिकेची योजना आहे. या पूर्वी 24 तास आणि पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्यामुळे पूर्वीचे मीटर बंद पडायचे किंवा चुकीचे रिडिंग मिळत होते. त्यामुळे मीटर पद्धती बंद केली गेली होती. ज्या कारणासाठी आपण पूर्वी मीटर पद्धती बंद केली त्याचा विचार न करता, 24 तास पाणीपुरवठा मिळण्यापूर्वीच नवीन मीटर बसवणे हे अत्यंत चुकीचे होईल.
महानगरपालिका दिनांक 2 ऑक्टोबरपासून घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांच्या नळ जोडाला मीटर बसविणार असल्याचे जाहिरातींमधून पालिकेनेच सांगितले जात आहे. या पुर्वी झालेल्या चुकीची पुनरावृत्ती या निर्णयामुळे होत आहे. व याचा फटका निश्चितच नागरिकांना व पाणीपुरवठ्याच्या या योजनेला बसणार आहे. त्याबरोबर असे सुद्धा कळते की ह्या मीटर च्या ‘वॉरंटी’ चा कालावधी हा एक वर्षाचाच आहे. महानगरपालिकेच्या नियोजनानुसार चोवीस तास पाणीपुरवठा होईपर्यंत तो संपुष्टात येणार आहे. तरी मीटर खरेदीची घाई का ? असा प्रश्न जनमानसात उपस्थित होत आहे.’
पाणी साठवण टाक्या व जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतरच घरगुती आणि व्यावसायिकांच्या नळ जोडवर मीटर बसवण्याचे काम हाती घेणे अधिक योग्य होईल अशी आमच्या सारख्या अनेक पुणेकरांची मागणी आहे . तरी आपल्या प्रस्तावाचा फेरविचार व्हावा व यापूर्वी नागरिकांना होर्डींग्ज च्या माध्यमातून केलेले जाहीर आवाहन ताबडतोब मागे घ्यावे .
असे समजते कि मीटर विकत घेण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे आणि आज संदर्भातील अखेरचा दिवस आहे तरी वरील बाबी लक्षात घेता हि निविदा प्रक्रिया सध्या रद्द करण्यात यावी .