देशात लोकशाही टिकायची असेल तर देशांतर्गत बंधुभाव वाढला पाहिजे: डॉ. कुमार सप्तर्षी
पुणे :
‘जो प्रामाणिक असतो , जो कलंक न लागता टिकून राहतो तोच खरा असतो. ‘लंबे रेस का घोडा’ म्हणून निवडून यायचं असेल तर या जनतेला आपण बाप मानलं पाहिजे . जनतेमध्ये १२ धर्म आहेत ते आपण आपले मानले पाहिजेत. भारतीयांना अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी आणि नागरी सुविधा देणे यालाच पक्षबांधणी म्हणतात, आणि जे ही जबाबदारी घेतात त्यांना पक्ष म्हणतात. देशात लोकशाही टिकायची असेल तर देशांतर्गत बंधुभाव वाढला पाहिजे. भारतीय नागरिकांमध्ये आपसात बंधुभाव वाढला तर देशबांधणी होते. आपल्याला देश बांधायचा आहे हे स्वीकारले तरचं नगरसेवक होता येते .’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ‘युवक क्रांती दला’चे संस्थापक आणि ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्य २०१७’ प्रशिक्षण शिबिर मालिकेअंतर्गत शिवाजीनगर विधानसभा मतदार संघामधील प्रशिक्षण शिबिरात ते आज बोलत होते. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला.
हे प्रशिक्षण शिबिर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सेंट्रल पार्क हॉटेल, शिवाजीनगर येथे झाले. दिपप्रज्वलनाने शिबीरास सुरुवात झाली. पहिल्या सत्राच्या सुरूवातीला महापौर प्रशांत जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याआधी ‘लक्ष २०१७’ प्रशिक्षण शिबिर मालिकातंर्गत कसबा विधानसभा मतदारसंघ, पर्वती विधानसभा मतदारसंघ, खडकवासला विधानसभा मतदारसंघ येथे शिबिरे संपन्न झाली
यावेळी खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, आमदार अनिल भोसले, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेविक रेश्मा भोसले, नगरसेविका उषा जगताप, नगरसेविका शारदा ओरसे, माजी महापौर सुरेश शेवाळे, अप्पा रेणूसे, अॅड.म.वि.अकोलकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम, उदय महाले, श्रीकांत पाटील, अशोक राठी, माजी नगरसेविका पद्मा गोळे, शिवाजीनगर अध्यक्ष शैलेश बडदे, रजनी पाचंगे, इकबाल शेख, राकेश कामठे, मनाली भिलारे, बाळासाहेब आहिरे, रजनी पाचंगे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सप्तर्षी बोलताना पुढे म्हणाले, ‘निवडणूकीच्या काळात शेवटचे पंधरा दिवस खुप महत्वाचे असतात, याच काळात गठीत मतदान होऊ शकते. मतदार यादी प्रमाणे मतदानाचा अभ्यास केला पाहिजे. गीता, बायबल, कुराण, धम्म पुस्तक म्हणजे मतदार यादी आहे या निष्ठेने त्याचे वाचन करून मतदानाचा अभ्यास करा.
ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ किंवा हिंदुत्ववाद कळला नाही त्यांनी राजकारणात राहू नये. विचारशक्ती कशी खुंटेल यावर भर दिला जातो. जात नावाच्या गोष्टीचा आधार यांच्याकडे घेतला जातो. लोकप्रतिनिधी व्हायचं असेल तर जात -पात न मानता समाजात ज्याच्यावर आजपर्यंत कोणी प्रेम केले नाही अशा वर्गावर तुम्ही प्रेम करा.’
खासदार वंदना चव्हाण मार्गदर्शन करताना म्हणाल्या,‘नागरी समस्यांचा लक्षपूर्वक विचार करायला हवा. सत्ताधारी पक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे. डेंग्यू, मलेरीयासारख्या आजारांनी नागरीक त्रस्त आहे. यासाठी नागरीकच जबाबदार आहेत . असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य महानगर पालिकेचे अधिकारी करत आहेत. परंतु प्रशासनाकडूनच कचरा उचलला जात नाही त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. पाण्याचे मीटर लावण्याची घाई का ? असा प्रश्न ही खासदार वंदना चहाण यांनी यावेळी उपस्थित केला. जोपर्यंत २४ तास पाणी येत नाही तोपर्यंत नागरीकांना मीटर बसवण्याबाबत सक्ती करू नये. ‘
शिबिराच्या पहिल्या सत्रामध्ये प्रशिक्षण शिबिरात उपस्थितांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित सत्रात मकरंद टिल्लू यांनी मार्गदर्शन केले. ‘माणसांना जोडणे, त्यांच्याशी संवाद साधणे खूप महत्वाचे आहे. खुप ताकतीने, आत्मविश्वासाने काम करा. हसत हसत सर्वाना सामोरे जा. आपले ‘लक्ष २०१७’ आहे त्यासाठी तयार राहा, असा मार्गदर्शक सल्ला दिला.
‘संघटन कौशल्यावर भर दिला पाहिजे’ : अशोक राठी
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष अशोक राठी यांनी ‘संघटन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना अशोक राठी म्हणाले, प्रचाराचे मार्केटींग करून भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले. पण आपल्या पक्षाने गेल्या १० वर्षात जे काम केले त्याचे मार्केटिंग करू शकलो नाही. १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ची स्थापना झाली. तेहांपासून आत्तापर्यत सत्तावन्न हजारांहून अधिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा आहेत आणि त्यांनी संघटना बांधली. सरदार वल्लभभाई पटेल आणि महत्मा गांधी यांच्यात वाद आहे अशी सुप्तपणे प्रतिमा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केली. एकीकडे गांधी विचारांचा द्वेष करणे आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी ‘स्वच्छता अभियानास सुरूवात असे विसंगतीने हे विचार करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत यांचा भारतीय जनता पक्षाशी घनिष्ठ संबंध आहे, त्यामुळेच आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत .
हे आपल्याला बदलायचे असेल, ‘लक्ष्य 2017’ गाठायचे असेल तर संगठन म्हणून काय केले पाहिजे, हे आता पाहणे महत्वाचे आहे. निवडणूकीची त्रिसुत्री महत्वाची आहे. ही त्रिसुत्री म्हणजे ‘उमेदवार आणि त्याचे काम’, ‘पक्ष धोरण आणि पक्षाचा प्रभाव’ या दोन्ही गोष्टी मतदारांपर्यंत पोचवतो ती मधली फळी ही खूप महत्वाची आहे. त्यामध्ये हजारी प्रमुख (बुथ लेव्हल एजंट) हा खरा संघटक आहे. संघटनेच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हे गरजेचं आहे .
यानंतर पहिल्या सत्राचा समारोप झाला.