मराठा समाज ‘मूक मोर्चा’कौतुकास्पद -‘समाजातील विषमता नष्ट झाल्या पाहिजेत’ : विद्या बाळ
पुणे :मराठा समाज ‘मूक मोर्चा’ करत आहेत. अतिशय शांतपणे लांखोंच्या संख्येत एकत्र येतआहेत ही कौतुकास्पद बाब आहे.याचबरोबर समाजातील विषमता मात्र नष्ट झाली पाहिजे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी येथे मांडले .
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्य 2017’ प्रशिक्षण शिबिर मालिकेअंतर्गत पर्वतीमधील प्रशिक्षण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. आज शनिवारी हे प्रशिक्षण शिबिर पर्वती विधानसभा मतदारसंघातील सातव हॉल, सहकारनगर येथे झाले. आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि ‘दै. महाराष्ट्र टाईम्स’चे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी मार्गदर्शन केले.
दीपप्रज्वलनाने प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार, शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, निरीक्षक श्री. हरीश सणस, बंडू केमसे, ‘पर्वती विधानसभा मतदार संघ’ अध्यक्ष शशीकांत तापकीर, मंगेश गोळे, अशोक राठी, राकेश कामठे, मृणालिनी वाणी, रूपाली चाकणकर, पंडित कांबळे, शिल्पा भोसले आदी नगरसेवक, पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना विद्या बाळ म्हणाल्या, ‘निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यामध्ये खुप उत्साह आणि खुप ताकद असते. त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक बैठक आवश्यक आहे. या बैठकीला विशिष्ठ पाया असणे गरजेचे आहे. समाजात विविध प्रकारच्या विषमता आहेत. यामध्ये शिक्षण, पैसा, शहरी / ग्रामीण, जात/ धर्म अशा या विषमतांचा समावेश होतो. पण सगळ्यात स्त्री -पुरुष विषमता ही भीषण आहे. समाजातील या विषमता नष्ट झाल्या पाहिजेत. यासाठी आपले विचारही चांगले असावे लागतात .
त्या बोलताना पुढे म्हणाल्या, ‘स्त्री पुरुष विषमता कमी करण्यासाठी त्याची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे असे मला वाटते. मुलांना वाढवताना मुलगा / मुलगी हा भेदभाव करू नका. आंतरजातीय विवाह करणे हे चूक नाही आणि स्त्री- पुरुष विषमता कमी झाली तर कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते, पर्यायाने आपण जे काम करतो ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आपला देश हा लोकशाहीचा देश आहे. आपल्याला स्वत:ची मते मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. सध्या मराठा समाज ‘मूक मोर्चा’ करत आहेत. अतिशय शांतपणे लांखोंच्या संख्येत एकत्र येतआहेत ही कौतुकास्पद बाब आहे.