पुणे : महावितरणच्या त्रिसुत्री कार्यक्रमातून राजगुरुनगर विभागातील वहागाव (ता. खेड) येथे एकाच दिवशी 55 वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
महावितरणचा त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम वहागाव येथे नुकताच झाला. यावेळी विशेष शिबीर घेऊन एकाच दिवशी तब्बल 55 वीजजोडण्या मंजूर करण्यात आल्या व नवे वीजमीटरही ग्राहकांना देण्यात आले. या सर्व वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय मे महिन्याच्या अखेरीस वहागावमधील 25 कृषीपंपाच्या वीजजोडण्या देण्यात येणार असून त्यासाठीचे कामे सुरु करण्यात आली आहे.
त्रिसुत्री कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे, पंचायत समितीचे सदस्य श्री. चांगदेव शिवेकर, श्री. रोहिदास गडदे, तालुका विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य श्री. काळूराम पिंजण, श्री. रमेश कोबल, वहागावचे सरपंच श्री. रामदास गुरव, आंबेठाणचे सरपंच श्री. दत्तात्रय मांडेकर, देशमुखवाडीचे सरपंच श्री. रामदास भोईर, सर्वश्री किसन नवले, तुकाराम नवले, भाऊ देशमुख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, वीजबिल दुरुस्ती, नवप्रकाश योजनेचा लाभ देण्यासाठी पाईट येथे दि. 2 मे रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात व मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता श्री. हेमंत जोशी, कनिष्ठ अभियंता श्री. सुधाकर आसवले आदींसह 15 कर्मचार्यांनी नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही केली. पुणे परिमंडलात राबविण्यात येणार्या त्रिसुत्री कार्यक्रमातून नवीन वीजजोडण्या देणे, वीजयंत्रणेची दुरुस्ती करणे, वीजदेयकांबाबत तक्रारी निवारण, सदोष व नादुरुस्त मीटर बदलणे, मीटरचे रिंडींग घेणे, डुप्लीकेट देयके देणे, नावांत बदल करणे आदी प्रकारचे कामे करण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी दिली.