पुणे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नाट्यकलाविष्काराने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रसिकांची भरभरून दाद मिळविली. लातूर परिमंडलाच्या ‘रातमतरा’ व भांडूप परिमंडलाच्या ‘नजरकैद’ या नाटकाच्या सादरीकरणाने नाट्यरसिक मंत्रमुग्ध झाले.
बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात बुधवारी (दि. 31) महावितरणच्या आंतरप्रादेशिक नाट्यस्पर्धेला सुरवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी औरंगाबाद प्रादेशिक विभागात उत्कृष्ट ठरलेल्या लातूर परिमंडलाचे रातमतरा नाटकाचे सादरीकरण झाले. भगवान हिरे लिखित व प्रमोद कांबळे दिग्दर्शित ‘रातमतरा’ नाट्यप्रयोगातील अभिनयाने नाट्यरसिकांना खिळवून ठेवले. दादही मिळविली. शहरातील तीन मित्रांची आडगावातून परतण्यासाठी रात्रीची चुकलेली शेवटची बस अन् एका वृद्धाच्या सहाय्याने ओसाड ठिकाणी विविध रंजक घटनांनी भेदरून काढलेली रात्र यावर आधारित कथानकाने एका वृद्ध पित्याचा आक्रोशही नाट्यरसिकांना हेलावून गेला.
त्यानंतर सायंकाळी भांडूप परिमंडलाने ‘नजरकैद’ नाट्यकृती सादर केली. प्रेम ही मानवी जीवनातील उदात्त संकल्पना आहे. पण हेच प्रेम मानवाला हिंस्त्र बनवते या संकल्पनेवर आधारित नाटकाचे लेखन अभिजित वाईलकर व दिग्दर्शन संदीप वंजारी यांनी केले. प्रेमाची विविध रुपे व भावनांचे कल्लोळ नाट्यकलाविष्कारातून प्रभावीपणे सादर करीत नाट्यरसिकांना ‘नजरकैद’ने मंत्रमुग्ध केले.
या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा समारोप गुरुवारी (दि. 1 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजता होणार आहे. त्याआधी सकाळी 10 वाजता पुणे परिमंडलाचे ‘´मेकअप 1986’ व दुपारी 3 वाजता नागपूर परिमंडलाचे ‘ते दोन दिवस’ ही नाट्यकृती सादर होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यस्पर्धा प्रभावी माध्यम – प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे
महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यस्पर्धा प्रभावी माध्यम आहे. अशा नाट्यस्पर्धांच्या आयोजनांतून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही नवी ऊर्जा मिळेल, असे मत पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी बुधवारी (दि. 31) व्यक्त केले. महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांच्याहस्ते झाले. यावेळी मुख्य अभियंता श्री. नागनाथ इरवाडकर (बारामती), श्री. एम. जी. शिंदे (पुणे), श्री. किशोर परदेशी (कोल्हापूर), श्री. राजाराम बुरुड (लातूर), मुख्य महाव्यवस्थापक सौ. रंजना पगारे (नाशिक), सहमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. अनिल कांबळे (मुंबई) आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उद्धव कानडे यांनी केले.