पुणे – चीनने त्यांच्याकडील मनुष्यबळाच्या जोरावर जगाची बाजारपेठ मिळवली. पण आज चीनमध्ये मजुरीचे दर वाढत असल्याने त्याचा फायदा आपल्या तरूणांनी घ्यावा. त्यासाठी स्वत:च्यातील कौशल्या ओळखून विकसित करा, एकापेक्षा जास्त कौशल्ये मिळवून स्मार्ट फोन व इंटरनेटच्या मदतीने जगाची बाजारपेठ मिळवा असे आवाहन कायनेटिक उद्योगाचे अध्यक्ष अरूण फिरोदिया यांनी आज येथे केले.
ऍस्पायर नॉलेज ऍण्ड स्कील प्रायव्हेट लिमिटेड आणि बोधिनी महिला सेवाभावी संस्थेच्यावतीने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या स्कील ऍण्ड आंत्रप्रोनरशिप कॉनल्केव्हमध्ये फिरोदिया बोलत होते. अभिनेते – दिग्दर्शक मनोज जोशी, डॉ दीपक शिकारपूर, मराठा चेंबरचे महासंचालक अनंत सरदेशमुख, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त लहुराज माळी, महात्माफुले विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र बेद यांच्या पत्नी रजनी बेद, ऑटोटेक कंपनीचे अध्यक्ष के. डी. राठोड, ऍस्पायरचे अध्यक्ष – व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी, संचालक डॉ. हुसेन हजीते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजनाने झाली.
या कार्यक्रमात पदमश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनेत मनोज जोशी यांचा खास मानपत्र देऊन सत्कार कऱण्यात आला. तसेच ऑटोटेक कंपनीचे अध्यक्ष के. डी. राठोड यांचा ऍस्पायर इनोव्हेशन आवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. आयटी करीयर २०२० प्लस प्लस या डॉ शिकारपूर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
अमेरिकेत कौशल्य विकासाच्या परिणामांचे आपण स्वत: बघितलेले दाखले देऊन अरूण फिरोदिया म्हणाले, कोणतेही काम चांगले वा वाईट किंवा लहान मोठे नसते. अमेरिकेत आज सर्वच काम करणारे स्वत:ला श्रेष्ठच समजतात. तिथे सर्वांनाच एक सारखी वागणूक मिळते. कारण तिथे गटार साफ करण्याचा व्यवसाय करणारा आठवड्यातील फक्त एकच दिवस काम करून इतरां इतकेच पैसे मिळवतो. तिथल्या इंजिनिअर पेक्षाजास्त पैसा प्लंबर कमावतो. त्यामुळे आपल्यातील कौशल्य आपणच ओखळून ते विकसित करून आपला उद्योग उभा करू शकतो. चीनला तरी त्यांचा माल खपवण्यासाठी परदेशी मार्केटिंग कंपन्यांची मदत घ्यावी लागली होती. पण आपल्या मदतील भारतात स्मार्ट फोन, इंटरनेट उपलब्ध आहे. यांच्या मदतीने आज आपले तरून जगाची बाजारपेठ काबीज करू शकतात. त्यासाठी तरूणांनी जगाकडे बाजारपेठ म्हणून बघतानाच आपल्यात एकपेक्षा अधिक कौशल्य़े विकसित करण्याची गरज आहे.
अभिनेत मनोज जोशी म्हणाले, प्रत्येकाच्यात कौशल्य हे दैवजात असतेच फक्त ते ओळखता आले पाहिजे. आता तर आपल्यातील कौशल्य ओळखून त्या नुसार प्रशिक्षण देणा-या ऍस्पायर सारख्या संस्था आहेत. प्रत्येकाला विद्या मिळवण्यासाठी मेंदू लागतो तर कौशल मिळवण्यासाठी मेंदू बराबरोबरच हृदयही लागते. विद्या आणि कौशल्य यातील भेद स्पष्ट करताना ते म्हणाले, सोन आणि सोनचाफा यांचा रंग सारखाच असतो. सोन चमकतं त्यामुळे ते अधिक मौल्यवान जरी असले तरी सोनचाफ्याचा सुगंध त्याला नसतो. तसं आपण मिळवलेली विद्या हे सोनं असेल तर आपल्यातील कौशल्य हे सोनचाफ्याचा सुगंध आहे. आपण स्वत: मिळेल ते काम करत गेलो, सरळ रस्त्यावर चालताना पुरस्काराची अपेक्ष न ठेवता प्रत्येक काम झोकून देऊन केल्यानेच आज राष्ट्राने पुरस्कार देऊन माझ्या कामाचा गौरव केला आहे. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतोच हा आपला ३० वर्षाचा अनुभव असल्याने तरूणांनी हे लक्षात ठेवून वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.
मराठा चेंबरचे अनंत सरदेशमुख यांनी कौशल्य विकास कार्यक्रमात मराठा चेंबर काय करत आहे याची महिती दिली. ऍस्पायरचे संजय गांधी यांनी सांगितलं की, १९९७ साली कौशल्य विकासाचे काम सुरू केले. वीस हजार तरूणांच्यातील कौशल्याचा विकास केला, त्यापैकी पाच हजार जणांना नोकरीही मिळाली आहे. यापुढे कौशल्य विकासाव्दारे १००० तरूण उद्योजक निर्माण करण्याचे धेय्य ऍस्पायरने ठेवलेले आहे. यावेळी लहुराज माळी, दीपक शिकारपूर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ऍस्पायरमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणात सहभाग नोंदवणा-य़ां तरूणांना प्रवेशपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सूत्रसंचलन प्रीतम तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन हुसेन हजीते यांनी केले. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण विकासचे विभागीय आयुक्त राहुल मोरे, व्होकेशन ट्रेनिंगचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.