पुणे : संततधार पावसामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी सतर्क व तत्पर राहावे. वीजपुरवठा खंडित झाल्यास दुरुस्तीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून त्वरीत वीजपुरवठा सुरु करावा, असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी दिले आहेत.
पुणे शहर व ग्रामीण भागात सध्या संततधार पाऊस सुरु आहे. या पार्श्वभूमिवर मुख्य अभियंता श्री. शिंदे यांच्याकडून सर्व विभागातील वीजपुरवठ्याच्या स्थितीचा दररोज सकाळी व सायंकाळी आढावा घेण्यात येत आहे तसेच वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मार्गदर्शन व सूचना करण्यात येत आहेत.
मुख्य अभियंता श्री. शिंदे यांनी सांगितले, की शक्यतोवर वीजपुरवठा खंडितच होणार नाही यासाठी अभियंता व जनमित्रांनी संबंधित वीजयंत्रणेवर लक्ष ठेवावे. पावसामुळे वीजयंत्रणेत होणारे संभाव्य बिघाड टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. गंभीर बिघाड असल्यास संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सक्रीय राहावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याच्या कामात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचार्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. शिंदे यांनी दिले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याबाबतची माहिती संबंधित वीजग्राहकांना देण्यात यावी. वीज अपघात टाळण्यासाठी जनमित्रांनी सुरक्षा साधनांचा वापर करावा व सतर्कपणे दुरुस्तीचे काम करावे व नागरिकांनाही वीजअपघात टाळण्याबाबत उपाययोजनांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध – शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यासाठी 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे वीजग्राहकांना संपर्क करण्याची व वीजसेवेविषयक कोणत्याही प्रकारची तक्रार व माहिती देण्याची सोय उपलब्ध आहे.