पुणे पोलिसांच्या ध्वनीवर्धक धोरणावर लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचचा आक्षेप; प्रदूषण नियंत्रण मंडळाशी समन्वयाचा सवाल
पुणे :
गणेशोत्सव आणि अन्य सण-उत्सवांसाठी पुणे पोलिसांनी निश्चित केलेल्या ‘चार बेस-चार टॉप’ या ध्वनीवर्धकांच्या मर्यादेला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचा दावा लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे. ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी स्पीकरची संख्या ठरवण्याऐवजी कायद्यात निश्चित करण्यात आलेली डेसिबल मर्यादा काटेकोरपणे लागू करणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सण-उत्सवांमध्ये जास्तीत जास्त चार बेस आणि चार टॉप स्पीकर्सच्या वापराबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. गणेश मंडळांनीही चार बेस-चार टॉपची मर्यादा पाळण्यास सहमती दर्शवली असून प्लाझ्मा आणि प्रेशर-मिड स्पीकर्सचा वापर न करण्याचे ठरवण्यात आले आहे.
मात्र, या पद्धतीवर किर्दत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
‘कोल्हापुरात दोन बेस-दोन टॉप, सांगली-मिरजेत एक बेस-एक टॉप; मग शास्त्रीय निकष कोणता?’
किर्दत यांच्या म्हणण्यानुसार, पुण्यात चार बेस-चार टॉपची मर्यादा सांगितली जात असताना कोल्हापूरमध्ये दोन बेस-दोन टॉप आणि सांगली-मिरज परिसरात एक बेस-एक टॉप अशा वेगवेगळ्या मर्यादा सांगितल्या जात आहेत. त्यामुळे स्पीकर्सच्या संख्येचा निकष नेमका कोणत्या वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारावर निश्चित केला जातो, हे स्पष्ट झाले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
“ध्वनीची तीव्रता केवळ बॉक्स किंवा स्पीकरच्या संख्येवर निश्चित होत नाही. संबंधित उपकरणाची शक्ती, वॅटेज, आवाजाची अॅम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी आणि वापरण्यात आलेले तंत्रज्ञान यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आकाराने लहान असलेले उपकरणदेखील अत्यंत तीव्र आवाज निर्माण करू शकते,” असे किर्दत यांनी म्हटले आहे.
त्यामुळे अशा निर्णयापूर्वी साऊंड इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले.
काय सांगतात ध्वनीप्रदूषणाचे नियम?
केंद्रीय ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमांनुसार रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 आणि रात्री 45 डेसिबल, तर व्यावसायिक क्षेत्रात दिवसा 65 आणि रात्री 55 डेसिबल इतकी परिसरातील अनुमत ध्वनीमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. संबंधित प्रशासनावर या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.
किर्दत यांच्या मते, त्यामुळे स्पीकर्सची संख्या किती आहे यापेक्षा प्रत्यक्ष निर्माण होणारा आवाज निर्धारित डेसिबल मर्यादेत आहे की नाही, याला प्राधान्य दिले पाहिजे.
दहीहंडीत 1,100 ठिकाणी मोजणी; पुण्यात 116 गुन्हे
दरम्यान, दहीहंडी उत्सवात पुणे पोलिसांनी शहरातील सुमारे 1,100 ठिकाणी डेसिबल मीटरद्वारे आवाजाची मोजणी केली होती. त्यानंतर पुणे शहरात ध्वनीमर्यादा उल्लंघनाबाबत 116 गुन्हे दाखल करण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मिळून ही संख्या 132 वर गेली आहे.
मात्र, किर्दत यांनी नागरिकांनी स्वतंत्रपणे केलेल्या नोंदींकडेही लक्ष वेधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्रस्त पुणेकरांनी सुमारे 60 ठिकाणी आवाजाची नोंद केली असता त्यापैकी जवळपास 30 ठिकाणी 100 डेसिबलपेक्षा अधिक आवाज नोंदवण्यात आला.
‘तक्रारदाराची वाट न पाहता प्रशासनाने स्वतःहून कारवाई करावी’
ध्वनीप्रदूषणाची कारवाई केवळ नागरिकांनी तक्रार केल्यानंतर होऊ नये, अशीही किर्दत यांची भूमिका आहे.
“पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी स्वतःहून आवाजाची नियमित मोजणी करून नियमभंग आढळल्यास कारवाई केली पाहिजे. नागरिकाला प्रत्येकवेळी तक्रारदार बनण्यास भाग पाडणे योग्य नाही,” असे त्यांनी म्हटले.
ध्वनीप्रदूषण नियंत्रणाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणावर असल्याची तरतूद नियमांमध्ये आहे.
‘पुणेकरांच्या विरोधानंतरही धोरणात अपेक्षित बदल नाही’
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस यांच्यात या विषयावर अधिक स्पष्ट आणि प्रभावी समन्वय दिसणे आवश्यक असल्याचे किर्दत यांनी म्हटले आहे.
ध्वनीप्रदूषणाविरोधात पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर आपली नाराजी व्यक्त करूनही प्रशासनाच्या धोरणात अपेक्षित बदल होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही तर पुणेकरांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशाराही मुकुंद किर्दत यांनी दिला आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांची भूमिका अशी आहे की चार बेस-चार टॉपची मर्यादा पाळतानाही निर्धारित डेसिबल मर्यादांचे पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील.

