सरकार जबाबदारीतून पळ काढू शकत नाही; MCD, दिल्ली सरकार, केंद्र, NHRC आणि विद्यापीठाला १० दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश
दिल्ली :
दिल्लीतील सत्य निकेतन परिसरातील हॉस्टेल दुर्घटनेप्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने या दुर्घटनेसाठी दिल्ली महानगरपालिका (MCD) आणि दिल्ली विद्यापीठ या दोन्ही यंत्रणा जबाबदार असल्याचे म्हटले.
बाहेरून शिक्षणासाठी दिल्लीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची स्थिती अत्यंत दयनीय आणि खराब असल्याची गंभीर टिप्पणी न्यायालयाने केली. सरकार अशा प्रकरणांमध्ये जबाबदारीतून पळ काढू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणी MCD, दिल्ली सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि दिल्ली विद्यापीठ यांना १० दिवसांच्या आत आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, हॉस्टेलचा मालक हरिराम बन्सल याला पोलिसांनी राजस्थानमधील भिवाडी येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती.
या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून १२ जणांना वाचवण्यात आले आहे. त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. बचावकार्य पूर्ण झाले आहे.
ही दुर्घटना दिल्ली विद्यापीठाच्या साउथ कॅम्पसजवळील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी सुमारे १.३० वाजता घडली. संबंधित हॉस्टेल पाच मजली आणि सुमारे ४० वर्षे जुन्या इमारतीत सुरू होते. मात्र, MCDच्या नोंदीनुसार ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आलेली नव्हती.
सत्य निकेतन हा दिल्ली विद्यापीठाच्या दक्षिण कॅम्पसजवळील प्रमुख विद्यार्थी परिसर आहे. येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी पीजी आणि वसतिगृहांमध्ये राहतात. व्यंकटेश्वर कॉलेज, आर्यभट्ट कॉलेज, मोतीलाल नेहरू कॉलेज आणि मैत्रेयी कॉलेज यांसारख्या संस्थाही या परिसराच्या आसपास आहेत. मात्र, सत्य निकेतन परिसरात एकूण किती विद्यार्थी राहतात, याचा अधिकृत आकडा उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या दुर्घटनेवरून भाजप सरकारवर टीका केली. अपघात होण्यापूर्वी खबरदारी घेतली जात नाही, अपघातानंतर दोष काही कनिष्ठ अधिकाऱ्यांवर टाकला जातो आणि खऱ्या जबाबदारांवर कारवाई होत नाही, असा आरोप त्यांनी ‘X’वरील पोस्टमधून केला.
राहुल गांधी यांनी सरकारने वर्षानुवर्षे मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला.

