दोरीच्या ताणामुळे कच्चा कॉलम कोसळल्याचा प्राथमिक अंदाज; मालवणी परिसरात हळहळ
मुंबई : मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात दहीहंडी खेळताना विटांचा कच्चा कॉलम कोसळून सात वर्षीय रुद्र कदम याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. दहीहंडीची दोरी बांधलेल्या कॉलमवर ताण आल्याने तो अचानक कोसळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
मालाड पश्चिमेतील मार्वे रोडवरील चिकूवाडी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये दुपारी तीनच्या सुमारास स्थानिक मुले दहीहंडी खेळत होती. दहीहंडीची दोरी एका बाजूला झाडाला, तर दुसऱ्या बाजूला इमारतीच्या तळमजल्यावरील विटांच्या कच्च्या कॉलमला बांधण्यात आली होती.
मुले दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना दोरीच्या ताणामुळे विटांचा कॉलम अचानक कोसळला. त्याखाली रुद्र दबला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपस्थितांनी त्याला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून दुर्घटना नेमकी कशी घडली आणि यामध्ये कोणाचा निष्काळजीपणा होता का, याचा तपास सुरू आहे.
उत्सवाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे मालवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे दहीहंडी तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोऱ्या, मंडप किंवा इतर साहित्य बांधताना सुरक्षित आणि मजबूत आधार वापरण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

