गोपनीयता राखा, नशाखोरी व टवाळखोरीला आळा घाला; आरोपीला जलद शिक्षा मिळावी – डॉ. गोऱ्हे
मुंबई, दि. ५ सप्टेंबर २०२६ : अमरावती येथे अल्पवयीन मुलीच्या झालेल्या हत्येच्या घटनेने समाजमन हेलावून गेले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या प्रीती कुंबरे यांनी पीडित कुटुंबाच्या घरी भेट देऊन मुलीच्या वडिलांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी मुलीच्या वडिलांचा दूरध्वनीवरून संवाद करून दिला.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुलीच्या वडिलांची विचारपूस करून त्यांना धीर दिला. या संवादादरम्यान मुलीच्या वडिलांनी कुटुंबाच्या व्यथा आणि परिसरातील काही गंभीर प्रश्न डॉ. गोऱ्हे यांच्यासमोर मांडले.
कुटुंबाची व मुलीच्या आईची गोपनीयता राखावी
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांच्या गावाची तसेच कुटुंबाची गोपनीय माहिती काही व्यक्तींकडून जाहीर केली जात आहे. तसेच मुलीच्या आईचे फोटो काही ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अशा प्रकारे पीडित कुटुंबाची ओळख, खासगी माहिती किंवा फोटो प्रसारित करून त्यांच्या दुःखात भर घालणारे प्रकार तातडीने थांबविण्यात यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नशाखोरी आणि टवाळखोरीवर कठोर नियंत्रणाची मागणी
परिसरातील नशाखोरी तसेच मुलींचा पाठलाग करणारे आणि टिंगलटवाळी करणारे काही तरुण चौकाचौकात बसत असल्याची बाबही त्यांनी मांडली. अशा प्रवृत्तींवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून परिसरातील महिला व मुलींना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी
या प्रकरणातील आरोपीविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून खटला प्रभावीपणे चालविण्यात यावा आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी पीडित कुटुंबाची अपेक्षा आहे. याबाबत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कुटुंबीयांना धीर देत, प्रकरणात जलदगतीने पुढील कायदेशीर कार्यवाही होण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले.
तसेच या प्रकरणासाठी अनुभवी व सक्षम सरकारी वकील उपलब्ध करून देण्याबाबतही आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कुटुंबाला भविष्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी आपल्याशी संपर्कात राहावे, असा दिलासाही डॉ. गोऱ्हे यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे , सुनेत्रा पवार यांना निवेदन पाठवणार
पीडित कुटुंबाने व्यक्त केलेल्या भावना आणि त्यांच्या मागण्यांची दखल घेत डॉ. नीलम गोऱ्हे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन पाठवणार आहेत. या निवेदनामध्ये प्रकरणातील गोपनीयता राखणे, कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी अथवा चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ न देणे, परिसरातील नशाखोरी व टिंगलटवाळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, तसेच आरोपीविरुद्ध जलदगतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे या मुद्द्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
“पीडित कुटुंबाच्या दुःखाची आणि त्यांच्या गोपनीयतेची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये अपुरी किंवा चुकीची माहिती प्रसारित करून कुटुंबाची बदनामी होणे अत्यंत चुकीचे आहे. परिसरातील नशाखोरी, टवाळखोरी आणि मुलींचा पाठलाग करणाऱ्या प्रवृत्तींवरही पोलिसांनी कठोरपणे प्रतिबंधात्मक कारवाई करावी,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी महिला व मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही संशयास्पद घटना, छेडछाड, पाठलाग, टिंगलटवाळी किंवा नशाखोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास वेळीच पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. तक्रार करण्यास उशीर करू नये, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.
दि.४ सप्टेंबर २६ रोजी पोलीस आयुक्त श्री . राकेश ओला यांच्याशी आ. नीलम गोर्हेनी चर्चा केली आहे व वेळेत चार्जशीट व टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी केली आहे.
अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांशी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद
Date:

