“डीजे मुक्तीसारखे निर्णय घेण्याची गरज”; पुणे पोलिस आणि राज्य सरकारने अधिक लक्ष देण्याची मागणी
पुणे : “कोणताही सण हा लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. मात्र डीजेच्या प्रचंड आवाजामुळे त्या सणाचे गांभीर्यच निघून जाते. एखाद्या व्यक्तीने आपले मत व्यक्त केले म्हणून त्याच्यावर हल्ला होत असेल, तर तो लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवरील हल्ला आहे,” अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली.
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले, “विद्यानंद बापट यांना मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही. मात्र ते जे काही बोलत आहेत, त्याला निश्चित अर्थ आहे. मत मांडल्यामुळे एखाद्यावर हल्ला होणे योग्य नाही.”
पुणे पोलिस आयुक्त आणि राज्य सरकारने अशा प्रकारांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही पवार यांनी म्हटले. “या कृत्याचा अनेकांनी निषेध केला आहे आणि त्या निषेधाशी मी पूर्णपणे सहमत आहे. हे प्रकार थांबले पाहिजेत. डीजे मुक्तीसारखे निर्णय घेण्याची गरज आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने देता येत नाही’ — विद्यानंद बापट
दरम्यान, हल्ल्याबाबत बोलताना विद्यानंद बापट म्हणाले, “मी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एक व्यक्ती आली आणि माझ्यावर हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो. सवंग प्रसिद्धीसाठी हा प्रकार करण्यात आला. मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने देता येत नाही, हे संबंधिताला समजले पाहिजे.”
आपला उत्सवाला कोणताही विरोध नसून, केवळ कर्णकर्कश आवाज आणि डीजेच्या वापराला विरोध असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले.
पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ची मर्यादा
दुसरीकडे, पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चार बेस आणि चार टॉप एवढ्याच मर्यादेत साऊंड सिस्टीम वापरण्याचे निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
बेस म्हणजे साऊंड सिस्टीममधून येणारा जड, धडधडणारा आणि कंपन निर्माण करणारा आवाज. तर टॉप स्पीकरमधून गायकाचा आवाज, गाण्याचे शब्द, भाषण आणि वाद्यांचे तुलनेने स्पष्ट व तीव्र स्वर ऐकू येतात.
गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना, शरद पवार यांनीही डीजेमुक्त उत्सवाच्या बाजूने भूमिका मांडल्याने या विषयावरील चर्चा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

