‘यांचेही चालू द्या, त्यांचेही चालू द्या’ अशी भूमिका; पुणेकरांच्या मानसिक-शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष होत असल्याची ‘आप’ची टीका
पुणे : कर्णकर्कश डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका ही पुणेकरांना होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करणारी ‘शहामृगी पद्धतीची’ असल्याची टीका आम आदमी पार्टीचे नेते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांनी या वादात न पडता गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करावा, असा सल्ला दिला होता. मात्र कर्णकर्कश डीजेविरोधात पुणेकरांनी ऑनलाइन याचिका, ई-मेल तसेच रस्त्यावर मोर्चे आणि आंदोलने करून आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असल्याचे किर्दत यांनी म्हटले आहे.
ध्वनीच्या तीव्रतेसंदर्भात कायद्यामध्ये स्पष्ट मर्यादा असतानाही अनेक वर्षांपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मागील वर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात मिरवणुकीतील ध्वनीची तीव्रता सुमारे 110 डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आल्याचा दावा किर्दत यांनी केला.
रहिवासी क्षेत्रामध्ये दिवसा निर्धारित ध्वनीमर्यादा 55 डेसिबल असताना अत्यंत तीव्र आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, हृदयविकाराचे रुग्ण, लहान मुले, रस्त्यावरील नागरिक तसेच पाळीव प्राण्यांनाही अशा आवाजाचा त्रास सहन करावा लागतो, असे त्यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सवापुरताच हा विषय मर्यादित नसून सर्व धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम तसेच मिरवणुकांमध्ये कायद्याने निश्चित केलेली ध्वनीमर्यादा पाळली गेली पाहिजे, अशी आम आदमी पार्टीची भूमिका असल्याचे किर्दत यांनी स्पष्ट केले.
पुण्यात एकीकडे महापौर आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ देणार नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील नेते गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नकोत, अशी भूमिका मांडत असल्याकडेही किर्दत यांनी लक्ष वेधले.
“ज्यांच्यावर कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे, त्या मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट भूमिका न घेता ‘यांचेही चालू द्या, त्यांचेही चालू द्या’ अशी भूमिका घेणे चुकीचे आहे. पुणेकरांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करणारी ही शहामृगी वृत्ती आहे,” अशी टीका मुकुंद किर्दत यांनी केली.
— आम आदमी पार्टी, महाराष्ट्र

