सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्धन भागवत यांच्या तत्परतेमुळे मोबाईल, महत्त्वाची कागदपत्रे आणि रोकड सुरक्षित परत
पुणे : हडपसर येथून आंबेजोगाईकडे जाण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबाची मोबाईल, महत्त्वाची कागदपत्रे आणि काही रक्कम असलेली बॅग घाईगडबडीत रिक्षामध्येच राहिली. मात्र, पुणे शहर पोलिसांच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्धन गणपत भागवत यांनी तातडीने हालचाल करत रिक्षाचालकाशी संपर्क साधला आणि अवघ्या काही वेळात बॅग शोधून कुटुंबाला सर्व सामानासह सुरक्षित परत केली.
ही घटना रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजता हडपसर परिसरात घडली. जनार्धन गणपत भागवत हे मोटर परिवहन विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांची नेमणूक आयकार विभाग, क्राईम ब्रँच, पुणे शहर येथे आहे. ते चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडीच्या कॉलवर जात होते. हडपसर वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ थांबले असताना त्यांना एक व्यक्ती, त्याची पत्नी आणि दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत धावपळ करताना दिसल्या.
भागवत यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित कुटुंबाने आपण सुरक्षा नगर, हडपसर येथील रहिवासी असल्याचे सांगितले. हे कुटुंब आंबेजोगाई, बीड येथे जाण्यासाठी रिक्षाने हडपसर मेन रोडवर आले होते. मात्र, घाईगडबडीत त्यांची एक बॅग रिक्षामध्येच विसरली गेली होती.
या बॅगेमध्ये एक मोबाईल फोन, महत्त्वाची वैयक्तिक कागदपत्रे आणि काही रक्कम असल्याने कुटुंब चिंतेत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत भागवत यांनी तातडीने रिक्षाचा शोध सुरू केला. बॅगेत असलेल्या मोबाईल क्रमांकावर ते सातत्याने फोन करत होते. काही वेळाने रिक्षाचालकाने फोन उचलल्यानंतर भागवत यांनी त्याला रिक्षामध्ये प्रवाशांची बॅग राहिल्याचे सांगून ती परत घेऊन येण्याची विनंती केली.
रिक्षाचालकानेही तत्परता दाखवत सुमारे १५ मिनिटांत बॅग परत आणून दिली. बॅग तपासल्यानंतर त्यातील मोबाईल, कागदपत्रे आणि रक्कम यासह सर्व सामान जसेच्या तसे असल्याचे आढळले. त्यानंतर संपूर्ण बॅग संबंधित कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आली.
बॅग सुरक्षितपणे परत आणल्याबद्दल रिक्षाचालकाचे आभार मानण्यात आले. तसेच त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून त्याला १०० रुपये बक्षीस देण्यास संबंधित कुटुंबाला सांगण्यात आले.
वेळीच केलेला पाठपुरावा, पोलीस अंमलदाराची तत्परता आणि रिक्षाचालकाने दाखविलेला प्रामाणिकपणा यामुळे महत्त्वाच्या वस्तू असलेली बॅग संबंधित कुटुंबाला सुखरूप परत मिळाली.

