मुंबई, दि. ५ ऑगस्ट २०२६ :
NEET पेपरफुटीविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोदी-शाहच्या सरकारने लाठीचार्ज केला तसेच पेलेट गनच्या वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, मुलींनाही अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने वांद्रे आणि बोरीवली (पश्चिम) येथे बॅनर फडकावून निदर्शने करण्यात आली.
“पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असतानाही दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरच पोलीस बळाचा वापर करण्यात आला. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारा आहे. पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. विद्यार्थ्यांवरील अमानुष कारवाईची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी”, अशी मागणी युवक काँग्रेसने केली.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मुंबई उत्तर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल रुपारेल आणि उत्तर मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजयकुमार मिश्रा यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या निषेधार्थ मोठे बॅनर फडकावण्यात आले. यावेळी मुंबई युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर, राज्य सरचिटणीस अमनदीप सिंह व मितेश सोनकर, उत्तर मध्य जिल्हा सरचिटणीस मुस्तकीम शेख, कलिना तालुका अध्यक्ष विकास जैसवार, चारकोप विधानसभा अध्यक्ष आशीष सरोज, बोरिवली विधानसभा अध्यक्ष विजय नगराळे, दहिसर विधानसभा अध्यक्ष आरिफ सय्यद तसेच मागाठाणे विधानसभा उपाध्यक्ष दीपक विश्वकर्मा यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध केला.

