पुणे : महाराष्ट्रामध्ये आज अनेक गोष्टींची अवनती झालेली दिसते. विज्ञान, तंत्रज्ञान, भाषांतर, सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्र यांसह महाराष्ट्रातील वाचन संस्कृतीचा ऱ्हास हा सर्वात अस्वस्थ करणारा आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे, समाजसुधारकांचा आहे, विवेकी, विज्ञाननिष्ठ आहे असे चित्र आज खोटे वाटत आहे. याचे मुख्य कारण आपल्या लोकांची वाचनसंस्कृती बद्दलची दुर्लक्षता आहे, असे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
संस्कृती प्रकाशनतर्फे डॉ. सुधाकर न्हाळदे लिखित ‘वाचता वाचता लिहिले’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. प्रसिद्ध वक्ते, लेखक प्रा. मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाशिका सुनिताराजे पवार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजू बाविस्कर, संगीता न्हाळदे मंचावर होते.
लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले, महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ सुरू होऊन अनेक वर्षे झाली आहेत, परंतु ती आज क्षीण झालेली दिसते. या पार्श्वभूमीवर वाचन संस्कृती पुनरुज्जीवत करायची असेल तर वाचन संस्कृतीची गरज काय हे समजून घेणे आवश्यक आहे. अशा काळात एक चांगला वाचक स्वत: पुस्तके वाचून त्यावर विचार करून टिपणे काढून लिहू लागतो ही एकप्रकारची आस्वादक समीक्षा डॉ. न्हाळदे यांच्या पुस्तकात दिसून येते.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, एकांगी वाचन संस्कृतीला मारक आहे. संकुचित, एका बाजूस झुकलेली वाचन संस्कृती समाजास उपयोगी नाही. अशा वेळी डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी बहुसांस्कृतिक भूमिका स्वीकारून, विविध वाङ्मय प्रकार हाताळत, समीक्षात्मक, वैचारिक लिखाण करून ज्ञाननिष्ठ संस्कृती निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनात विवेकनिष्ठता जाणवत असून चांगुलपणाची बेरीज दिसते.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, वाचन हा गंभीरपणे करण्याचा ज्ञान व्यवहार आहे. वाचन सर्वंकष असावे. एकांगी वाचनामुळे विचारप्रक्रिया एकांगी होते अशा विचार प्रक्रियेमुळे सारासार विचार करण्याची विवेक शक्ती क्षीण होते. उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम श्रोता होणे ही पूर्वअट आहे; तसेच उत्तम लेखक होण्यासाठी चांगला वाचक होणे गरजेचे आहे. डॉ. न्हाळदे यांनी तीन पिढ्यांतील लेखकांच्या लिखाणाचा वेध घेणारे समीक्षात्मक लेखन केले आहे. ही समीक्षा आस्वादक पद्धतीने केल्याचे जाणवते.
डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी लेखनामागील भूमिका विशद केली. सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविकात प्रकाशन हा व्यवसाय आर्थिक व्यवहाराचा नसून एक सांस्कृतिक व्यवहार असल्याचे सांगत लेखकाचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे सर्जनात्मक कार्य प्रकाशक करत असतो असे मत व्यक्त केले.
श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले तर शंकर मरगळे यांनी आभार मानले.

