सेवा मित्र मंडळातर्फे शाळेचा पहिला दिवस ; पारंपरिक पद्धतीने गुलाबपुष्प व रेवडी देऊन स्वागत
पुणे : छत्रपती शिवरायांचा, त्रिवार जयजयकार… त्रिवार जयजयकार… अशा शब्दांत पोवाड्याच्या माध्यमातून शाळेच्या पहिल्याच दिवशी शाहिरांनी राष्ट्रप्रेमाची जागृती विद्यार्थ्यांमध्ये केली. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यानिकेतन क्रमांक १ तसेच पद्मश्री डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन या प्रशालेत शाळेच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने गुलाबपुष्प व रेवडी देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, नगरसेविका स्वरदा बापट,नगरसेवक राघवेंद्र उर्फ बापू मानकर, स्वप्नाली पंडित, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, निखिल मोरे, वसुंधरा बारवे, सुनंदा वाखारे, शुभांगी चव्हाण, माणिक देवकर, सुभाष सातव, विनायक तुम्मा, मीना जाधव, रुबीना शेख, विठ्ठल भरेकर, विष्णू सुर्वे, मुख्याध्यापिका वीणा नाईक, उज्वला चव्हाण आदी उपस्थित होते. मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष नितीन होले, उमेश कांबळे, अमर लांडे, विक्रांत मोहिते, दिनेश गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शाळेमध्ये मुले पहिल्या दिवशी येताना दडपणाखाली येतात. त्यामुळे मुलांशी पाहुण्यांनी गप्पा माराव्या, याकरिता पहिला दिवस शाळेत दरवर्षी साजरा केला जातो. आम्ही पोवाडे स्पर्धा घेतो, मात्र त्याला महापालिका शाळेतील संघ नसतो. त्यामुळे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायला हवे.
स्वरदा बापट म्हणाल्या, महापालिका शाळेत केवळ अभ्यास नाही, तर अनेक कलागुण शिकायला मिळणार आहेत. शाळेसोबत त्याचे वेगळे प्रशिक्षण देखील घेण्यात येणार आहे. याशिवाय समुपदेशनाच्या माध्यमातून मुलींशी वेगळ्या प्रकारे संवाद साधणार आहोत. मुलांसाठी विविध खेळांच्या सहभागाच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महापालिका शाळा इतर शाळांच्या पुढे जाव्या, हे सगळ्यांचे स्वप्न आहे.
स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालण्याचा पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळेत विद्यार्थी संख्येची उदासिनता दिसून येत आहे. इंग्रजी भाषा गरजेची असली तरी देखील मराठी भाषा ही तितकीच महत्वाची आहे, याचे महत्व सांगण्यासाठी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याकरिता सेवा मित्र मंडळ दरवर्षी पुढाकार घेते.

