कोल्हापूर -महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा काही विषय उरला नाही. त्यामुळे बातम्या चालवण्यासाठी काही तरी मुद्दा लागत असतो. मग त्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशा चर्चा घडत असतात. काही तरी चर्चा असते पण त्यामध्ये काही तथ्य नसते. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस का विलीन होईल? तसा प्रयत्न झाला तर काँग्रेसमधील सर्व पळून जातील. त्यांना चांगला चॉईस जो आहे तिकडे जातील, सध्या भाजप सर्वात चांगला चॉईस आहे, असे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मविआने विधान परिषद निवडणुकीसाठी दिलेले उमेदवार निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत. कोणी रुग्णालयात दाखल झाले आहेत तर कोणी गायब झाले आहेत. काँग्रेस बुडती नाव असल्याने सर्व जण पळून जात आहेत. जो तो नाव बुडण्यापूर्वी पळून जात आहे. ही निवडणूक बिनविरोध होणं गरजेचे आहे, कारण विरोधकांकडे संख्याबळच नव्हते मग त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला असावा.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार भाजप प्रदेशाध्यक्षांना भेटले ते केवळ विधान परिषद निवडणूकीसंदर्भात भेट घेतली आहे. यापुढे ते काही भाजपसोबत येणार का नाही माहिती नाही. शक्तिपीठ महामार्गाला जसा विरोध होत आहे तसाच विरोध समृद्धी महामार्गाच्यावेळी सुद्धा झाला होता. पण जसे पॅकेज जाहीर करण्यात आले तसा लोकांचा विरोध कमी झाला आणि लोकांनी साथ दिली. शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारने किती नुकसान भरपाई देणार हे स्पष्ट केले तर लोकं स्वत:हून जमीनी देतील. भाजप नसताना सुद्धा अनेक जमीनीचे भुसंपादन झाले पण त्यामुळेच विकास होत असतो.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान मिळणार असल्याने ते खूश आहेत त्यांचे काही म्हणणे नाही. पण विरोधकांना काही तरी करावे लागते म्हणून रोहित पवार आंदोलन करत आहेत. कर्जमाफीमध्ये सर्व स्पष्ट आहे. रोहित पवार रोज एक मुद्दा घेत रस्त्यावर उतरतात, पत्रकार परिषद घेतात आणि प्रसिद्धी मिळवतात.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, जळगावमध्ये विधान परिषद निवडणुकीत जी बंडखोरी झाली आहे ती सुद्धा संपेल. प्रत्येकाचे म्हणनं वेळेत ऐकूण घेतले की ते प्रश्न संपतात. काही जण जास्तच आखडून बसतात त्यामुळे विषय ताणला जातो. पण नाशिकमध्ये जसे विधान परिषदेचा विषय मार्गी लागला तसाच विषय जळगावमध्ये सुद्धा मार्गी लागेल.

