अजितदादांच्या अपघाताचा अहवाल येऊ द्या म्हणणाऱ्यांवर घणाघात
“ अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपास अहवाला एक वर्षात देणे बंधनकारक, तरीही अंतिम रिपोर्ट नाही”
पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तपास अहवालावरून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर तसेच विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असतानाही विमान अपघात तपास यंत्रणा (AAIB) अंतिम अहवाल सादर करू शकलेली नाही, याकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांनी ट्विटर वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होत आले आहे. नियमानुसार अशा दुर्घटनांचा अंतिम तपास अहवाल एका वर्षाच्या आत सादर करणे अपेक्षित असते. मात्र अद्यापही अंतिम अहवाल समोर आलेला नाही. त्यांनी पुढे म्हटले की, AAIB चा तपास हा तांत्रिक स्वरूपाचा असतो आणि त्यामध्ये गुन्हेगारी (क्रिमिनल) तपासाचा समावेश नसतो. असे असतानाही अहवाल वेळेवर येत नाहीत, हे सर्वांनाच माहिती आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचाही उल्लेख केला. “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट बघूया”, असे सांगणाऱ्यांवर त्यांनी थेट हल्ला चढवला.
ते म्हणाले की, अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक “सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमकहराम आणि कृतघ्न” आहेत. फक्त सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी काही लोक अशा प्रकारची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये भावनिक प्रश्नही उपस्थित केला. “मैत्री, नातीगोती आणि संबंध याबद्दल अनेकजण व्यासपीठावर बोलतात. पण प्रत्यक्षात त्याचे काहीच महत्त्व नसते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार यांच्याशी राजकीय जवळीक दाखवणाऱ्या, पण त्यांच्या विमान अपघात प्रकरणात ठोस भूमिका न घेणाऱ्या नेत्यांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळ परिसरात अपघात झाला होता. या घटनेचा तपास AAIB कडून करण्यात आला. प्राथमिक अहवालात कमी दृश्यमानता, धावपट्टीशी संबंधित बाबी आणि ऑपरेशनल कारणांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र या निष्कर्षांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रोहित पवार यांचा आरोप आहे की, या प्रकरणात केवळ तांत्रिक निष्कर्षांवर अवलंबून न राहता अधिक व्यापक चौकशी होण्याची गरज आहे.
दरम्यान, अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा अंतिम अहवाल अद्याप जाहीर न झाल्याने तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी AAIBच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत अजित पवार विमान अपघात प्रकरणातील अहवालाची वाट पाहण्याचा सल्ला देणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.रोहित पवार यांच्या या आक्रमक पोस्टनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. एकीकडे विमान दुर्घटनांच्या तपासातील विलंबाचा मुद्दा पुढे आला आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.

