पुणे-पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महायुतीची उमेदवारी मिळाल्यापासून चर्चेत असलेले विक्रम काकडे आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. काकडे यांनी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मात्र, “ते कर्ज नसून बंगला खरेदी करण्यासाठी दिलेली आगाऊ रक्कम आहे,” असा महत्त्वपूर्ण खुलासा खुद्द विक्रम काकडे यांनी केला आहे.
विक्रम काकडे यांच्या संपत्तीच्या विवरणपत्रात जय पवार यांच्या नावावर १० कोटी रुपये दाखवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. यावर स्पष्टीकरण देताना काकडे म्हणाले की, “मी जय पवार यांना कोणतेही कर्ज दिलेले नाही. प्रतिज्ञापत्रात ‘लोन्स अँड ॲडव्हान्सेस’ असा उल्लेख आहे. तो व्यवहार एका मालमत्ते संदर्भात आहे. माझे सध्याचे घर यशवंत गाडगे नगरमधील बंगला क्रमांक ९ आहे आणि त्या शेजारील १० क्रमांकाचा बंगला जय पवार यांच्या नावावर आहे. तो प्लॉट मला स्वतःला राहण्यासाठी खरेदी करायचा असल्याने हा व्यवहार झाला आहे.”
हा व्यवहार मागील वर्षीच झाला असून त्याचा सध्याच्या निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्याकडे हा बंगला घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, तो जय पवार यांच्या मालकीचा असल्याने त्यांच्यासोबत हा व्यवहार करून ही आगाऊ रक्कम दिल्याचे विक्रम काकडे यांनी सांगितले.
पुणे विधान परिषदेसाठी माजी आमदार सुनील टिंगरे इच्छुक होते, मात्र त्यांना डावलून काकडेंना उमेदवारी मिळाल्याने पक्षात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. यावर बोलताना काकडे म्हणाले, “निवडणुकीची घोषणा झाल्यावर जोपर्यंत अधिकृत उमेदवार घोषित होत नाही, तोपर्यंत काही प्रमाणात सगळे लोक उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण एकदा उमेदवार जाहीर झाला की, पक्षांतर्गत असलेली सगळी नाराजी संपून जाते. तरी सुद्धा जे इच्छुक उमेदवार होते, त्यांच्या सगळ्यांची मी काल भेट घेतली. सगळ्यांशी बोलताना त्यातील कुणी नाराज असल्याचे मला वाटले नाही.”
निवडणुकीच्या गणितावर भाष्य करताना विक्रम काकडे यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “महाविकास आघाडीने जर माघार घेतली नाही, तर तशीही आम्ही निवडणुकीची तयारी केलेली आहे. मताधिक्य आमच्याकडे बऱ्यापैकी जास्त आहे. जवळपास ९५ टक्के मते ही महायुतीची आहेत. मी महायुती अधिकृत उमेदवार असल्यामुळे ती सर्व मते मला पडतील, अशी खात्री आहे. एक टक्काही मत इकडे तिकडे जातील, असे मला वाटत नाही. महाविकास आघाडीने या निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना माझे वडील विनंती करतील.”
संजय कंद आणि प्रदीप कणसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. दोघांनीही नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ते माघार घेतील का? याबाबत विक्रम काकडे यांनी विचारले असता ते म्हणाले, संजय कंत हे माघार घेतील, असा विश्वास विक्रम काकडे यांनी व्यक्त केला.

