दुसर्याच्या आनंदात आनंद मानणारा महात्मा प्रा.गणेशराव
पुणे-:“एमआयटीची स्थापना केल्यानंतर प्रा.एच.एम.गणेशराव हे पाच वर्षे संस्थेचे अध्यक्ष होते. सरकारकडून आलेल्या एखाद्या धोरणात्मक पत्रापासून ते अगदी छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत त्यांना आनंद होत असे. इतकेच नव्हे तर त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत असत. संस्थेच्या प्रगतीमधील अनेक निर्णयांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अगदी पूर्वी मी सीओईपीमध्ये प्राध्यापक असताना प्रा.गणेशराव हे आमचे विभाग प्रमुख होते. त्यावेळी मी वृत्तपत्रात लिहिलेला लेख त्यांनी वाचला. माझे कौतुक केले. इतकेच नव्हे तर, आमच्या विभागाच्या प्राध्यापक वर्गालाही बोलावून जाहीरपणे माझे अभिनंदन केले.”अशी भावना माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.विश्वनाथ दा .कराड यांनी काढले. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहा तर्फेे माईर्स एमआयटीचे माजी अध्यक्ष व सीओईपीचे माजी प्राचार्य प्रा. एच.एम.गणेशराव यांची श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. एस.एस.दराडे पाटील, संस्थापक विश्वस्त प्रा.प्रकाश जोशी, कुलसचिव श्री.एस.व्ही. उर्फ नाना कुलकर्णी, उपकुलसचिव श्री. अभय बिरारी, प्राचार्य डॉ.ललित क्षीरसागर, न्या.आर.एम.खान, प्रा. डी.पी.आपटे, प्रा.श्रीमती मृदुला कुलकर्णी, प्रा.डॉ.सायली गणकर, श्री.कोतुळकर,श्री. गिरीष दाते, श्री.चंद्रकांत भोसले हे उपस्थित होत. तसेच, एमआयटीचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. एस.एस.दराडे पाटील म्हणाले,“माझ्या सारख्या अगदी छोट्या प्राध्यापकालासुद्धा ते नेहमी मनापासून प्रोत्साहन देत असत. त्यामुळे आम्हाला मोठी उमेद वाटत असे. ”
प्रा.प्रकाश जोशी म्हणाले,“एमआयटीची स्थापना झाल्यानंतर अनेक तांत्रिक समस्या येत असत. परंतू केवळ प्रा.गणेशराव सरांच्यामुळे आम्ही त्यावर मात करू शकलो.”
श्री.एस.व्ही. उर्फ नाना कुलकर्णी म्हणाले,“ संस्थेच्या कोणत्याही बैठकीमध्ये प्रा.गणेशराव आले म्हणजे सर्व वातावरण प्रफुल्लित होत असे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या मनावरील ताण हलका होत असे.”
प्रा.श्रीमती मृदुला कुलकर्णी म्हणाल्या,“ गणेशराव सर हे महराष्ट्र रोईंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष होते. आम्ही रोईंगचे काम करीत असताना ते अतिशय बारकाईने चौकशी करीत असत.”
श्री.कोतुळकर , म्हणाले,“देवाच्या दयाने मला त्यांचा बराच सहवास घडला. ते आमची ओळख लक्षात ठेवून सदैव माणुसकीने वागत असत.”
श्री.चंद्रकांत भोसले,म्हणाले,“मला असे वाटते की प्रा.गणेशराव हे अजून आपल्यामध्येच आहेत. त्यांच्यासारखी माणसे कायमच आपल्याला स्फूर्ती देत असतात.”
प्रा.डी.पी.आपटे यांनी प्रास्ताविक केले. एमआयटीचे प्राचार्य प्रा.डॉ.ललित क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातील सर्व उपस्थितांनी प्रा.एच.एम.गणेशराव यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.