पंढरपूर : शेतमालाची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात असायला हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज कृषी पंढरी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे आदी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत सावता माळी कृषी नगरीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात चारशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने कृषी पंढरी सारखे प्रदर्शन आयोजित करुन आमदार प्रशांत परिचारक यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. या पंढरीतून कृषीविषयक तंत्रज्ञान राज्यभरातील शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचेल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमनातून काही कृषी उत्पादने नियमनमुक्त करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या उत्पादित मालाचा भाव ठरवता येत नाही. नियमनमुक्तीमुळे शेतकरी आपल्या मालाचा भाव ठरवू शकेल आणि त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळेल.
बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असायला हवी. पण काही कारणामुळे ही बाजारपेठ शेतकऱ्यांच्या फायद्याची नसल्याचे स्पष्ट होते. वास्तविक राज्य शासनास बाजारपेठ ही शेतकऱ्यांच्या हिताची व्हावी, असे वाटते. त्यामुळेच काही कृषी उत्पादने नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी क्षेत्रात गुंतवणूक होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य शासनाने गेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील जास्तीत जास्त जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत येत्या वर्षभरात चार लाख हेक्टर जमीन ठिबक सिंचनाखाली आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी श्री. फुंडकर, पालकमंत्री श्री. देशमुख, श्री.खोत यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देवून पाहणी केली.