महावितरणचे नागरिकांना आवाहन
पुणे, दि. २५ जुलै २०२४: पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात अभुतपूर्व अतिवृष्टीने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने पावसाळ्यात प्रामुख्याने रस्त्यावरील विजेचे, पथदिव्यांचे लोखंडी खांब तसेच घरगुती व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सतर्क राहावे व विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
अतिवृष्टी व संततधार पावसामुळे तुटलेल्या वीजतारा, पथदिवे, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. मुसळधार पावसामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. वीजखांब वाकतात व वीजतारा तुटतात. लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.
पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी. ओल असल्यास वीज सुरु करू नये. घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. लोखंडी पत्र्याच्या घरांचा किंवा इमारतीमध्ये लोखंडी जिन्याचा वापर करीत असल्यास त्या ठिकाणी अत्यंत सावधगिरी बाळगावी. करंट लिकेट नसल्याची खात्री करावी. घराच्या बाहेरील भिंतीवर किंवा लोखंडी पत्र्याच्या घराला पावसामुळे ओल येते. तेथील वायरचे इन्सूलेशन खराब झाले असल्यास भिंतीमध्ये विद्युतप्रवाह येऊ शकतो. हे टाळण्यासाठी वायरच्या इन्सूलेशनची पाहणी व दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
बहुतेक इमारतींच्या तळमजल्यावर वीजमीटर बसविलेले आहेत. पावसाळ्यात अनेक इमारतींमध्ये पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे तळमजल्यामध्ये पाणी साचते. वीजमीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढते. अशी वेळी वीजपुरवठा बंद ठेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधितांनी महावितरणशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच महावितरणकडून पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागात संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे. वीजविषयक कोणत्याही प्रकारच्या तक्रारींसाठी महावितरणचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक वीजग्राहकांसाठी २४ तास उपलब्ध आहेत. यासह मोबाईल अॅप, www.mahadiscom.in वेबसाईटद्वारेही तक्रारी नोंदविण्याची सोय आहे.