मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. सोन्याने सारे रेकॉर्ड मोडीत काढत थेट ७३ हजारांचा आकडा गाठला होता. त्यामुळे सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सामान्यांच्या खूप अपेक्षा होत्या. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली ज्याचा थेट परिणाम हा सामान्य माणसांवर झाला. या निर्णयामुळे सोनं-चांदीच्या दरात मोठी घरसण झाली आहे.
मुंबई, पुणे आणि जळगावच्या सराफा बाजारात मोठा परिणाम दिसून आला आहे. अर्थसंकल्पानंतर दोन ते तीन तासात सोन्याचे भाव मुंबईत तीन हजारांनी घसरले आहेत. तर पुणे आणि जळगावात तीन हजारांनी सोनं स्वस्त झालं आहे. पुण्यात सोनं खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना प्रतितोळ्यामागे ३ हजार रुपयांचा फायदा झाला. तर मुंबईत सोनं पाच हजारांनी कमी झाल्याची माहिती आहे.अर्थसंकल्पात सोनं-चांदीच्या सीमा शुल्कात कपात केली आहे. यापूर्वी हा दर १५ टक्के होता. यात कपात करुन सीमा शुल्क दर ६ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घट झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्यामध्ये प्रतितोळ्यामागे ३ ते ५ हजारांची घट झाली आहे. हे सामान्य नागरिकांना आनंदी करणारं आहे.सोनं-चांदीवरील सीमा शुल्क ६ टक्क्यांवर आणण्यात आलं आहे. तर प्लॅटिनमवरील सीमा शुल्क ६.४ टक्के असणार आहे. त्याशिवाय अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क हे ७ टक्क्यावरून वाढवून १० टक्के करण्यात आलं आहे.