उष्माघाताने मृत्यू वाढताहेत ..
मुंबई-राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडिया तून माहिती दिली की, राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत.
तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगरातील पारनेर तालुक्यातील माळवाडी (ढवळपुरी) येथे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या हर्षदा रावसाहेब चौधरी (46) या महिलेचा शनिवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. कडक उन्हात मका कापत असताना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने जखणगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. चौधरी कुटुंबाचा मोठा दूध व्यवसाय असल्याने हर्षदा नेहमीप्रमाणे दुपारी 1 वाजता जनावरांच्या चाऱ्यासाठी मका आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या.
वर्धा देशात सर्वात उष्ण
वर्धा 45.0
नागपूर 44.2
अमरावती 44.0
चंद्रपूर 43.4
अकोला 43.3
गोंदिया 43.2
सोलापूर 42.4
परभणी 42.2
जळगाव 41.4
धाराशिव 41.4
अहिल्यानगर 41.1
बीड 41.1
संभाजीनगर 40.6
सांगली 40.0
पुणे 39.6
नाशिक 39.1

