पुणे- महापालिकेत सभागृहाच्या दारापर्यंत येऊन राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावर नगरसेवकांनी आक्षेप घेत सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले. आपले सुरक्षा रक्षक काय करत असतात असा प्रश्न विशेष सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.
त्यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ”हे सुरक्षा रक्षक शिफारशीने नियुक्त केल्याने सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे,” असे उत्तर दिल्याने नगरसेवकांचीच कोंडी झाली.

पुणे महापालिकेत पीएमपीच्या कारभारासंदर्भात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. पीएमपीमध्ये काही महिन्यांपूर्वी बोगस भरतीप्रकरणी व त्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात नवीन इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर सभागृहाच्या बाहेर येऊन राजकीय कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू केले. बराच वेळ घोषणाबाजी करूनही सत्ताधारी किंवा विरोधकांनी त्यांची दखल घेतली नाही.
यावर भाजपचे शहराध्यक्ष, नगरसेवक धीरज घाटे यांनी आक्षेप घेतला. ‘मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक तैनात असतानाही आंदोलक सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचले आहेत. हे आंदोलक सभागृहात घुसतील अशी स्थिती आहे. यापूर्वी तीन-चार वेळा अशी आंदोलने झाली आहेत. सुरक्षा रक्षक काय करत आहेत, असा प्रश्न घाटे यांनी उपस्थित केला. भाजपच्या इतर नगरसेवकांनीही या मागणीला पाठिंबा दिला.
विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी ही संधी साधत भाजपवर टीका केली. ते म्हणाले, ‘महापालिकेत काम व्यवस्थित होत नाही, नागरिकांचे म्हणणे व्यवस्थित ऐकून न घेतल्याने आंदोलने होत आहेत,’ असा टोला लगावला. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली
महापौर मंजुषा नागपुरे यांनी सुरक्षा व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली.

‘गेल्या काही महिन्यांत बॉम्ब ठेवल्याचे धमकीचे फोन, विविध आंदोलनांच्या घटना आणि प्रवेशद्वारांवरील अपुरी तपासणी या बाबी गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेच्या प्रवेशद्वारांची संख्या कमी करून एका महिन्याच्या आत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.’
यावर खुलासा करताना आयुक्त राम म्हणाले, ‘महापालिकेची सुरक्षा यंत्रणा पोलिस दलाप्रमाणे प्रशिक्षित नाही. अनेक सुरक्षा रक्षकांना आवश्यक प्रशिक्षण मिळालेले नाही. त्याहून गंभीर बाब म्हणजे अनेक नियुक्त्या गुणवत्तेच्या निकषांऐवजी शिफारशीवर झाल्या आहेत. त्यामुळे अपेक्षित दर्जाची सुरक्षा मिळत नाही.घाटे यांनी या विभागात भ्रष्टाचार असल्याचे नमूद केले. त्यावर आयुक्त म्हणाले, ‘तुम्ही मला मदत करा, मी भ्रष्टाचार कमी करतो.’

