काथ्या, बांबू, शेण, सुतळी आणि द्रोणाचा वापर करून साकारले ‘श्वेतार्थ गणेश मंदिर’
पुणे : परंपरेला आधुनिक विचारांची जोड देत प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात काहीतरी नवे सादर करण्याची ओळख निर्माण केलेल्या श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळाने यंदा पुणेकरांसाठी एक आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक अनुभव साकारला आहे. ‘श्वेतार्थ गणेश मंदिर’ असे या वर्षीच्या मंदिर व सजावट संकल्पनेचे नामकरण करण्यात आले असून, निसर्गाशी नाते सांगणारी ही कलाकृती गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे, सजावटीतील प्रत्येक घटकामागे ‘निसर्गातून घ्या आणि निसर्गालाच परत द्या’ हा विचार अधोरेखित करण्यात आला आहे.
कृत्रिम साहित्याचा भपका न करता निसर्गातील साधेपणातून सौंदर्य निर्माण करता येते, याचा प्रत्यय ‘श्वेतार्थ गणेश मंदिरा’त प्रवेश करताच येतो. संपूर्ण सजावटीमध्ये काथ्या, बांबू, शेण, सुतळी आणि द्रोण या सारख्या नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पक वापर करण्यात आला आहे.
काथ्यांच्या विणकामातून कलाकुसरीचा अनोखा आविष्कार
मंदिराच्या सजावटीतील भिंती, कमानी आणि विविध कलात्मक रचना बांबू व काथ्यांच्या पारंपरिक विणकामातून साकारण्यात आल्या आहेत. द्रोणांची आकर्षक मांडणी, सुतळीचा कलात्मक वापर आणि नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या विविध रचना यामुळे संपूर्ण मंदिराला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.
पारंपरिक भारतीय कारागिरीची आठवण करून देणारे हे विणकाम आणि नैसर्गिक पोत आधुनिक प्रकाशयोजनेच्या साथीने अधिक खुलून दिसतात. त्यामुळे ‘श्वेतार्थ गणेश मंदिर’ हे केवळ गणपतीचे दर्शन घेण्याचे ठिकाण न राहता, पर्यावरण, कला आणि परंपरेचा अनुभव देणारे एक आगळे आकर्षण ठरते.
उत्सवातून पर्यावरणाचा संदेश
गणेशोत्सवातील सजावट म्हटले की मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कृत्रिम साहित्य, प्लास्टिक, थर्माकोल आणि इतर सजावटीच्या वस्तू यांना पर्याय असू शकतो, हे मंडळाने यंदाच्या संकल्पनेतून दाखवून दिले आहे. निसर्गाला हानी न पोहोचवता उत्सव साजरा करता येतो आणि त्याचवेळी भव्य, आकर्षक आणि कलात्मक वातावरणही निर्माण करता येते, हा संदेश ‘श्वेतार्थ’मधून देण्यात आला आहे.
या सजावटीमागे केवळ पर्यावरणपूरकता नाही, तर भारतीय पारंपरिक कला, स्थानिक कौशल्य आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा सन्मान करण्याचा विचारही आहे. पारंपरिक पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा कलात्मक वापर करून आकर्षक सजावट करता येते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्माकोल किंवा अन्य कृत्रिम साहित्याची आवश्यकता नाही, हे मंडळाने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
मंडळाच्या या संकल्पनेतून पर्यावरणपूरक जीवनशैली ही केवळ घोषवाक्य न राहता ती आपल्या सण-परंपरांचाही अविभाज्य भाग होऊ शकते, असा संदेश देण्यात आला आहे. उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्थानिक हस्तकला आणि पारंपरिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही या सजावटीतून दिसून येतो.
१३४ वर्षांची परंपरा, प्रत्येक वर्षी नवा विचार
श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळाची १३४ वर्षांची गौरवशाली परंपरा आहे. मात्र परंपरा जपताना काळानुरूप नवे विचार आणि नवनवीन संकल्पना स्वीकारणे ही मंडळाची विशेष ओळख राहिली आहे. परंपरेचा पाया भक्कम ठेवत नव्या कल्पनेची उंची गाठणारे यंदाचे ‘श्वेतार्थ गणेश मंदिर’ त्याच विचाराचे दर्शन घडवते.
यंदा श्री कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या पुणेकरांना गणरायाच्या दर्शनासोबतच निसर्ग, कला आणि भारतीय परंपरेचा सुंदर मिलाफ अनुभवण्याची संधी मिळणार आहे. असा अनोखा अनुभव देण्यासाठी सज्ज झालेले ‘श्वेतार्थ गणेश मंदिर’ यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांनी आवर्जून भेट द्यावी, असेच हे आगळेवेगळे पर्यावरणपूरक रूप सांगते.:श्रीकांत शेटे

