नवी दिल्ली -संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर (नारी शक्ती वंदन विधेयक) चर्चा सुरू असताना आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वैयक्तिक आरोपांची मोठी चकमक उडाली. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेत गंभीर आरोप केल्याने शिवसेना (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे प्रचंड संतापले. “मी तोंड उघडले तर गोध्रा आणि तडीपारीचे किस्सेही बाहेर येतील,” अशा शब्दांत सावंतांनी भाजपला आरसा दाखवला.
केंद्र सरकार नारी शक्ती वंदन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक पारित करण्यासाठी संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन देखील बोलावण्यात आले आहे. विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकामागील सरकारची भूमिका स्पष्ट केली. “हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आम्हाला याचे कोणतेही श्रेय घ्यायचे नाही,” असे मोदींनी यावेळी नमूद केले. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत राजकीय आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या.
विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना अरविंद सावंत यांनी भाजपला महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून धारेवर धरले. ते म्हणाले, “महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहे. आमच्या महाराष्ट्राला कलंकीत केले जात आहे. हे बिल आणले तेव्हा मनात एकच गोष्ट येतो की, हे विधेयक आताच का मंजूर करायचे आहे? जून-जुलै महिन्यात मंजूर केले जाऊ शकत नव्हते? निवडणुकीच्या वेळी का? कारण तुम्हाला माहिती होतं की, निवडणुकीच्या काळात अनेक विरोधी पक्षाचे खासदार हजर राहू शकणार नाहीत. गैरहजर राहिले तर आपल्याला बिल पास करायला सोपे होईल”, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.
अरविंद सावंत यांनी पुढे बोलताना, कुलदीप सेंगर कोणत्या पक्षाचे आहेत ते विसरु नका. बृजभूषण सिंह महिला सन्मान करणारे आहेत का?”, असा सवाल केला. यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे विरोध करु लागले. त्यावर अरविंद सावंत यांनी सवाल केले की, “तुम्हाला बलात्कारी जास्त प्रिय आहेत का? त्याचे नाव येऊ द्या रेकॉर्डवर.”
अरविंद सावंतांच्या टीकेला उत्तर देताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेतले. “जर सेंगर आणि ब्रिजभूषण यांचा दाखला दिला जाणार असेल, तर आम्हाला आदित्य ठाकरेंबद्दलही बोलावे लागेल. कारण, आदित्यनेही हिरोईनला मारले, आम्ही त्याची चर्चा करू इच्छितो” असे निशिकांत दुबे म्हणाले.
या विधानामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ आक्षेप घेत, “जे या सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यांचे नाव घेणे चुकीचे आहे. निशिकांत दुबेंवर कारवाई व्हायला पाहिजे,” अशी मागणी केली.
निशिकांत दुबेंच्या विधानाने संतापलेल्या अरविंद सावंतांनी नाव न घेता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जुन्या प्रकरणांकडे इशारा केला. ते म्हणाले, “आम्ही जर तोंड उघडले तर सगळंच बाहेर येईल, मग गोध्रा देखील येईल. मी केवळ तुरुंगात गेलेल्या गुन्हेगारांची नावे घेतली आहेत. मला जर बदनाम करायचे असते, तर मी ‘तडीपार’ कोण होतं त्यांचं नाव घेऊ का? एपस्टीन फाईल्सचे नाव घेऊ का? मला सांगाना. माझं तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत. लाईन आहे. त्यांनी माफी मागावी.”
आरक्षणाच्या तांत्रिक बाजूवर बोलताना सावंत यांनी मतदारसंघ पुनर्रचना या विषयाला विरोध दर्शवला. “महिला आरक्षण देताना खासदारांची संख्या ८४० करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, ते होईपर्यंत वाट कशाला पाहता? सध्याच्या ५४४ खासदार संख्येतच आरक्षण लागू करून दाखवा, आमच्या पाठिंब्याची हिंमत आहे का?” असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

