मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि मनसे यांना बदनाम करणारी मोठ्ठी राजकीय धुळवड कॉमेडी कलाकार कपिल शर्माच्या ट्विटरमुळे आज माजली . ‘हेच का अच्छे दिन ‘असा सवाल करीत थेट पंतप्रधानांना टॅग करून आणि पैसे मागितल्याचा ठपका ठेवून सेना मनसे ला हलविण्याचा प्रयत्न कपिलने ट्विटरवरून केला आहे .
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने माझ्याकडून ऑफीस बनवण्यासाठी ५ लाखांची लाच मागितली, असा आरोप कपिल शर्माने केला आहे. त्यावर महापालिका दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता मनोहर पवार यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. ट्विटरवर कपिल शर्मा म्हणाला, गेल्या ५ वर्षांपासून मी १५ कोटींचा आयकर भरत आहे. तरी देखील माझे कार्यालय बनवण्यासाठी बीएमसीने ५ लाखांची लाच मागितली तर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये कपिलने ‘हेच आहेत का अच्छे दिन?, असा सवाल करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.
दरम्यान, कपिल शर्माच्या या ट्विटवर बीएमसीच्या पवार यांनी निवेदन दिले आहे. महापालिकेने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबधितावर कठोर कारवाई केली जाईल. ही कारवाई करणे शक्य व्हावे, यासाठी कपिल शर्मा यांनी त्यांना लाच मागणाऱ्याचे नाव सांगावे, अशी विनंती पालिकेने केली आहे.
शिवसेना अणि मनसे या पक्षाचे कार्यकर्तेही पैशांची मागणी करत असल्याचे कपिलने सांगितले आहे. दरम्यान मनसे गट नेते संदीप देशपांडे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, कपिल शर्मा यांनी लाच मागणारे अधिकारी आणि कार्यकर्त्यांची नावे जाहीर करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणविषयी म्हटले आहे कि , कपील शर्मा नशीबवान आहेत, त्यांच्या ट्विटला मुख्यमंत्र्याचे किमान उत्तर तरी आले, आम्ही मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट्राचाराचे सभागृहात आणि सभागृहाबाहेर अनेक वेळा पुरावे देऊनही कारवाई तर सोडा साधे उत्तर ही येत नाही.
दरम्यान कपिल शर्मा या लाचखोरीबद्दल उघडपणे बोलला, त्याबद्दल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.आणि मुंबई महापालिका बरखास्तीची मागणी पुन्हा एकदा केली आहे .
निरुपम कपिल शर्मा प्रकरणी बोलताना म्हणाले, की गेल्या २० वर्षांपासून शिवसेना भाजपची मुंबई महानगरपालिकेत सत्ता असून त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, लाचखोरी आणि घोटाळे सुरू आहेत. शिवसेना आणि भाजप या सगळ्याला संरक्षण देत आहे. या सगळ्याची चौकशी होत नाही. फक्त ठेकेदार आणि इंजिनिअर यांच्यावर ठपका ठेवला जातो. या सर्व घोटाळ्यात व भ्रष्टाचारात शिवसेना व भाजपचे नेते गुंतलेले आहेत. त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचारामध्ये जगात सर्वात मोठी महानगरपालिका आहे, याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे.संजय निरुपम पुढे म्हणाले की मुंबई महानगरपालिका मुंबईतील सर्व सामान्य जनतेला चांगले व खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छता, नाले सफाई, मुबलक पाणी, अशा साध्या पण महत्वाच्या सोयी सुविधा देण्यात संपूर्णतः अपयशी ठरलेली आहे. म्हणूनच मी ६ महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिका बरखास्तीची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा मी मागणी करतो, की ही मुंबई महानगरपालिका त्वरित बरखास्त करावी.