बनावट नियुक्तीपत्रे, दिल्लीतील कथित मेडिकल आणि सरकारी नोकरीची हमी; आठ जणांविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा
पुणे / पिंपरी : केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पोस्ट ऑफिस, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातील विविध पदांवर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून २७ तरुण-तरुणींची तब्बल ४ कोटी ८८ लाख ४३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणात एका महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अभिषेक कुमार अजय निगम, भागवत रामशरण यादव, डॉ. मनोज मधुकर जैन, रजनीश रंजन मुदगल, जनुकराम रामसमु यादव, निरज रमेश श्रीवास्तव यांच्यासह संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२४ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत निगडी, पुणे आणि दिल्ली येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सरकारी नोकरीची हमी देऊन विश्वास संपादन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात वास्तुशास्त्र सल्लागार म्हणून काम करणाऱ्या फिर्यादी महिलेची व्यवसायाच्या निमित्ताने काही व्यक्तींशी ओळख झाली. त्यातून तिची डॉ. मनोज जैन यांच्याशी ओळख करून देण्यात आली.
केंद्रीय मंत्रालयांमध्ये आपली ओळख असून पोस्ट ऑफिस, FCI आणि रस्ते वाहतूक मंत्रालयातील विविध पदांवर नोकरी मिळवून देता येईल, असा दावा करण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
यानंतर फिर्यादीसह तिचे नातेवाईक आणि परिचित अशा अनेक उमेदवारांकडून नोकरीच्या प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर पैसे घेण्यात आल्याचा आरोप आहे.
दिल्लीतील रुग्णालयात मेडिकल; नियुक्तीपत्रेही पाठवली
उमेदवारांचा विश्वास बसावा यासाठी काही जणांना दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतर उमेदवारांना FCIमधील स्टॉक इन्स्पेक्टरसह विविध पदांवर निवड झाल्याचे सांगणारी नियुक्तीपत्रे पाठवण्यात आली. त्यावर संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या कथित सह्या आणि शिक्के असल्याने सुरुवातीला उमेदवारांचा विश्वास बसल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
काही उमेदवारांना प्रशिक्षणाच्या नावाखाली दिल्लीतील ठिकाणी बोलावून बायोमेट्रिक स्वरूपाची प्रक्रिया केल्याचा आभासही निर्माण करण्यात आल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
नियुक्तीपत्रे बनावट असल्याचा संशय
बराच कालावधी उलटूनही प्रत्यक्ष नोकरीवर रुजू करून घेतले जात नसल्याने उमेदवारांना संशय आला. संबंधितांकडे वारंवार विचारणा करूनही वेगवेगळी कारणे सांगण्यात आल्याचा आरोप आहे.
अखेरीस मिळालेली नियुक्तीपत्रे आणि नोकरीची संपूर्ण प्रक्रिया बनावट असल्याचे लक्षात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. पैसे परत मागितल्यानंतर धमक्या मिळाल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
२७ जणांकडून ४.८८ कोटी घेतल्याचा आरोप
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, विविध सरकारी पदांवर नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली एकूण २७ उमेदवारांकडून ४ कोटी ८८ लाख ४३ हजार ५०० रुपये घेतल्याचा आरोप आहे.
या टोळीने यापूर्वीही अन्य सरकारी विभाग अथवा सैन्य भरतीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
फिर्यादीने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिल्यानंतर प्राथमिक चौकशी करून गुन्हा नोंदविण्यात आला.
आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला
आरोपींच्या तांत्रिक विश्लेषणातून काही संशयित दिल्ली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेचे पथक दिल्लीमध्ये आरोपींचा शोध घेत आहे.
या प्रकरणात नेमकी किती बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली, सरकारी कार्यालये किंवा रुग्णालयातील कोणाचा प्रत्यक्ष सहभाग होता का, तसेच जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांचा पुढे कसा वापर करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.

