पुणे : ”अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक, तसेच प्रात्यक्षिक ज्ञान घेणे खूप गरजेचे आहे. अभियंत्यांसाठी विविध पदांकरीता सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. परंतु माहितीअभावी अभियंते या क्षेत्राकडे वळत नाहीत. केवळ खाजगी नोकऱ्या करण्यापेक्षा प्रशासकीय सेवांमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासकीय सेवेत आलात, तर देशासाठी काम करण्याची संधी, सर्व सोयी, योग्य वेतन आणि उच्चपदापर्यंत जाण्याची संधी मिळू शकते,” असे मत इन्फिनिटी अकॅडमीचे संचालक गिरीश खेडकर यांनी व्यक्त केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनियर्स पुणे स्थानिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभियंत्यांना प्रशासकीय सेवेत उपलब्ध संधी’ या विषयावरील व्याख्यानात खेडकर यांनी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी आणि पालकांसोबत संवाद साधला.दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या फिरोदिया सभागृहातझालेल्या या कार्यक्रमाला मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सराफ, कार्यकारिणी सदस्य विनय र र, दिपाली अकोलकर आदी उपस्थित होते.
गिरीश खेडकर म्हणाले, ”जनतेची आणि देशाची सेवा करायची असेल, तर प्रशासकीय सेवेत यावे. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर साधारण दोन ते तीन वर्ष सातत्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. सरकारी नियतकालिके, वर्तमानपत्र, ऑनलाईन पोर्टल या माध्यमातून परीक्षांची माहिती करून घ्यावी. अभियंत्रिकी क्षेत्रासाठी विविध संधी आहेत पण त्या मिळवायच्या कशा याची माहिती नाही. अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा उपयोग प्रशासकीय सेवेसाठी करावा तसेच पुस्तकी अभ्यासासोबत प्रात्यक्षिक, व्यावहारिक ज्ञान, सामान्य ज्ञान, कायदा याचा अभ्यास करावा. शाळा माहाविद्यालयांनीही स्पर्धा परिक्षांबद्दल माहिती द्यावी. सोशल मीडियाचा अतिरेक टाळून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहेत, त्यांनी त्या ओळखून प्रयत्न करावेत. त्यांनी त्याची स्वप्न आणि घ्येय मोठी ठेवावी आणि ती मिळवण्यासाठी उत्तमरीत्या काम करावे.”
राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, ”प्रशासकीय सेवेत गेलेले अनेक अधिकारी हे अभियंते आहेत. रेल्वे, मरिन इंजिनियर, एनव्हायरमेंटल इंजिनिअर, स्वच्छ भारत मिशन, विमान विभाग, बँक म्युन्सिपल कौंसिल आदी विविध सेवांसाठी अभियंत्यांना नोकऱ्या उपलब्ध आहेत. तसेच विविध सरकारी योजना राबविण्यासाठी देखील चांगल्या अभियंत्यांची गरज आहे. त्या विद्यार्थ्यांनी माहिती करून प्रशासकीय सेवांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत.” दिपाली अकोलकर यांनी आभार मानले.