दहशतवादी कारवायांचे आरोप खोटे :इंद्रेशकुमार यांचे प्रतिपादन -राज्यपालांच्या हस्ते इंद्रेशकुमार यांचा सत्कार
पुणे :
”आपल्यावरील दहशतवादी कारवायात सहभागी असल्याचे आरोप खोटे असून पूर्वीच्या सरकारला कोणताही साक्षी पुरावा देता आला नाही ,तपासी यंत्रणांनाही कोणताही पुरावा देता आला नाही ,कारण हे आरोपच खोटे होते ‘असे प्रतिपादन राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांनी केले .
आंतरराष्ट्रीय स्तरावर इंद्रेशकुमार यांना ‘ग्लोबल पीस अवॉर्ड ‘ प्राप्त झाल्याबद्दल शहीद अशपाक उल्लाह खान मेमोरियल ट्रस्ट आयोजित सत्कार कार्य्रक्रमात ते बोलत होते . पुणेरी पगडी ,मानपत्र देऊन राज्यपालांनी त्यांचा सत्कार केला .
‘आपल्यावर ७ ठिकाणी चालू असलेले खटले खोट्या तक्रारींवर आधारित आहेत . तपासी यंत्रणांना आपले नावही घेता आले नाही आणि पुरावेही देता आलेले नाहीत. लवकरच या खटल्यातील साक्षी पूर्ण होतील ‘
‘ या सत्काराला जाऊ नये असे सांगणारे दोन -तीन कागद माझ्यासमोर आले होते , मात्र इंद्रेशकुमार आणि अशपाक उलाह मेमोरियल ट्रस्ट यांच्यासाठी आपण कार्यक्रमाला आलो’ असे राज्यपाल सी . विद्या सागर राव यांनी सांगितले .
राज्यपाल म्हणाले ,’देशाच्या स्वातंत्र्याबरोबर हैद्राबाद मुक्ती लढ्यातही हिंदू -मुस्लिमांनी एकत्रित योगदान दिले आहे . अशा अनेक शहिदांचे स्मरण करणे गरजेचे आहे . देशात हिंदू -मुस्लिम ऐक्य टिकविण्याची गरज आहे . ‘
सत्काराला उत्तर देताना इंद्रेशकुमार म्हणाले ,’स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसऱ्यांच्या धर्माचा आदर राखावा ,देशात भाईचारा राखल्यावर आपण देशाला दंगा मुक्त करू शकतो .
पुण्याचे बिशप थॉमस डाबरे ,विराग पाचपोर ,डॉ इसहाक बिराजदार ,डॉ एस एन सुरेंद्र कुमार यांनी विचार व्यक्त केले .
ट्रस्टचे संस्थापक लतीफ मगदूम यांनी प्रास्ताविक केले . प्रा . उषा परदेशी , रुमाना शेख यांनी सूत्र संचालन केले . इरफान अली पिरजादे यांनी आभार मानले .शनिवारी सायंकाळी गरवारे महाविद्यालयाच्या असेम्ब्ली हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला मोठी गर्दी होती .