Home Blog Page 76

डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वीकारला ‘पीएमआरडीए’च्या महानगर आयुक्तपदाचा पदभार!

  • पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाला गती देणार: डॉ. अभिजीत चौधरी

पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) नूतन महानगर आयुक्त म्हणून डॉ. अभिजीत चौधरी (IAS) यांनी सोमवारी (दि.9) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. चौधरी यांनी पुणे महानगर क्षेत्राच्या सुसूत्र नियोजनासह रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, सहआयुक्त (प्रशासन) रुपाली आवले-डंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे व अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी डॉ. चौधरी यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसर, तसेच ग्रामीण भागातील वाढत्या शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून प्रभावी पावले उचलली जातील, असे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “पुणे रिंग रोड, हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि टाऊन प्लॅनिंग स्कीम्स (टीपीएस) या महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर आमचा भर असेल. तसेच नदी सुधार प्रकल्पासह आयटी आणि औद्योगिक क्षेत्रातील वाहतूककोंडीची समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल. भूसंपादन तसेच परतावा जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, ते समन्वयाने मार्गी लावले जातील.”

डॉ. अभिजीत चौधरी यांचा प्रशासकीय सेवेतील १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पाहता, त्यांच्या नेतृत्वाखाली ‘पीएमआरडीए’च्या प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भविष्यातील समृद्ध, उद्योगक्षम आणि राहण्यायोग्य ‘सर्वांगसुंदर महानगर’ घडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

पुणे महापालिकेचा १३,९५५ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर

पुणे : पुणे महापालिकेचा २०२६- २७ चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला आहे.
यावेळी महापौर मंजुषा नागपुरे , सभागृहनेते गणेश बिडकर ,स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसचिव योगिता भोसले
उपस्थित होते , स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यांना पुणे महापालिका आयुक्त यांनी १३ हजार९५५ कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर केलं आहे.

पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे भव्य बजेट स्थायी समितीला सादर केले आहे. या बजेटमध्ये रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आला असून, सर्वाधिक २०७७ कोटींचा निधी पाणीपुरवठा विभागासाठी राखीव ठेवला आहे. शहरातील जुनी पाईपलाईन बदलण्यासह खड्डेमुक्त रस्ते आणि वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने मोठी तरतूद केली असून, यामुळे प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची चिन्हं आहेत.

कोणत्या विभागाला किती निधी?
पाणीपुरवठा – २०७७ कोटी: पुणे महानगरपालिकेकडून सर्वात जास्त निधीची तरतूद पाणीपुरवठा विभागासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे जुनी पाईपलाइन आणि अपुरा पाणीपुरवठा याचा त्रास पुणेकरांना कमी होणार आहे.
पथ विभाग – १८६६ कोटी
पुणे शहरातील खड्डे आणि खराब रस्ते यासाठी १८६६ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असून रस्त्यांचे नूतनीकरण करून पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
घनकचरा व्यवस्थापन – १३९० कोटी
महानगरपालिकेच्या निधीच्या तरतुदीत स्वच्छ पुणे साठी वाव देण्यात आला आहे. त्यामुळे अपुरी स्वच्छता, गल्ल्यांमध्ये कचरा न दिसता स्वच्छ शहर आणि आरोग्य सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

मलनिस्सारण प्रकल्प – १२१६ कोटी
शहरातील जुने मलनिस्सारण, पाणी साचणे या समस्या आता कमी होऊन पावसाळ्यात पूराचा धोका कमी होईल, जलवाहिन्यांची सुधारणा होईल याची पुणेकरांना अपेक्षा आहे.
वाहतूक नियोजन – ७४० कोटी: पुण्यातील सर्वांनाच त्रासदायक ठरणारी ट्रॅफिक जाम समस्या अपुरी बस सेवा अशा वाहतुकीच्या समस्या कमी होऊन प्रवासाचा वेळ कमी, वाहतूक सुकर होण्याची पुणेकर अपेक्षा करत आहेत.

प्राथमिक शिक्षण – ९७९ कोटी: शहरातील जुनी शाळा, अपुऱ्या सुविधा कमी होऊन पुणेकरांना सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण मिळेल याची अपेक्षा आहे.

याशिवाय भवन रचना – ६५० कोटी, विद्युत – २६५ कोटी, समाज विकास – १४३.५० कोटी, उद्यान – २०५ कोटी, आरोग्य – ८८ कोटी, नगर रचना नियोजन – ६४.५० कोटी, पर्यावरण – ५१.५९ कोटी, माहिती व तंत्रज्ञान – ५६.७३ कोटी, हेरिटेज सेल – २८.५० कोटी, सांस्कृतिक केंद्र – १७१.३१ कोटी अशा निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या निधीमुळे जुनी इमारती दुरुस्त होतील, वीज पुरवठा सुधारेल, सार्वजनिक सुविधा वाढतील, उद्याने आणि सांस्कृतिक केंद्रांचा दर्जा सुधारेल, आरोग्य सुविधा आणि पर्यावरणीय उपाय सुधारले जातील.

या अंदाजपत्रकातून पुणेकरांना पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सांस्कृतिक सुविधा सुधारण्यासाठी मोठा फायदा मिळणार आहे. जुनी समस्या हळूहळू कमी होऊन नागरिकांना वास्तविक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

प्रदूषण आणि ट्रॅफिक जामला लगाम म्हणून राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांवर ब्रेक:सरकारचा गजब फतवा

मुंबई-वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषण या गंभीर समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आज म्हणजेच 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळाशी चर्चा करून आणि स्पष्ट कार्यपद्धती म्हणजेच एसओपी तयार केल्यानंतरच पुढे नवीन परवाने देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सध्या राज्यभरात नवीन ऑटो रिक्षा परवाने मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होत असून ट्रॅफिक जामची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये रिक्षांची संख्या प्रचंड वाढल्याने वाहतूक व्यवस्थापन अधिक कठीण झाले आहे. शहरांमधील रस्त्यांची क्षमता आणि वाहनांची वाढती संख्या यामध्ये मोठा तफावत निर्माण झाल्यामुळे काही काळासाठी नवीन परवाने देण्याची प्रक्रिया थांबवणे आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे.

या निर्णयाबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतररस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्य सरकारला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019) अंतर्गत राज्य सरकारला वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी आवश्यक अधिकार देण्यात आले आहेत. तसेच मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 67 (3) नुसार राज्य सरकारला प्रवासी आणि मालवाहतुकीसंबंधी परवाने बदलण्याचा तसेच विविध योजना राबवण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचा वापर करून वाहतूक कोंडी कमी करणे, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि शहरांमधील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करणे शक्य असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

सरनाईक यांनी पुढे सांगितले की, सध्या राज्यभरात सुमारे 14 लाख ऑटो रिक्षा परवाने वितरित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना रिक्षा परवाने देण्यात आल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये बांगलादेशी नागरिकांनाही अवैध पद्धतीने परवाने मिळाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून परवाना प्रणाली अधिक पारदर्शक आणि नियंत्रित करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शहरांमधील स्थानिक परिस्थिती, वाहतुकीच्या गरजा आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे. लवकरच स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच एसओपी निश्चित करण्यात येईल. मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानंतर आणि नवीन धोरण अंतिम झाल्यानंतरच राज्यात पुन्हा ऑटो रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

पुणे महापालिकेत येणार १० स्वीकृत नगरसेवक .. माजी महापौरांनाही संधी

पुणे- बदलत्या राजकारणाच्या प्रवाहात आता महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजप , राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी आपापल्या संख्याबळानुसार वारीस्थांनी मान्यता दिलेल्या नावांची शिफारस महापालिका आयुक यांच्याकडे केली आहे .

भाजपने ७ स्वीकृत नगरसेवकांच्या पदासाठी दिलेली नावे अशी … निलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे,राजेंद्र काकडे,रवि साळेगावकर,जयप्रकाश पुरोहितआणि उदय लेले

राष्ट्रवादी पक्षाकडून २ स्वीकृत नगरसेवकांची नावे देण्यात आली आहेत . ज्यात माजी महापौर दत्ता धनकवडे आणि राकेश कामठे यांचा समावेश आहे. धनकवडे यांना महापौर पदानंतर देखील स्वीकृत सदस्य होण्याची संधी केवळ अनुभवी सदस्य सभागृहात असावेत यासाठी दिल्याचे सांगण्यात आले.

तर कॉंग्रेस पक्षाकडून इंटकचे सुनील शिंदे यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

भाजपचे नेते महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी भाजपची तर राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महापालिकेतील विरोधी पक्ष नेते निलेश निकम आणि शहर अध्यक्ष माजी आमदार सुनील टिंग रे यांनी राष्ट्रवादीची नावे जाहीर केली तर कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते चंदूशेठ कदम यांनी कॉंग्रेसच्या एका उमेदवाराचे नाव जाहीर केले .

 तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील व  PI संगीता रोकडे  या महिला अधिकाऱ्यांच्या  कणखर भूमिकेमुळे पूर्वापार वहिवाटीचा रस्ता शेतकऱ्यांसाठी अखेर खुला

६ वर्षांच्या प्रदीर्घ वादानंतर, कायदेशीर लढाईनंतर शितोळे वस्तीमधील  शेतकऱ्यांसाठी दिलासा
तहसीलदार कोलते यांनी गुडघाभर चिखलात उतरून केली स्थळपहाणी, तब्ब्ल १ किलोमीटर फिरून सर्व पाहणी

वहिवाटीचा रस्ता खुला करताना महिलांना पुढे करुन महिला पोलिसांना धक्काबुक्की

पुणे:

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील थेऊरजवळील मौजे कोलवडी गावातील शितोळे वस्ती येथे गट क्र. १६८ मधील पूर्वापार वहिवाटीचा  ६ वर्षांपासून बेकायदेशीररित्या बंद असलेला रस्ता मामलेदार कोर्टाच्या आदेशानंतर खुला करण्यास लोणीकंद पोलिसांना यश आले आहे.तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील व  पोलीस निरीक्षक संगीता रोकडे  या महिला अधिकाऱ्यांच्या  कणखर भूमिकेमुळे पूर्वापार वहिवाटीचा रस्ता शेतकऱ्यांसाठी अखेर खुला झाला.महिला पोलिसांना चावून,लाथ मारून,धक्काबुक्की, झटापट करून शासकीय कारवाईत अडथळा आणणाऱ्या महिला आणि अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ही कारवाई सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी ५ वाजता संपली.६० एकरातील १५ हून अधिक  शेतकऱ्यांच्या वहिवाटीला एकाच कुटुंबाने बेकायदेशीर अडथळा निर्माण केला होता.

या रस्त्यावरून ऍड.मंगेश ससाणे,अमोल ससाणे,योगेश ससाणे,प्रमोद शितोळे,प्रकाश शितोळे,सतिश बोरकर,राजेंद्र बोरकर,मधुकर हरगुडे,चेतन काळभोर,दत्तात्रय काळभोर,सूर्यकांत शितोळे यांसह अनेक शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी अवलंबून होते.मात्र किरण शितोळे,अमर उर्फ बाबा शितोळे  यांच्या कुटुंबाने लोखंडी गेट लावून रस्ता बंद केला होता,रस्त्यात आंब्याची लागवड करून मे २०२१ मध्ये रस्ता अडवला होता.त्यानंतर प्रमोद शितोळे,ऍड.मंगेश ससाणे,योगेश ससाणे,सतीश बोरकर,चेतन काळभोर यांनी मामलेदार कोर्टात सेक्शन ५ अंतर्गत रस्ता खुला करण्यासाठी दावा दाखल केला,मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ कलम ५ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम १४३ अंतर्गत दाखल दाव्यात तहसिलदार/उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थळपहाणी अहवाल,गुगल नकाशा,पीएमआरडीए  नकाशा,साक्षीदारांच्या ऍफिडेव्हिट यांच्या आधारे रस्ता अस्तित्वात असल्याचे आणि अडथळा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.२०२१-२२ मध्ये रस्ता खुला करण्याचे आदेश पारित झाले, त्यानंतर प्रांताधिकारी यांचेकडे केलेले  रिव्हिजन अर्ज  फेटाळले गेले.

त्यानंतर आजपर्यंत ४ वेळा रस्ता खुला करण्याची अंमलबजावणीची नोटीस निघाली, परंतु काही न काही कारणामुळे अंमलबजावणी झाली नाही, याचा प्रचंड त्रास बाधित शेतकऱयांना ५ वर्ष सोसावा लागला.६ मार्च रोजी २०२६ मध्ये तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी स्वतः गुडघाभर चिखलात उतरून पूर्ण क्षेत्राची पाहणी केली. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून समेट घडवण्याचा प्रयत्न केला.मात्र किरण शितोळे आणि त्यांच्या कुटुंबाने कायदा व सुव्यवस्था न मानता, गावातील वरिष्ठ मंडळी, पोलीस पाटील, सरपंच, तहसीलदार यांचे न ऐकता पर्यायी मार्गाचा प्रस्ताव फेटाळले  व आडमुठे धोरण घेतले. नदीकाठचा पर्यायी मार्ग धोकादायक असल्याचे सांगूनही ऐकले नाही. कारवाई सुरु झाल्यावर घरातील महिलांना पुढे केले, रस्त्यावर झोपायला लावले  यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत काही महिलांसह गुन्हे दाखल झाले.हे करताना किरण शितोळे याने  ” कारवाई केली तर गुन्हे दाखल करू, मंत्रालयात जाऊ, मंत्र्यांना  बोलतो, प्रेस मध्ये देतो, झाडे  काढली तर हरित लवादात जाणार.. अशा धमक्या प्रशासकीय कर्मचारी,मंडल अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक,तहसीलदार यांना दिल्या.

त्या धमक्याना न जुगारता तहसीलदार तृप्ती कोलते,लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता रोकडे या महिला अधिकाऱ्यांनी कणखर व रोखठोक भूमिका घेत रस्ता खुला करण्याचे काम पोलीस संरक्षणमध्ये चालू ठेवले, कोलवडी गावचे तलाठी स्वामी , मंडल अधिकारी जाधव  यांच्या देखरेखीमध्ये हे काम झाले.रात्री बारानंतर पुन्हा किरण शितोळे याने घरातील महिलांना पुढे करून काम थांबवले, महसूल अधिकारी व पोलिसांन धमक्या दिल्या याचे  सर्व चित्रीकरण पोलिसांनी करुन घेतले, त्यानुसार पहाटे ३ वाजता लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणला म्हणून किरण शितोळे, बाबा शितोळे,यशोदा अमर शितोळे, पूनम किरण शितोळे, मैत्रेयी  अमर शितोळे,रोहिणी शशिकांत घोरपडे यांचेवर मंडल अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला.

सकाळी सर्वाना लोणीकंद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी  ताब्यात घेतले व त्यानंतर पुन्हा रस्ता  खुला करण्याचे काम पोलीस बंदोबस्त मध्ये सुरु केले.संध्याकाळी हा  रस्ता खुला झाला. ५ वर्षांपासून बंद असलेला रस्ता आता शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे उपलब्ध होणार आहे. प्रभावित शेतकरी हे तृप्ती कोलते-पाटील यांच्या त्वरित आणि निष्पक्ष कारवाईचे क्षेत्रातून कौतुक करत आहेत.तसेच लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संगीता रोकडे,पोलीस निरीक्षक सुरवसे,पोलीस निरीक्षक दिलीप पालवे,पोलीस निरीक्षक अर्जुन बेलगुडे, पोलीस निरीक्षक वंजारी, स्वप्नील जाधव व सर्व स्टाफ यांनी यासाठी मोलाची भूमिका बजावली.”हा शेतकऱ्यांचा खरा विजय आहे,” असे  शेतकऱ्याने सांगितले.आज रस्ता सुरु करण्याची कारवाई झाली, रस्ता सुरु झाला.. पण त्यानंतर सदर किरण शितोळे व कुटुंबातील व्यक्तींनी  हा रस्ता परत बंद केला नाही पाहिजे असं मत व शंका  शेतकऱ्याच्या मनात आहे, किरण शितोळे हा गुंडगिरी प्रवृत्ती चा दमदाटी करणारा असल्याने शेतकरी साशंक आहेत.

पण गटातील शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी अडवणूक केली तर  तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश तृप्ती कोलते यांनी दिलेले आहेत.तसेच पोलीस निरीक्षक रोकडे यांनी संबंधित व्यक्तींना परत अडवणूक केली तर सक्त कारवाई करणार अशी ताकीद  दिलेली आहे.

आगीतून उडी घेणारे अश्व आणि अश्वारोहक…ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील अश्वारोहणाच्या रोमांचक प्रात्यक्षिकांचा थरार

पुणे : शो जम्पिंग ची चित्तथरारक प्रात्यक्षिके… आगीतून उडी घेणारे अश्व आणि अश्वारोहक… पारंपरिक युद्धकौशल्य असलेल्या टेंट पेगिंग चा थरार यांसह घोड्यांचा इतिहास, शौर्य आणि आधुनिक क्रीडा यांचा अद्भुत संगम पुणेकरांनी अनुभवला. सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर अश्वारोहण साहसी प्रात्यक्षिके पाहण्यासाठी स्काऊटच्या बालवीरांसह नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. 

श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाच्या वतीने पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर अश्वारोहण साहसी प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अॅकॅडमीतील सदस्यांनी यावेळी सादरीकरण केले. अकॅडमी चे प्रमुख गुणेश पुरंदरे यांचा स्वागत सन्मान ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आला. 

गुणेश पुरंदरे म्हणाले, लहानपणीच्या लाकडी घोड्यापासून ते लग्नाच्या वेळी नवरदेवाच्या वरातीतील घोड्यापर्यंत घोडा आजही आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परंपरेचा इतिहास आणि आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील अश्वारोहण यांची रोमांचक प्रात्यक्षिके सामान्यांना अनुभवायला मिळाली. 

सादरीकरणामध्ये घोडेस्वारी कशी करतात, घोड्यांच्या वेगांचे विविध प्रकार, आधुनिक काळातील अश्वरोहणाचे महत्त्व, शो जंपिंग, टेंट पेगिंग यांसह आगीतून उडी मारण्याचे प्रात्यक्षिक देखील यावेळी दाखविण्यात आले. अश्वारोहणाबद्दल लहान मुलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना देखील यावेळी माहितीपर उत्तरे देण्यात आली. 

पारंपरिक वेशात राजपूत महिलांचा ‘होली मिलन’ उत्सव साजरा

पुणे : पारंपरिक राजपूत वेशात सजलेल्या महिलांनी होळी मिलन कार्यक्रमात रंग, संस्कृती आणि परंपरेची अनोखी झलक साकारली. गीत-नृत्य, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उपस्थित महिलांनी रंगोत्सवाचा उत्साहात आनंद साजरा केला.

समस्त राजपूत महिला संघ, पुणे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त होली मिलन कार्यक्रमाचे आयोजन सहकारनगर जवळील सुरभी मंगल कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष मीनल यज्ञदत्तसिंह हजारे, पदाधिकारी पूनम परदेशी, अंजली परदेशी, पूनम हजारे, सरिता कनोजिया, श्रुती किराड व सहकारी उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत, महिलांनी पारंपरिक गीत आणि लोकनृत्य सादर केले. कार्यक्रमात विविध खेळ देखील घेण्यात आले.

मीनल हजारे म्हणाल्या, महिलांनी सशक्त बनत असताना आपल्या संस्कृतीचे जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांवर उत्तम संस्कार करण्यासाठी प्रत्येक स्त्रीने जिजाऊंचा आदर्श घ्यावा आणि समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा सामना करण्यासाठी झाशीची राणी व राणी पद्मिनी यांच्यासारखे धैर्य दाखवा, असेही त्यांनी सांगितले.

पूनम परदेशी म्हणाल्या, संस्थेच्या वतीने सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबवणे आणि राजपूतांचा गौरवशाली इतिहास, परंपरा व शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी ‘सावन मिलन’ कार्यक्रम, तलवारबाजी शिबीर तसेच विविध समाजसुधारकांची व्याख्याने असे विविध उपक्रम  राबविले जातात, असेही त्यांनी सांगितले.

नागालँडमधील महिलेकडून “ओपल स्पा अॅण्ड सलुन”च्या नावाने कोंढव्यात वेश्याव्यासाय: ४ मुलींची सुटका

0

पुणे – कोंढव्यातील NIBM रस्त्यावर “ओपल स्पा अॅण्ड सलुन” सुरु करून त्याद्वारे महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या नागालँडमधील महिलेला पकडूनती च्या ताब्यातून वेश्याव्यवसायतुन ०४ मुलींची सुटका पुणे पोलिसांनी केली आहे.
काल ०७/०३/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून “ओपल स्पा अॅण्ड सलुन” सर्वे नं २२/२/बी, एस-३, सनश्री वुडस कर्मशिअल प्रिगायसेस बिल्डींग, एन.आय.बी.एम. कोंढवा पुणे येथे स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली महिलांकडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असले बाबत गोपनिय बातमी प्राप्त झाली. या बाबत पोलीस निरीक्षक छगन कापसे, अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहकाचे साह्याने या बाबतची खात्री करुन “ओपल स्पा अॅण्ड सलुन” येथे अचानक छापा टाकुन महिला आरोपी १) टी झुंचुमबीनी थम्फीयोलोथा खितान वय ३२ धंदा स्पा मॅनेजर रा, लेन नं ०५, फ्रेकीज बिल्डींग, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे मुळ पत्ता २८, थांयंपो, यंपीसरा, भंडारी वोखा, राज्य नागालँड, हिला पकडून तिने तिच्या एका पुरुष सहकाऱ्याच्या मदतीने वेश्याव्यवसायासाठी “ओपल स्पा अॅण्ड सलुन” मध्ये आणलेल्या ०४ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.संबधित पुरुष आरोपी चा पोलीस शोध घेत असून दोन्ही आरोपीं विरुध्द दि.०७/०३/२०२६ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १५९/२०२६ भा.न्या.सं १४३ (१) (३), ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५, प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे.
हि कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार दत्ताराम जाधव, बबनराव केदार, भुजबळ, अविनाश कोडे तसेच महिला पोलीस अंमलदार खेडेकर यांनी केली आहे.

स्त्री सन्मानासाठी संघर्षाची गरज; अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरा-मुक्‍ता मनोहर

पुणे- ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकारणातील विविध कंगोरे समोर आल्यावर जग सुन्न झाले आहे. जगभरातील बलाढ्य देशातील तथाकथीत प्रतिष्ठीत व्यक्‍तींनी मुली, महिलांवर अत्याचार केले आहेत. बदलापूरमध्ये स्त्री बीजे विक्री होत असल्याचे समोर आले आहे. यात महिलांचे वर्गीकरण करुन स्त्री बीजांची किंमत ठरवण्यात आली आहे. हा बाजार स्त्रियांच्या देहा पर्यंत येणे हे खुप संतापजनक आहे. सध्या एकनिष्ठा, प्रमाणिकपणा आणि न्याय हे सर्व विकायला काढण्यात आली आहे अशी खंत कामगार नेत्या व लेखिका मुक्ता मनोहर यांनी व्यक्‍त केली.

महिलांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले पाहिजे तरच न्याय मिळेल, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील गांधी भवन येथे रविवारी 29 वे ‘गांधी दर्शन शिबिरात ’ ‘जागतिक महिला दिन आणि स्त्रीमुक्ती चळवळ’ हा कार्यक्रम पार पडला. शिबिराच्या उद्घाटन सत्रात कामगार नेत्या व लेखिका मुक्ता मनोहर यांचे ‘जागतिक महिला दिन आणि स्त्रीमुक्ती चळवळ’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी लेखिका व कवयित्री डॉ. सिसिलिया कार्व्हालो, स्त्री आणि लिंगभाव अभ्यासक प्रा. संजयकुमार कांबळे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सदस्य सचिव अन्वर राजन, प्रविण सप्तर्षी, अंजली देशमुख, ज्ञानेश्‍वर मोळक, मधुकर गायकवाड आदींची उपस्थिती होती. मुक्‍ता मनोहर म्हणाल्या, रामरहीम आसाराम बापू यांच्या विरोधात काही महिला पुढे आल्याने अनेक महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे अन्याय, अत्याचार होत असल्यास महिलांनी पुढे आले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाचा आढावा घेतला. समाजातील समानता, स्वातंत्र्य आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी स्त्री चळवळीचे महत्त्व अनेक उदाहरणासह स्पष्ट केले. अमरिकेत महिला त्यांच्या हक्‍कासाठी रस्यावर उतरल्या. अनेक वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला, तेव्हा त्यांना न्याय मिळाला. महिलांनी उच्च शिक्षित होण्याबरोबर वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून जगले पाहिजे. त्यांनी आपले अज्ञान दूर करुन महिलांना जागृत केले पाहिजे. कंत्राटी कामगार महिलांना त्यांचे हक्‍काचा मोबदला मिळाला पाहिजे. नव्या युगात आपण बेजबाबदारपणे वागत आहोत. महिलांना असंख्य आव्हानाचा सामना करावा लागणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. 1857 ते 2024 पर्यंत झालेल्या महिलांच्या लढ्यांविषयी त्यांनी माहिती दिली.

लेखिका व कवयित्री डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी ‘स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू’ या विषयावर बोलताना त्यांच्या काव्य, नेतृत्व आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती दिली. त्या संविधान समितीतील १५ महिला सदस्यांपैकी एक होत्या. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य नेत्या, प्रभावी वक्त्या आणि प्रतिभावान कवयित्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरोजिनी नायडू यांनी स्वातंत्र्य, स्त्रीसमानता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या काव्यप्रतिभेमुळे त्यांना महात्मा गांधी यांनी गान कोकीळ अशी उपाधी त्यांनी दिली. यासह त्यांना त्यांच्या कार्यामुळे अनेक उपाध्या मिळाल्या आहेत.

त्यांनी लहानपणापासून साहित्य आणि सामाजिक प्रश्नांमध्ये रस दाखवला. त्यांच्या काव्यसंग्रहांनी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. अनेक भारतीय भाषांसह परेदशी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सरोजिनी नायडू स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाल्या. त्यांनी देशभर फिरून स्वातंत्र्य, स्त्रियांचे अधिकार आणि सामाजिक सुधारणा यासाठी जनजागृती केली मीठ सत्याग्रहासह विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकेमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला.

समारोप सत्रात स्त्री आणि लिंगभाव अभ्यासक प्रा. संजयकुमार कांबळे यांनी ‘दक्षिण आशियातील पुरुषसत्तेचे स्वरूप : स्त्रीवादी आकलन’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, भारतातीलच नाही तर एकूण दक्षिण आशियातील स्त्री चळवळीत राज्य व्यवस्था आणि समाज व्यवस्थेला काही प्रश्‍न विचारले आहेत. पुरुषसत्ता, वसाहतवाद, भांडवलशाही आणि धर्मवाद हे स्त्रीवादापुढे आव्हान आहेत. जुने प्रश्न जसेच्या तसे आहेत आहेत आणि त्यात नवीन प्रश्‍नांची भर पडत आहे. हिंसेला विरोध करुन समता आणि न्यायाला महत्त्व द्यावे लागेल. आधुनिकतेसाठी प्रज्ञाशील आणि करुणा यावर आधारित भूमिका घ्यावी लागेल. दक्षिण आशियातील सामाजिक रचना, संस्कृती आणि परंपरांमधील पुरुषसत्ताकतेचे स्वरूप प्रा. कांबळे यांनी स्पष्ट केले.

सुरज कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि आभार मानले. सुत्रसंचालन अरुणाताई तिवारी यांनी केले. शिबिराला विविध क्षेत्रातील नागरिक, अभ्यासक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सोन्याच्या आमिषाने 1.34 कोटींची लुबाडणूक:जोडप्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


पुणे-पुण्यात स्वस्त सोने देण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ महिलेची १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५) आणि रुपाली हेमंत खरोटे (वय ३८, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज भागातील एका सोसायटीत राहतात आणि त्यांची आरोपींशी ओळख होती. दोन वर्षांपूर्वी आरोपी दाम्पत्याने त्यांना स्वस्तात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी महिलेला मोबाईलवरून सोन्याचे बिस्कीट आणि दागिन्यांची छायाचित्रे पाठवली.आरोपींनी महिलेला सांगितले की, सध्या सोन्याचा दर कमी आहे आणि येत्या काही दिवसांत तो वाढणार आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांनी महिलेला आणि त्यांच्या पतीला गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

या आमिषाने महिलेकडून वेळोवेळी १ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपये घेतले. आरोपींनी त्यांना केवळ ७ लाख २३ हजार रुपयांचे सोने आणि ७ लाख ९० हजार रुपये परत दिले. उर्वरित रक्कम किंवा स्वस्त सोने त्यांना मिळाले नाही.परतावा न मिळाल्याने ज्येष्ठ महिला आणि त्यांच्या पतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी दाम्पत्याने १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. भोसले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेनेतर्फे लाडक्या बहिणींचा सन्मान

षण्मुखानंद सभागृहात भव्य कार्यक्रम; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई.दि.८: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षाच्या वतीने आज षण्मुखानंद सभागृहात लाडक्या बहिणींचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. याच षणमुखानंद सभागृहातून मुंबईवर भगवा फडकविण्याचा संकल्प शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता आणि त्याप्रमाणे भगवा फडकविला गेला. अनेक कटकारस्थाने झाली, पण शिंदे साहेबांचे नेतृत्व त्यावर मात करून उरले.”
डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “नावाच्या पुढे आईचे नाव लावणे या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने करून दाखवली. आईला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे खरे काम या सरकारने केले आहे. कोणी अडचणीत असेल तर मदतीला धावून जाणारी ही शिवसेना आहे, हे शिंदे साहेबांनी वारंवार सिद्ध केले आहे. पेहलगाम हल्ला, दुबईत अडकलेले नागरिक यांच्या मदतीला शिंदे साहेब स्वतः गेले.”

महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “मुंबई महापालिकेच्या समित्यांवर महिलांची नेमणूक करण्यास शिंदे साहेबांनी प्राधान्य दिले. पहिल्यांदाच बेस्ट समितीवर महिलेला अध्यक्षपदी नेमून ऐतिहासिक निर्णय घेतला. अत्यंत सामान्य घरातील ज्योती वाघमारे या भगिनीला राज्यसभेवर संधी देऊन खासदार बनविले. माझ्यासारख्या मध्यम वर्गातील महिलेला उपसभापती पदाची संधी दिली. अनेकांनी हे पद जावे यासाठी प्रयत्न केले, पण शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे ते पद शाबूत राहिले. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.”
“महिलांना यशस्वी होण्यासाठी जसा कुटुंबाचा पाठिंबा असतो, तसाच पाठिंबा राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीमागे लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदे यांचा कायम राहिला आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. लाडक्या बहिणींच्या आणि समाजातील सर्व घटकांच्या मनातील लाडके मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत,” असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

पुढे त्या म्हणाल्या, “आजचा दिवस संघर्ष करणाऱ्यांचा तसाच इतिहास घडविणाऱ्यांचा आहे. म्हणून सर्व महिलांनी स्वतःच्या विकासासाठी, सक्षमतेसाठी सतत प्रयत्न करत राहिले पाहिजेत.” असे नमूद करून डॉ. गोऱ्हे यांनी सर्व लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मासिक पाळी दरम्यान रजेचा निर्णय स्त्रीच्या इच्छेवर अवलंबून असावा; विषमता पसरणार नाही याची काळजी घेणे गरजेचे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री आधार केंद्राचा परिसंवाद; मासिक पाळी रजेवर सखोल चर्चा

पुणे: जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्री आधार केंद्राच्या वतीने पुण्यात ‘महिलांचे आरोग्य अधिकार : मासिक पाळीत रजेची तरतुद’ या विषयावर परिसंवाद आणि कविता वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेच्या उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातील नैसर्गिक आणि महत्त्वाचा भाग आहे. सरकार या मुद्द्यावर सर्व बाजूंनी विचार करत आहे आणि लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, रजेमुळे महिलांना विषम वागणूक किंवा भेदभाव मिळू नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीचे दैनंदिन काम, आरोग्य आणि गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे रजा घ्यायची की नाही, हे पूर्णपणे तिच्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून असावे. “मासिक पाळी रजा” असे थेट नाव न देता त्याला अधिक संवेदनशील आणि समानतावादी नाव द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

स्त्रियांनी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी आणि मासिक पाळीबाबतच्या सामाजिक धारणा बदलत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, राज्य सरकारने एकल महिलांच्या सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली असून, हे काम सुरू झाले आहे. यामुळे एकल महिला अधिक सक्षम होतील. हे सर्व्हेक्षण करावे यासाठी मी उपसभापती या नात्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एकल महिलांचे सर्वेक्षण आणि धोरणाची मागणी दि.६मे २०२५ रोजी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

‘बोलत्या व्हा आणि लिहित्या व्हा’ हा संकल्प महिला दिनानिमित्त करण्यात आला असून, महिलांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

कमिशन ऑन द स्टेटस ऑफ वुमन (CSW) ही लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी समर्पित संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) मुख्य जागतिक आंतरशासकीय संस्था आहे. याच्या CSW ७०वे सत्र नऊ मार्च पासून न्यूयॉर्क येथे सुरू होत आहे. त्याला समांतर असा ‘सर्वांसाठी न्याय मिळवणे आणि बळकट करणे’ या विषयावर कार्यक्रम उपसभापती कार्यालय व स्त्री आधार केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन लिंक देण्यात येणार आहे. या लिंकसाठी स्त्री आधार केंद्राच्या कार्यालयात संपर्क करता येईल. असे त्यांनी सांगितले.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी नलबले-भोसले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मासिक पाळी ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. सर्व महिलांना रजा देण्याची गरज नाही. फक्त ज्यांना अति त्रास होतो, त्यांनीच रजा घ्यावी. शाळांमध्ये स्वच्छता आणि मासिक पाळीबाबत मार्गदर्शन होत असून, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे देखील महत्वाचे आहे.

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी मासिक पाळीत स्त्रियांच्या मनःस्थितीवर होणारा परिणाम आणि कामावर, घरगुती जबाबदाऱ्यांवर होणारा प्रभाव याबाबत बोलताना समाजात जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच, यादरम्यान महिलांना वेगळी वागणूक टाळावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमात कवयित्री मृणाल पवार-गायकवाड यांनी भावपूर्ण कविता वाचन केले. सूत्रसंचालन अनिता शिंदे यांनी केले. आभार मीना इनामदार यांनी मानले. यावेळी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, रश्मी जोशी, मृणाल गायकवाड, अपर्णा पाठक, शोभा कोठारी आदी उपस्थित होत्या.

हा परिसंवाद महिलांच्या आरोग्य अधिकार आणि मासिक पाळीशी संबंधित जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा; पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ८- पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूलाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते; मात्र सर्वांना विश्वासात घेऊन आणि विविध पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळवून हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेत दिवंगत अजित दादांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता, असे त्यांनी नमूद केले.

या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात काही माध्यमांनी आणि नागरिकांनी टीका केली होती; मात्र शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात अजित दादा एका भाषणात म्हणाले होते, ‘आम्ही अभियंता नाही; मात्र अभियंत्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार प्रकल्प वेगाने पूर्ण करणे हे आमचे काम आहे,’ असे स्पष्टपणे सांगत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज त्याचे सकारात्मक परिणाम पुणेकरांना दिसत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पुणे हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मोठ्या वाढीनंतर आता पुणे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’चे (जीसीसी) महत्त्वाचे केंद्र बनत आहे. गेल्या वर्षभरात देशातील सर्वाधिक जीसीसी स्पेस पुण्यात विकसित झाली असून त्यामुळे शहराचे आर्थिक व औद्योगिक महत्त्व आणखी वाढले आहे. या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे काही मोठ्या शहरांच्या विकासाची गती मंदावल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. त्यामुळे पुणे शहराला ‘डी-कंजेस्ट’ करणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात रस्त्यांसाठी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

पुण्यात वाहतुकीसाठी जमिनीवर, आकाशात आणि जमिनीखाली अशा तिन्ही स्तरांवर एकाच वेळी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पुणे व परिसरासाठी दोन चक्राकार मार्ग (रिंग रोड) प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारले जात असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) आणि इतर सेवांना बळ दिले जात असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

विद्यापीठासमोरील या उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याबाबत व्यक्त झालेल्या भावना मान्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणे हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. विद्यापीठ मुख्यद्वारा समोर व गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

या उड्डाणपुलाची रचना एकात्मिक स्वरूपाची असून वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग आणि खालच्या स्तरावर रस्ते वाहतुकीसाठी उड्डाणपूल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. औंध व बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रॅम्प, शिवाजीनगरकडून बाणेर व पाषाणकडे जाण्यासाठी स्वतंत्र उड्डाणपूल, सेनापती बापट रोडशी जोडणी तसेच अंडरपास यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाच्या निमित्ताने अजित दादांची आठवण प्रकर्षाने होत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, विद्यापीठा समोरील जुना पूल वाहतुकीच्यादृष्टीने अपुरा ठरत असल्याने तो पाडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कोरोनाच्या कठीण काळातही पुणेकरांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेत हा प्रकल्प सुरू ठेवण्यात आला आणि त्यामुळे तो विक्रमी वेगाने पूर्ण होऊ शकला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत सातत्याने पाठपुरावा करून पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्यात अजित पवार यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर तसेच नाशिक फाटा-खेड-राजगुरुनगर या महत्त्वाच्या मार्गांच्या विकासाला त्यामुळे गती मिळाली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी २१ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे सांगून त्यांनी नमूद केले की, पुणे जिल्ह्यासाठी मेट्रोच्या पुढील टप्प्यांना मंजुरी, रामवाडी–वाघोली मेट्रो, येरवडा–कात्रज भुयारी मार्ग, हिंजवडी–शिवाजीनगर मार्गाचा डीपीआर तसेच विविध मार्गांचे सहापदरीकरण अशा अनेक विकासकामांमुळे पुण्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. पुणे शहराला मुंबई महानगराच्या धर्तीवर ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली असून ती प्रत्येक पुणेकरासाठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनींना श्रीमती पवार यांनी शुभेच्छाही दिल्या.

श्री. मोहोळ म्हणाले, पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे २७७ कोटी रुपये खर्च करून १ हजार ७६३ मीटर लांबीचा हा उड्डाणपूल उभारण्यात आला असून शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास त्याचा मोठा फायदा होईल.

श्रीमती मिसाळ म्हणाल्या,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच मांडलेल्या राज्याच्या अर्थ संकल्पात पायाभूत सुविधांवर जोर दिला असून त्यात पुण्यासाठी मोठ्या तरतुदी केल्या जेणे करून पुण्याला ग्रोथ हब करण्यासाठी मदत होईल. पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी केंद्र सरकारकडून ८० हजार कोटी रुपये मिळाले असून त्यामुळे येणाऱ्या काळात पुण्याचा चौफेर विकास होणार आहे.

श्रीमती नागपुरे यांनी पुणे महानगराच्या विकासासाठी हा पूल महत्वाचा ठरणार असल्याचे सांगितले.

श्री. शिरोळे म्हणाले, पुण्याच्या वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी या पुलाचा खूप मोठा उपयोग होणार असून पुण्याच्या विकासासाठी हा मेट्रो आणि रस्ता वाहतुकीसाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपूल महत्वाचा दुवा ठरणार आहे.

डॉ. म्हसे यांनी प्रास्ताविकात या आत्याधुनिक पुलाच्या अभियांत्रिकी बाबी सांगून हा पूल पुणे महानगराच्या पश्चिम विभागासाठी महत्वाचा ठरणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी आमदार सुनील टिंगरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, मुख्य अभियंता रियाज पठाण तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

या एकात्मिक दुमजली उड्डाणपूला बद्दल

▪️उड्डाणपुलाची एकूण लांबी (रॅम्पसह) १७६३.५२ मीटर आहे.
▪️प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता किंमत ₹२७७ कोटी आहे.

▪️औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या प्रमुख मार्गांना जोडणारी रॅम्प व वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

▪️वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ५५ मीटर लांबीचा स्टील गर्डर बसविण्यात आला आहे.

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड

धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ची कार्यकारणी जाहीर

पुण्यातील धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. या कार्यकारणीमध्ये पुण्यातील जवळपास सर्वच भागातून नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.

‘नवी पिढी स्वतःहून आता संभाजी महाराजांचे विचार जगण्याचे, त्यांच्या मार्गावर चालण्याचे प्रयत्न करीत असून छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, विचार आणि जाज्वल्य इतिहास घराघरात पोहचविण्याचे काम सर्वांनी करावे’ असे आवाहन मुख्य विश्वस्त सुरेश नाशिककर यांनी केले.

‘सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सांघिक भावनेनं धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान मार्फत संभाजी महाराजांचे कार्य, इतिहास आणि विचार संपूर्ण पुणे शहरात पोहचवीत अनेक सामाजिक उपक्रम येणाऱ्या काळात राबवू’ असा विश्वास नूतन अध्यक्ष नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी दिला.

धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान – नवनियुक्त कार्यकारिणी:

अध्यक्ष: राघवेंद्र (बाप्पू) मानकर

कार्याध्यक्ष: नगरसेवक अपूर्वजी खाडे

मुख्य विश्वस्त: माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर

समन्वयक: संतोषजी रासकर

उपाध्यक्ष: राजाभाऊजी मदगे, प्रकाशजी कुडले, महेशजी भरगुडे, हेमंतजी कांचन, रमेशजी परदेशी.

खजिनदार: मंदारजी बलकवडे.
सहखजिनदार: सुनीलजी कुंजीर.

सचिव: कालिदासजी नाशिककर.

सहसचिव: प्रांजलजी काळे, अनिकेतजी मेणे, विश्वासजी मणेरे, नितीनजी आपटे, नरेंद्रजी पायगुडे, प्रवीणजी डोंगरे.

प्रसिद्धी प्रमुख: रोहितजी पांडे, चिंतनजी शाह, आकाशजी कामठे, अजयजी खाडे, नवनाथजी पठारे, समीरजी कोंडे, भूषणजी वरपे, श्रद्धाताई शिंदे, गणेशजी खेंगरे, अभिषेकजी अंत्रे.

महिला आघाडी: स्नेहलताई पाटोळे, अपर्णाताई कुऱ्हाडे, मनीषाताई कांबळे.

राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

0

मुंबई-इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरकसपणे फेटाळून लावला आहे. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. माध्यमांनी काही शहरांत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त दिले. त्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठ्या रांगा लागल्या. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणालेत.

आखातातील इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धाचा फटका अवघ्या जगाला बसत आहे. त्याच्या झळा आता महाराष्ट्रातही पोहोचल्या आहेत. सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 60 रुपयांची वाढ केली. तसेच त्याच्या वितरणावरही काही ठराविक दिवसांची कॅप लावली. विशेषतः तेल कंपन्यांनी पुण्यातील वितरकांना पैसे दिल्याशिवाय इंधन देण्यास नकार दिल्यामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, लोकांना चुकीची माहिती देऊन पॅनिक तयार करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने यासंदर्भातील आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे पाऊले उचलली हे आपल्यासमोर आले आहे. सध्या राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही. काही माध्यमांनी दोन-तीन दिवस झाले पेट्रोल – डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या बातम्या दिल्या. यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठमोठ्या रांगा लागल्या. असा कोणताही तुटवडा नाही. केंद्र सरकारनेही हे स्पष्ट केले आहे. भविष्यात जी परिस्थिती उद्भवेल, त्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार मोदींच्या नेतृत्वा सक्षमपणे भक्कम परिस्थितीत आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे इराण युद्धामुळे सध्या भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारने व्यावसायिक गॅसच्या दरात अचानक 150 ते 200 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे हॉटेल व्यवसाय कसा चालवायचा? हा प्रश्न व्यावसायिकांपुढे उभा राहिला आहे. दुसरीकडे, घरगुती गॅसच्या दरातही एकरकमी 60 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचेही बजेट कोलमडले आहे. त्यातच काही शहरांत गॅसचा पुरवठा कोलमडल्यामुळे स्थिती बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुण्यातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात गॅसचे दर वाढत आहेत. तेलाचे दर वाढत आहेत. किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढले आहेत. पण आमचे पगार काही वाढत नाहीत. गॅस एजन्सीकडे गेल्यानंतर अनेक वेळा वेळेवर गॅस मिळत नाही, अशी ओरड या महिलांनी केली आहे.