Home Blog Page 709

सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांमधून खडकी भागात ६ कोटींची विकासकामे पूर्ण तर ५ कोटींच्या कामांना मंजुरी

पुणे, दि. ११ सप्टेंबर, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील खडकी भागात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांमधून मागील काही महिन्यांत तब्बल ६ कोटींची विकासकामे पूर्ण झाली असून ५ कोटींच्या विकासकामांना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळालेली विकासकामे पुढील काही महिन्यांमध्ये मार्गी लागतील, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.    

खडकी हा भाग शिवाजीनगर मतदार संघातील एक महत्त्वाचा भाग असून या भागात मागील काही महिन्यांत दर्जी गल्ली विठ्ठल मंदिरासमोर, साईबाबा मंदिराजवळ गवळी वाडा, राजीव गांधी नगर, लक्का वाडा, महादेववाडी, अरुण कुमार वसाहत, दर्गा वसाहत, धोबीगल्ली, खडकी डेपो लाईन मित्र मंडळ परिसर,  हुले बिल्डींग ते इंदिरानगर पर्यंत या भागांमध्ये नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.  

याबरोबरच खडकी छावणी परिषद हद्दीतील वाडे, मोहल्ले, सोसायटी, झोपडपट्टी, चाळी परिसरातील गल्ली बोळ येथे सिमेंट- कॉंक्रीटीकरण करणे व इंटरलॉकिंग ब्लॉक टाकणे, खडकी साप्रस येथील जय शिवशंकर गृहसंस्था, शुभम पार्क सोसायटीकडे जाणारा रस्ता, तसेच गंधम नगर फेज – २, राधाकृष्ण सोसायटी, क्षितीज सहकारी गृहसंस्था या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, खडकी छावणी परिषद हद्दीत मैदान, व्यायाम शाळा, ओपन जिम उभारत त्यांमध्ये व्यायामाचे साहित्य पुरविणे, इंदिरा गांधी नगर येथे कॉंक्रीटीकरण करणे, वार्ड क्र. १ मधील संत शिरोमणी सावता माळी महाराज, अखिल खडकी मातंग सेवा संस्था व राजीव गांधी नगर, गंधकुटी बुद्धविहार जवळ सामाजिक सभागृह बांधणे, एकमुखी दत्त मंदिर, गाडी अड्डा या ठिकाणी अभ्यासिका उभारणी ही महत्त्वाची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.

खडकी बंगला नं १५, ३० परिसरात नवीन पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, खडकी शिक्षण संस्थेत पेव्हिंग ब्लॉक बसविणे, ऑर्डनन्स फॅक्टरी एमप्लोईज एज्युकेशन सोसायटी रेंजहिल्स सेकंडरी स्कूल खडकी येथे शौचालय बांधणे व पिण्याच्या पाण्याची टाकी बसविणे, गवळीवाडा येथील साईबाबा मंदिराजवळ कॉंक्रीटीकरण करणे, खडकी धोबीगल्ली येथील मरीमाता मंदिर व संगम मित्र मंडळ परिसरात कॉंक्रीटीकरण करणे, खडकी रेल्वे स्टेशन रोड येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी विकासकामे देखील शिरोळे यांच्या प्रयत्नांमधून पूर्ण करण्यात आली आहेत.

याशिवाय खडकी भागातील आझाद मित्र मंडळ, महादेव युवा प्रतिष्ठान, लुंबिनी कुंज बुद्ध विहार, डेपो लाईन मित्र मंडळ, कार्तिक मित्र मंडळ, नवनिकेतन तरूण मंडळ, सर्व्हे नं. 574 बी या भागांतही विविध विकासकामे पूर्ण झाली असून याची एकत्रित किंमत ही ६ कोटी रुपंये इतकी आहे. याशिवाय खडकी भागातील इतर अनेक विकासकामांसाठी ५ कोटींच्या निधीची प्राथमिक मंजुरी मिळालेली असून येत्या काही महिन्यांत ही देखील विकासकामे पूर्ण होतील असा विश्वास सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला.

‘गणराया आमचे रक्षण कर’ विद्यार्थिनींचे शारदा गजाननाला साकडे

नूमवि प्रशालेतील विद्यार्थींनींनी केला स्त्री शक्तीचा जागर : अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाकडे प्रार्थना
पुणे : घाबरु नका पण सावध रहा…महिला आहेत देशाच्या प्रगतीचा आधार करु नका त्यांच्याबद्दल वाईट विचार…स्त्रियांना समजू नका बेकार त्याच आहेत जिवनाचा आधार…नारी आता अबला नाही संघर्ष आमचा चालू राही…जब है नारी मे शक्ती सारी तो फिर क्यों नारी को कहे बेचारी…स्त्री आहे जीवनाचा आधार तिला द्या योग्य सन्मान असा संदेश देत नूमवि प्रशालेतील विद्यार्थींनींनी स्त्री शक्तीचा जागर केला. ‘गणराया आमचे रक्षण कर आम्हाला सक्षम कर’ असे साकडे गणरायाला घातले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या नूमवि प्रशालेतील २०० विद्यार्थीनींनी अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, जयंत किराड, सुरज थोरात, मुख्याध्यापिका संगीता कांबळे उपस्थित होते.
प्रिय, गणपती बाप्पा कोणत्याही महिलेवर अन्याय नको, अन्यायाचा विचार करणाऱ्याला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना विद्यार्थीनींनी यावेळी केली. 

अण्णा थोरात म्हणाले, स्त्री हे शक्तीचे रूप आहे तीच्या समोर नतमस्तक होण्याची आपली संस्कृती आहे. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान आहे परंतु राज्यातील महिला अत्याचारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यामुळे गणराया तू आमचे रक्षण कर आणि राज्यातील तमाम स्त्रियांना सुरक्षित ठेव असे साकडे २०० विद्यार्थिनींनी मंडईच्या शारदा गजाननाला घातले. 

दादा,तुमच्यासाठी साहेबांना धोका दिला, काय मिळाले? अजित पवारांना कार्यकर्त्याचे निनावी पत्र

पुणे- विधानसभेच्या तोंडावर एक पत्र बारामतीत व्हायरल झाले आहे. हे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यकर्त्याने लिहिल्याचा दावा असून, त्यात दादांवर कुणाच्या तरी दबावाखाली भावनिक कार्ड खेळण्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्ही तुमच्यासाठी पवार साहेबांना धोका दिला, पण आम्हाला काय मिळाले? असा सवालही या पत्रात अजित पवारांना विचारण्यात आला आहे.

या निनावी पत्रात अजित पवारांचा स्वभाव सध्या बदलल्याचाही दावा करण्यात आला आहे. दादा, आजकाल तुमचं वागणं, बोलणं आणि ऐकणंसुद्धा बदललं आहे. तुम्ही खदखद व्यक्त करताय, मन मोकळं करताय की भावनिक कार्ड खेळताय हेच समजत नाही. तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढावू बाणा हरवला आहे की काय? असा सवाल यात उपस्थित करण्यात आला आहे.

खाली वाचा हे निनावी पत्र जशास तसे…

आदरणीय दादा,

बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटतेय. लिहावं का नाही हा खूप विचार करत होतो.‌ पण, काल आपल्या बारामतीत तुमच्या फोटोला काळे कापड लावलं गेलं. तेव्हा वाटलं आता लिहिण्याशिवाय पर्याय नाही. आज आमचं दुर्दैव आहे की नाव लपवून लिहावं लागतंय. कारण, नाव कळालं तर आम्हाला पुढे राजकारणात भविष्य राहील का? हा प्रश्न आम्हाला पडतोय. आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणंसुद्धा पार बदलून गेलंय. तुम्ही टीव्हीच्या मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात ‘चूक’ झाली म्हणून जी काही जाहीर कबुली देताय, त्यामुळे तुमचं नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न माझ्या सारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

तोच संभ्रम तुमच्या काल-परवाच्या बारामतीच्या सभेनं अधिकचं गडद केलाय. सभेत तुम्ही भरभरून बोललात. मात्र, तुमचा ‘सूर’ नेमका कळत नव्हता? तुम्ही खदखद व्यक्त करताय की सहानुभूती मिळविताय? किंवा भावनिक कार्ड खेळताय की मन मोकळं करताय? हेचं नेमकं समजत नव्हतं आणि अजूनही समजलेलं नाही. कारण, आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढावू बाणा हरवला आहे की काय? अशी भीती वाटत राहाते.

‘तुझी ग्रामपंचायत आली का रे’ किंवा ‘माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं’ असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्या सारखे वाटत नाहीत. सध्या तुम्ही फार चिडचिड करताय. राग, संताप व्यक्त करताय. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी एकटाचं नव्हे तर, आपले सगळे जीवाभावाचे पदधिकारी, कार्यकर्ते आणि जवळची सगळी मंडळी पुरती घाबरून गेली आहेत. कारण, वैनींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सगळेचं जबाबदार आहोत अशी तुमच्या मनाची भावना झाली आहे, असे तुमच्या बोलण्यावरून सतत जाणवते. म्हणून तुमचं असं संशयाने पाहाणे, आता सहन होत नाहीये, जीवाची घालमेल होत आहे.

बघा ना, दादा तुम्ही माफी मागून मोकळे झालात. त्याच्या सर्वत्र बातम्या झाल्या. पण, या सगळ्या घडामोडीत आम्ही मात्र, पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो. आता आम्ही नेमकी कुणाची माफी मागायची? हेही एकदा सांगा. तुमच्या निर्णयामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते दोन गटात विभागलो गेलोय. आता आम्ही एकमेकांचे तोंड सुद्धा बघत नाही. कामापोटी सहज बोललो किंवा निवांत गप्पा जरी मारल्या, तरी आमच्यावर संशय घेतला जातो. एवढं कलुषित वातावरण झालंय. अशावेळी तुम्ही मात्र, माफी मागून किंवा चूक कबूल करून आमचीचं पंचाईत केलीय. त्यामुळे माफी मागून तुम्ही तुमचा स्वार्थ साधला, आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं अशी शंका माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनात का येवू नये?

दादा, लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात तुम्ही भावनिक होवू नका. विकासाला महत्त्व द्या. भावनिक होवून प्रश्न सुटणार नाहीत, असं म्हणत होतात. भावनिक होवून रडले म्हणून तुम्हीसुद्धा तशीच जाहीर ॲक्टींग केली होती. पण, आता मात्र तुम्ही स्वत: खूपचं भावूक होताय आणि आम्हालाही भावनिक करताय. त्यामुळे तुम्हाला नेमकं झालंय तरी काय? तुम्ही एवढे घाबरून का गेला आहात? तुमचा आत्मविश्वास पहिल्या सारखा का दिसत नाही? तुम्ही कसल्या तरी ओझ्याखाली दबलेले आहेत, असे वातावरण का निर्माण झाले आहे? आमचे कणखर दादा आता आम्हाला कुठेच का दिसत नाहीत? कधी नव्हे ते तुम्ही इतके हतबल का दिसत आहात? असे अनेक प्रश्न मला व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पडले आहेत.

दादा, तुम्हाला आठवतंय का? पवार साहेबांच्या प्रचारात आमचा आजोबा फिरला आणि तुमच्या प्रचारात माझा बाप फिरला. पुढे तुमच्या आणि वैनींच्या प्रचारात तसेच पार्थ व जयदादासाठीही मी फिरलोय, फिरत आहे आणि उद्याही फिरत राहीन. कारण, आमच्या तीन पिढ्या कायम तुमच्या सोबत आहेत. वडीलांकडून प्रचाराचं काम शिकून मीही तुमचा प्रचार करत आलोय. ‘विकासाचा वादा, अजितदादा’ आणि ‘एकच वादा, फक्त अजित दादा’ अशा घोषणाही अगदी बेंबींच्या देठापासून देत आलोय.

मधल्या काळात तुम्ही वेगळा निर्णय घेतलात, तरीही ‘फक्त दादा’ असं म्हणून मी तुमच्या सोबत राहिलो आणि भविष्यातही आहे. त्यासाठी गेल्या तीस ते पस्तीस वर्षांची निष्ठा पणाला लावली. पण, तुमच्या सोबत निष्ठेनं राहिलो. लढलो. मात्र, वैनींचा पराभव झाला आणि तुम्ही मला आणि आपल्या असंख्य पदधिकारी व कार्यकर्त्यांना पाण्यात बघू लागलात. तुमच्या लेखी आम्ही कुचकामाचे किंवा आरोपी ठरलोय. म्हणून तुम्ही आमच्याकडे संशयाने पाहात आहात. त्यामुळे आता तुमच्या अवती-भवती सुध्दा येण्याची भीती वाटू लागलीय. तुम्ही कधी आणि काय बोलाल? याची चिंता सतावते आहे.

बारामतीतून आता मला रस नाही. आपण तसा समाधानी आहे? झाकली मूठ लाखाची. एवढी सगळी कामे करूनही बारामतीकर वेगळा निर्णय देवू शकतात, तर काय करणार? जिथं पिकतं, तिथं विकत नसंत. तुम्हाला एक नवीन आमदार मिळाला पाहिजे? मग, त्याची आणि माझी कारकीर्द बघा. शेवटी, मीचं निर्णय घेणार आहे. मला माझा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, अशी तुमची विधाने ऐकून मला तर, धक्काचं बसतोय. पण, अशा बोलण्यातून तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? हेचं मला कळत नाही. तरीही, तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल.

आजपर्यंत तुमचे सगळे निर्णय मीच नव्हे तर, आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी मान्य केलेत. तुमच्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहिलोय. तुमच्या भूमिकेचा आदर केलाय. एके दिवशी तुम्ही अचानक सरकारमध्ये सामील झालात. तेव्हा, निधड्या छातीच्या दादांना गुवाहाटीला जाण्याची गरज नाही, असं म्हणत तुमचं समर्थन केलं होतं. त्यावेळी सगळ्यांनी आम्हाला ‘नमक हराम’ म्हटलं. तरीही मी मागे हटलो नाही. तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी ‘गद्दारीचा’ शिक्का पाठीवरती घेवून लोकसभेला गावोगाव फिरलो. वैनींचा प्रचार केला. पण, वैनींचा पराभव झाला आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते तुमच्यासाठी ‘कुचकामी’ आणि ‘गद्दार’ ठरलोय, याचं जास्त वाईट वाटतंय.

‘कसं, दादा म्हणतील तसं’ हे ब्रीद घेवून आजपर्यंत तुमच्यासाठी काम करीत आलोय. तुम्ही सांगाल ते ऐकत आलोय. मात्र, वैनींचा पराभव तुमच्या ‘जिव्हारी’ लागला आणि आपल्या नात्यात दुरावा आलाय. पण, दादा! लोकसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे काम केलंय. गावोगावी प्रचार केलाय. तुमच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून फिरलोय, हे तुम्हाला कसं पटवून देवू? हेचं कळत नाहीये.

तुमचा माझ्यासह आपल्या कार्यकर्त्यांवर कधीच अविश्वास नव्हता. म्हणून तर, विरोधकांनी आम्हाला ‘मलिदा गँग’ म्हटलं, आम्ही तेही गपगुमान सहन केलं. कारण, माझ्यासाठी माझे दादाचं माझं काळीज आहे. आता तेचं दादा, आम्हा सगळ्यांना शंकेने किंवा संशयाने पाहाणार असतील तर, मी काय करायला हवं? सध्या ‘ना घर का न घाट का’ अशीच माझी आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आवस्था झाली आहे. मग, ज्या पवार साहेबांमुळे आम्हाला ओळख आणि पदे मिळाली. मान-सन्मान मिळाले. त्यांना तुमच्यासाठी धोका देवून आम्ही नेमकं काय मिळवलं? असंही वाटतंय.

दादा, अलीकडे तुमच्या बद्दल कुणीही काहीही बरळतं. तरीही तुम्ही गप्प बसता. नाही म्हणायला आपले प्रवक्ते मिटकरी बोलतात. पण, त्यांना कुणीही सिरीयसली घेत नाहीत. त्या तानाजी सावंत पासून ते गुलाबराव पाटील आणि संजय गायकवाड ते गणेश हाके पर्यंत सगळे तुमच्यावर तोंडसुख घेत आहेत आणि तुम्ही मात्र, आमच्यावर नाराज होवून आम्हालाचं आरोपीच्या पिंजऱ्यांत उभं केलंय, याचं फार वाईट वाटतंय.

एकीकडे तुम्ही हिंदी चॅंनलेला मुलाखती देताय. चूक झाली, असं सांगताय. समाजाला असलं आवडत नाही, म्हणताय. त्यामुळे तुमच्या नरमाईच्या सूराचा अंदाज येत नाही. हे तुम्ही स्वत:हून करताय की तुम्हाला कुणी कराय लावतंय? हाही प्रश्नचं आहे. तर, दुसरीकडे तुम्ही तिसरी आघाडी करून लढणार आहात, असं भाजपचे समर्थकचं सांगताहेत? त्यामुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्यांच्या तुमची चिंता वाटतेय. कारण, तुमच्या सोबत आम्ही सुद्धा’गद्दारीचा शिक्का’ पाठीवरती झेललाय आणि तुम्हाला घराच्या देव्हाऱ्यातच नव्हे तर, आमच्या काळजात सुद्धा स्थान दिलंय.

दादा, सध्या तुम्ही ‘पिंक’ झाला आहात आणि तुमचे विचारही ‘पिंक’ झाले आहेत की काय? अशी शंका मला येत आहे. कारण, माझ्या सारख्या कार्यकर्त्यांसह जीवाभावाच्या सगळ्या पदधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयी शंका घेणारे, त्यांच्या निष्ठेवर संशय घेणारे, त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करणारे आमचे लाडके दादा कधीचं नव्हते आणि यापूर्वी आम्ही कधी अनुभवले सुद्धा नाहीत.

आपल्या बारामती विधासभेत तुतारीला 47 हजार 381 मतांचं लीड मिळालं आणि वैनींचा पराभव झाला. त्यामुळे तुम्ही रागावलात. तुमचं रागावणं स्वाभाविक आहे. तो पराभव जसा तुमच्या ‘जिव्हारी’ लागलाय, तसा तुमचा निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या पराभवाची ‘सल’ मलाही आहे. पण, जास्त ताणू नका. रात गयी, बात गयी! म्हणून नव्या जोमाने कामाला लागूयात. निराशेची जळमटे फेकून द्या. जिद्दीने उभे राहू, जिद्दीने लढू आणि बारामतीचा गड पुन्हा एकदा काबीज करू!

कळावे आपलाचं,
एक निष्ठावंत कार्यकर्ता

शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी:हिंदू संघटनांनी तोडले बॅरिकेड्स, पोलिसांनी लाठीचार्ज-वॉटर कॅनचा वापर केला

0

शिमला-हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे बेकायदेशीर मशिदी प्रकरणावरून आज (11 सप्टेंबर) हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हिंदू संघटना बेकायदा बांधकाम पाडण्याची मागणी करत आहेत. आंदोलक संजौलीत पोहोचू नयेत यासाठी शिमला पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. आंदोलक बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस लाठीचार्ज करून आंदोलकांचा पाठलाग करत आहेत.

शिमल्याच्या ढाली भाजी मार्केट आणि बोगद्यादरम्यान शेकडो आंदोलक उपस्थित आहेत. या बोगद्यातून मशिदीकडे जाण्याचा मार्ग आहे. आंदोलकांनी रस्त्यावरच हनुमान चालिसाचे पठण केले. त्यामुळे संजौली-ढाळी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.संजौली येथे पोलिसांनी हिंदू जागरण मंचचे नेते कमल गौतम यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या डझनभर नेत्यांना अटक करण्यात आल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. ढाली बोगद्याजवळ वाहतूक बंद करण्यात आली आहे.
शिमल्यात कलम 163, पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला

डीसी अनुपम कश्यप यांनी संजौलीमध्ये कलम १६३ लागू केले आहे. या अंतर्गत सकाळी 7 ते रात्री 11.59 या वेळेत 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्याची किंवा शस्त्र बाळगण्याची परवानगी नाही. संजौलीत शांतता राखण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्री फ्लॅग मार्चही काढला होता.

सरकारी व खाजगी कार्यालये, शाळा, बाजारपेठा पूर्ण उघडी राहतील. कोणत्याही व्यक्तीला आंदोलन करण्याची परवानगी नाही. लाऊडस्पीकरच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.
संजौली येथील मशीद १९४७ पूर्वी बांधण्यात आली होती. त्यावेळी मशिदीची इमारत कच्ची होती. 2010 मध्ये कायमस्वरूपी इमारतीचे बांधकाम सुरू झाले. 2010 मध्ये बेकायदा बांधकामांची तक्रार महापालिकेकडे पोहोचली. यासंबंधीचा खटला २०१० पासून आयुक्त न्यायालयात सुरू आहे. त्यानंतर 2024 पर्यंत येथे 5 मजले बांधले जातील. महापालिकेने आतापर्यंत 35 वेळा बेकायदा बांधकामे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 2023 मध्ये महापालिकेने मशिदीची स्वच्छतागृहे पाडली होती.

न्यायालयाने स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले
या व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी आंदोलन केले. त्यांनी 1 सप्टेंबर रोजी संजौली आणि 5 सप्टेंबर रोजी चौदा मैदान येथे निदर्शने केली. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आयुक्त न्यायालयात ४५व्यांदा सुनावणी झाली. येथे वक्फ बोर्डाने मालकीची कागदपत्रे न्यायालयात सादर केली. न्यायालयाने या प्रकरणी ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी निश्चित केली असून, संबंधित कनिष्ठ अभियंता (जेई) यांना नवीन स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

इमाम म्हणाले- जुनी मशीद 1947 मध्ये बांधली
मशिदीचे इमाम शहजाद यांनी सांगितले की, मशीद 1947 पूर्वीची होती. पूर्वी मशीद कच्ची होती आणि दोन मजली होती. लोक मशिदीबाहेर नमाज अदा करायचे, त्यामुळे नमाज अदा करण्यात अडचण येत होती. हे पाहून लोकांनी देणगी गोळा करून मशिदीचे बांधकाम सुरू केले.

ही जमीन वक्फ बोर्डाची होती. मशिदीच्या दुसऱ्या मजल्याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. वक्फ बोर्ड ही लढाई लढत आहे. कायदा जो काही निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल.

मुख्यमंत्री म्हणाले- कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी नाही
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू म्हणाले, ‘प्रशासन सर्व काही पाहत आहे. शांततापूर्ण निदर्शनास बंदी नाही. आपण सर्व समाजाचा आदर करतो. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही. याला राजकीय रंग देणे योग्य नाही. सभागृहात एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जी पथविक्रेत्यांसाठी मापदंड ठरवेल. मशिदीवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

आंदोलकांनी 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता
गुरुवारी, 5 सप्टेंबर रोजी विविध संघटनांसह स्थानिक लोकही रस्त्यावर उतरले. मशिदीचे बेकायदा बांधकाम पाडण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. यासाठी आंदोलकांनी 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता.

पंचायत राज मंत्री अनिरुद्ध सिंह हेही आंदोलनस्थळी गेले. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हिमाचलमधील काँग्रेस सरकारमधील एक्स-मंत्री अनिरुद्ध सिंग यांच्यावर लिहिले होते, ते भाजपची भाषा बोलत आहेत.
31 ऑगस्ट रोजी संजौली येथील मशिदीजवळ एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी स्थानिक व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप काही लोकांनी केला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली. मारामारीनंतर या प्रकरणाने जोर पकडला. आता हिंदू संघटना आणि अनेक स्थानिक लोक ही मशीद पाडण्याच्या त्यांच्या मागणीवर ठाम आहेत.

२०२५ पर्यंत ५०० ग्रामीण शाळांमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याचा संकल्‍प 

सचिन तेंडुलकर आणि श्‍नाइडर इलेक्ट्रिक इंडिया यांच्‍यामधील सहयोग स्‍प्रेडिंग हॅप्‍पीनेस इनदिया फाऊंडेशनने गाठला मोठा टप्‍पा

स्‍मार्ट डिजिटल क्‍लासरूम्‍सची स्‍थापना, जे अत्‍याधुनिक पायाभूत सुविधा आणि सौर ऊर्जेच्‍या शक्‍तीसह सुसज्‍ज आहेत

· निर्णयात्‍मक हवामान कृती करण्‍यासाठी ‘ग्रीन अॅम्‍बेसेडर्स’च्‍या समुदायाला चालना

नवी दिल्‍ली, ११ सप्‍टेंबर २०२४: तरूण विद्यार्थ्‍यांना सक्षम करण्‍याच्‍या उद्देशासह क्रिकेट आयकॉन सचिन तेंडुलकर (सचिन तेंडुलकर फाऊंडेशन – एसटीएफच्‍या माध्‍यमातून) आणि डिजिटल ऊर्जा व्‍यवस्‍थापन व नेक्‍स्‍ट-जनरेशन ऑटोमेशनमधील अग्रणी कंपनी श्‍नाइडर इलेक्ट्रिक इंडिया (Schneider Electric India) यांच्‍यामधील सहयोग स्‍प्रेडिंग हॅप्‍पीनेस इनदिया फाऊंडेशन (Spreading Happiness InDiya Foundation) (एसएचआयएफ)ने डिजिटल शिक्षणाच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागांमधील तरूण विचारवंतांना सक्षम करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या मिशनमध्‍ये मोठा टप्‍पा गाठला आहे. या प्रमुख एसएमआयटीए (SMITA) प्रोग्रामच्‍या माध्‍यमातून फाऊंडेशनने भारतातील ३०० हून अधिक शाळांमधील ६०,००० विद्यार्थ्‍यांवर सकारात्‍मक प्रभाव निर्माण केला आहे. या यशामधून प्रेरणा घेत आणि जागतिक साक्षरता दिन साजरा करत एसएचआयएफने २०२५ पर्यंत ५०० ग्रामीण सरकारी शाळांचा कायापालट करण्‍याचा संकल्‍प केला आहे. यामागे भारतातील महत्त्वाकांक्षी भागांमधील १००,००० हून अधिक तरूण वि़द्यार्थ्‍यांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे.

एसएमआयटीए (SMITA) प्रोग्रामची खासियत आहे ‘डिजिटल’ क्‍लासरूम्‍स, जे ग्रामीण भागांमध्‍ये डिजिटल शिक्षणाची सुविधा देण्‍यासाठी, तसेच शाश्‍वततेला चालना देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. आजपर्यंत, एसएचआयएफने देशातील दुर्गम भागांमध्‍ये असलेल्‍या ३०० शाळांना डिजिटल क्‍लासरूम्‍ससह सुसज्‍ज केले आहे, तसेच सक्रिय हवामान कृती करण्‍यास सक्षम असलेल्‍या ‘ग्रीन अॅम्‍बेसेडर्स’च्‍या समुदायाला चालना देण्‍यासाठी हब्‍स म्‍हणून सेवा देते. सौरऊर्जेसारख्‍या नवीकरणीय ऊर्जास्रोतांद्वारे समर्थित हे क्‍लासरूम्स अत्‍याधुनिक पायाभूत सुविधा आणि व्‍हर्च्‍युअल प्रशिक्षण संधी देतात, ज्‍यामुळे शाळांना कार्यसंचालन खर्च कमी करण्‍यास आणि व्‍हर्च्‍युअल प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून दर्जेदार शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍यास मदत होत आहे.

डिजिटल शिक्षण अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍याचे महत्त्व सांगत श्री. सचिन तेंडुलकर म्‍हणाले, ”स्‍प्रेडिंग हॅप्‍पीनेस इनदिया फाऊंडेशन डिजिटल पोकळी दूर करण्‍याप्रती समर्पित आहे, ज्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना उच्‍च दर्जाचे शिक्षण उपलब्‍ध करून देत आहे, तसेच शाश्‍वतेचे महत्त्व देखील सांगत आहे. एसएमआयटीए (SMITA) प्रोग्राममधून जबाबदार व ज्ञानी नागरिकांची पिढी घडण्‍याप्रती आमची समर्पितता दिसून येते, जे आपल्‍याला शाश्‍वत भविष्‍याच्‍या दिशेने मार्गदर्शन करतील. फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून आम्‍ही ठिकाण कोणतेही असो प्रत्‍येक मुलाला समकालीन विश्‍वामध्‍ये प्रगती करण्‍यासाठी आवश्यक असलेली संसाधने उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेण्‍याप्रती काम करत आहोत.”

दर्जेदार शिक्षण उपलब्‍ध असणे हे सर्वांगीण शाश्‍वत विकास संपादित करण्‍यासाठी महत्त्वाचे आधारस्‍तंभ आहे. बदलत्‍या डिजिटल विश्‍वामुळे शैक्षणिक पायाभूत सुविधांचे वेळेवर आधुनिकीरण व अपग्रेडेशनची गरज निर्माण झाली आहे, ज्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना दर्जेदार शिक्षण मिळेल.

या ध्‍येयाबाबत सांगताना श्‍नाइडर इलेक्ट्रिक इंडियाचे झोन प्रेसिडण्‍ट – ग्रेटर इंडिया, व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. दीपक शर्मा म्‍हणाले, ”श्‍नाइडर इलेक्ट्रिक प्रभाव-संचालित कंपनी आहे आणि शिक्षण दीर्घकालीन, शाश्वत प्रभाव निर्माण करण्‍यासाठी मुलभूत गरज आहे. आमचा विश्‍वास आहे की, ऊर्जा व शिक्षणाची उपलब्‍धता मुलभूत मानवी अधिकार आहे. आमचे डिजिटल क्‍लासरूम्‍स ग्रामीण समुदायांना सक्षम करण्‍यासाठी ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाचे नेतृत्‍व करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतात. आम्‍ही ३०० शाळांमधील ६०,००० विद्यार्थ्‍यांवर सकारात्‍मक प्रभाव निर्माण केला आहे आणि २०२५ पर्यंत ५०० शाळांचा कायापालट करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍हाला भावी पिढीला शिक्षित व सक्षम करण्यासाठी, तसेच हवातान बदल व शाश्‍वततेवरील कृतींना चालना देण्‍यासाठी श्री. सचिन तेंडुलकर यांच्‍यासोबत सहयोग करण्‍याबाबत सन्‍माननीय वाटते.”

एसएमआयटीए (SMITA) प्रोग्राम पर्यावरण व ऊर्जा संवर्धनावरील परस्‍परसंवादी अध्‍ययन उपक्रमाच्‍या माध्‍यमातून ‘ग्रीन अॅम्‍बेसेडर्स’च्‍या इकोसिस्‍टमला निपुण करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. हा प्रोग्राम विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनात योग्‍य व पर्यावरणास-अनुकूल निवडी करण्‍याकरिता माहिती व शिक्षण देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

एसएचआयएफचा नाविन्‍यपूर्ण एसएमआयटीए (SMITA) प्रोग्राम उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू, महाराष्‍ट्र व कर्नाटक अशा १२ राज्‍यांमधील, तसेच काही महत्त्वाकांक्षी जिल्‍ह्यांमधील सरकारी शाळांवर सकारात्‍मक प्रभाव घडवून आणत आहे. फाऊंडेशन विद्यार्थ्‍यांना प्रादेशिक भाषांमध्‍ये शिक्षण उपलब्‍ध करून देत विनाव्‍यत्‍यय अध्‍ययन मिळण्‍याची खात्री घेण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या आरुष निचल चे आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेत उल्लेखनीय यश

पिंपरी, पुणे (दि. ११ सप्टेंबर २०२४) अखिल लोककला कल्चरल आर्गनायझेशन, थायलंड संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील आठव्या इयत्तेतील आरुश निचल याने द्वितीय क्रमांक पटकावला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्या अंतर्गत आरूष निचल याने संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यामधे अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत स्पर्धेत प्रथम आणि दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, उप मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आरूष निचलचे अभिनंदन केले.

गुंडांचा म्होरक्याच मुख्यमंत्री… उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप

मुंबई- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आज एक व्हिडीओ समाज मध्यामावर पोस्ट करत राज्यात गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय त्यामुळे गुन्हेगारी वाढल्याचा आरोप केला आहे . एक व्यक्ती एलेका मोटार चालकावर भर रस्त्यात कुठल्यातरी हत्याराने हल्ला करताना दिसत असल्याचा हा व्हिडीओ आहे . आणि तो शिंदे गटाच्या आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा बॉडी गार्ड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रस्त्यावर हा हल्ला होताना पाहून लोक गुमान बाजूने जाताना दिसत आहेत .. काय आहे हि पोस्ट पहा जशीच्या तशी …..

या पोस्ट मध्ये नेमके काय म्हटले आहे ….

महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या ‘शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही… कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय!

दुसरीकडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी आमदार थोरवेंवर निशाणा साधत ही सत्तेची मस्ती असल्याची टीका केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी आमदार थोरवेंवर निशाणा साधला आहे. मारहाण करणारा व्यक्ती कोणत्या आमदाराचा अंगरक्षक आहे किंवा नाही मला त्यात रस नाही. पण एखाद्या व्यक्तीला भररस्त्यात अशी मारहाण करण्याची हिंमत होते ही फार गंभीर गोष्ट आहे. या घटनेवरून राज्यात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट होते, असे अंधारे म्हणाल्या.

आमदार महेंद्र थोरवेंनी फेटाळले आरोप

दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी मारहाण करणारा व्यक्ती आपला बॉडीगार्ड नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हा प्रकार 2 कार्यकर्त्यांमधील वादाचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ठाकरे गटाने मला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. मारहाण करणारा व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. पण ते दोघेही आमचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्यातील वादातून हा प्रकार घडला असावा. या प्रकरणी त्यांनी काही चुकीचे कृत्य केले असेल तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणालेत.

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मदरसांनी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

0

मुंबई, दि.११ : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मदरसांचे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाईल. ज्या मदरसांना डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना (Scheme for Providing Quality Education in Madrasa (SPQEM)) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ही योजना लागू  राहणार नाही, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

हिंदू – मुस्लिम बांधवांनी सद्भावना रॅलीतून सामाजिक ऐक्याचा संदेश

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ व खडक पोलीस स्टेशनचा  उपक्रम
पुणे : शहराच्या पूर्व भागातील चौका-चौकात महिलांनी केलेले औक्षण, फुलांची झालेली उधळण आणि भारत मातेचा जयघोष ऐकून सैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन दिव्यांग सैनिक आणि पोलिसांसोबत देशभक्तीचा नारा दिला. हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दिव्यांग सैनिकांसमवेत राष्ट्रभक्तीचा आणि एकतेचा संदेश देत सद्भावना रॅली काढली.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने  सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील, कर्नल वसंत बल्लेवार, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, विनायक घाटे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, अॅड प्रताप परदेशी, डाॅ. मिलींद भोई, डॉ. विजय पोटफोडे, राजाभाऊ कदम, खडक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, शर्मिला सुतार, सेवा मित्र मंडळ अध्यक्ष पराग शिंदे, अमर लांडे, निलेश रसाळ, विक्रांत मोहिते, सचिन ससाने, उमेश कांबळे, पोलीस अधिकारी नामदेव गायकवाड, कुलदीप पवार उपस्थित होते.
घोरपडी पेठेतील मक्का मस्जिद- दलाल चौक- बलवार आळी – कृष्णाहट्टी चौक – शितला देवी चौक – फडगेड पोलीस चौकी मार्गे सेवा मित्र मंडळ, शुक्रवार पेठ येथे रॅलीचा समारोप झाला. देशाच्या रक्षणार्थ अपंगत्व पत्करलेल्या जवानांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

प्रविणकुमार पाटील म्हणाले, आजची परिस्थिती पाहता मुलांमध्ये माणुसकीचे संस्कार रुजविणे गरजेचे आहे. जे काम सामाजिक संस्थाच्यावतीने केले जात आहे. मानवता धर्म हाच खरा मोठा धर्म आहे. पुढच्या पिढीमध्ये देशभक्तीचे संस्कार रुजविले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शिरीष मोहिते म्हणाले,  प्राणाचे बलिदान देऊन सैनिक आपली रक्षा करतात. त्यांची माहिती व्हावी, अपंगत्व आले असूनही त्यांची जिद्द सर्वाना समाजावी, हा उद्देश आहे,. जेव्हा ते सीमेवर लढतात तेव्हा जात, धर्म बघत नाहीत. केवळ देश त्यांना दिसत असतो. तसेच आपणही एकत्र येवून देशभक्ती हाच धर्म पाळला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

‘ऑलिम्पिक विजेता स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ११ लाखांचे बक्षिस

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा ‘पुनीत बालन ग्रुप’चा आणखी एक निर्णय

पुणे – ‘पॅरिस ऑलिम्पिक’मध्ये कांस्य पदक पटकावून भारताची मान उंचावणारा मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसळे याला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ११ लाखांचे बक्षीस देण्यात आले आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते कुसळे यास पुण्यात हा बक्षिसाचा धनादेश देण्यात आला.

कोल्हापुरचा सुपुत्र असलेल्या कुसळे याने ‘पॅरिस ऑलिम्पिक’ गाजवत नेमबाजीत ५० मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले. १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेत युवा उद्योजक पुनीत बालन यांनी त्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सोमवारी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या आरतीचा मान कुसळे याला देण्यात आला. यावेळी त्यास ११ लाख रुपयांचा बक्षिसाचा धनादेश पुनीत बालन यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना कुसळे याने ‘पुनीत बालन ग्रुप’चे आभार मानले. ‘‘मी गणपती बाप्पाचा भक्त आहे. बाप्पाचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे, त्यामुळेच कांस्य पदक मिळाले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती करण्याचा मान मिळाला हे माझे भाग्य समजतो,’’ अशा शब्दांत यावेळी कुसळे याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यापूर्वीही ‘पुनीत बालन ग्रुप’ने अनेक गुणी आणि होतकरु खेळाडूंना आर्थिक छत्र देऊन त्यांच्या पुढील प्रवासात खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या या कार्याचा समाजाच्या सर्वच स्तरातून गौरव करण्यात येत आहे.
‘‘नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक मिळवत स्वप्निलने केवळ महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं. त्याच्यासारखे अनेक प्रतिभावान खेळाडू घडण्याची गरज आहे. त्यादृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ अशा खेळांडूंच्या कायम पाठिशी राहिला आहे. भविष्यात स्वप्निल निश्चितच भारतासाठी सुवर्णपदक जिंकेल असा विश्वास आहे. त्यासाठी त्याला ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ आणि सर्व बाप्पाच्या सर्व भक्तांकडून शुभेच्छा.’’

पुनीत बालन
(युवा उद्योजक व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाना भेट देऊन श्री गणरायाचे घेतले दर्शन 

पुणे, दि. १०: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाना भेटी देऊन दर्शन घेतले आणि श्री गणेशाची आरती केली.  यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचा विविध मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. पवार यांनी कसबा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ, गुरुजी तालिम गणपती मंडळ, छत्रपती राजाराम मित्र मंडळ, केसरीवाडा गणेशोत्सव आणि भोलेनाथ मित्रमंडळाला भेटी देऊन दर्शन घेतले.

यावेळी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराचे अध्यक्ष माणिक चव्हाण, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, गुरुजी तालिम गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, छत्रपती राजाराम मित्र मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, केसरीवाडा गणेशोत्सवाच्या डॉ. गीताली टिळक आणि  भोलेनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा माजी उप महापौर दीपक मानकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने तसेच मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.

०००

चंद्रशेखर बावनकुळे यांची नाहक बदनामी:देवेंद्र फडणवीस यांनी केली पाठराखण

नागपूर -भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या भरधाव कारने दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली आहे. या घटनेला आता राजकीय वळण लागत आहे. या प्रकरणी विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली असून कारवाईची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हिट अँड रन घटनेचा पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी या घटनेसंदर्भातील सर्व तथ्य जमा केले आहे. त्याआधारे या घटनेची चौकशी होईल. मात्र विरोधी पक्षांकडून या घटनेचे राजकारण केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपला लक्ष्य केले जात असून बावनकुळे यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

रविवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन चारचाकी आणि एक दुचाकी वाहनाला संकेत बावनकुळे यांच्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. यावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र गाडी ते चालवत होते की त्यांचा चालक चालवत होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच पोलिस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधक करत आहेत.

ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढेल?

विजय वडेट्टीवार म्हणाले, आमदार जयकुमार गोरे यांनी तर यांनी तर दोन लोकांचा जीव घेतला, भरधाव गाडी चालवून. यांना पैशांचा माज आलेला आहे, सत्तेचा माज एवढा आलेला आहे. यांना लोकांच्या जिवाची पर्वा नाही, लोक मेली काय आणि गेली काय, यांना काही देणे घेणे राहिले नाही. मला कीव येते मुलगा गाडी चालवत होता, जर ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता तर जगातला कोणी मूर्ख माणूस आहे काय की नंबर प्लेट काढून गाडीमध्ये ठेवेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, यावरून स्पष्ट दिसते की पोलिसांनी इतक्या आंधळेपणाने एखाद्या आरोपीला पाठीशी घातले. म्हणजे मुलगा दारू प्यायलेला नव्हता, ड्रायव्हर दारू पिऊन होता तर मग नंबर प्लेट कशाला काढून गाडीमध्ये ठेवली? ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढेल? वडिलांनी स्पष्ट केले आहे की गाडी मुलाच्या नावावर आहे, मग आरोपी मुलगा नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.

रयत विचारवेध संमेल‌नाच्या अध्यक्षपदी बंधुताचार्य  प्रकाश रोकडे यांची निवड

डॉ. अरुण आंधळे स्वागताध्यक्षपदी; विचारवेध संमेलनाचे पंधरावे वर्ष
पुणे: बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील महिन्यात होणाऱ्या रयत विचारवेध संमेलनाच्या अध्यक्षपदी बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची, तर स्वागताध्यक्षपदी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांची निवड झाली आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदे‌चे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे यांनी दिली.
प्रा. शंकर आथरे म्हणाले, “विचारवेध संमेलनाचे हे पंधरावे वर्ष आहे. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या अर्थशोध आणि बोध, मी पाण्याच्या जातीचा, बंधुतापर्व, प्रकाशपर्व, बंधुताचार्याची प्रकाशगाथा, आरपार बंधुता या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. विविध विषयांवरील विपूल व वैचारिक लेखनही त्यांनी केले आहे. १८ व्या आणि २३ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद‌ही त्यांनी भूषविले आहे. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी सातारा येथे झालेल्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. बंडोपंत कांबळे आणि प्रा. प्रशांत रोकडे यांनी संमेलनाच्या नियोजनात विशेष पुढाकार घेतला आहे.”

‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे शुक्रवारी आयोजन -खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार; अडीच हजार सायकलस्वार सहभागी होणार

पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्याचे, पर्यावरपूरक जीवनशैलीचे महत्व जनमानसात रुजवण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोथरूड ते धर्मवीर संभाजी महाराज पुतळा, डेक्कन जिमखाना अशी ही सायकल रॅली होणार आहे. 
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन होणार असून, स्कायडाव्हर पद्मश्री शीतल महाजन व भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून आयोजित केला जात आहे, अशी माहिती संयोजिका, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिली.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पुणे हे सायकलचे शहर म्हणून ओळखले जाते. बहुगुणी अशी सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. सायकलप्रेमी पुणेकरांनी याआधीही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या सायकल रॅलीतही अडीच हजारांहून अधिक सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला आहे. या सायकल रॅलीचा भव्य सोहळा पाहण्यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करते. यावेळी काही गरजू मुलामुलींना सायकलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच रॅलीत सहभागी प्रत्येकाला मेडल, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट दिला जाणार आहे.”

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलला प्रथम तर द्वितीय क्रमांक कोथरूडच्या भारतीय विद्या भवनला,आणि सिद्धिविनायक योग प्रसारक संस्थेला तिसरा क्रमांक

पुणे- सध्याच्या डिजिटल युगामध्ये लहान मुलांमधील वाढते मोबाईलचे प्रमाण आरोग्यास हानिकारक आहे. लहान मुलांना व्यायाम आणि योगा याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा सेल आणि सीएफसी योगा कमिटीतर्फे भव्य राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांमध्ये केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल ला प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक कोथरूड येथील भारतीय विद्या भवनला, तर सिद्धिविनायक योग प्रसारक संस्थेला तिसरा क्रमांक मिळाला.
पुण्यातील शिवाजी मराठा सोसायटीच्या महाविद्यालयामध्ये या स्पर्धा भरवल्या होत्या. योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा मुलांना निरोगी आणि मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी योगामध्ये आवड निर्माण व्हावी असा हा या स्पर्धेचा उद्देश होता.
यामध्ये योगाचार्य योग साधक आणि पालक वर्ग सहभागी झाले होते. आठ वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत या वयोगटातील स्पर्धा आयोजित केल्या होत्या.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अण्णा देशमुख,अरविंद साळवे,योगाचार्य विनायक मुसळे शिवाजी घोडके, नितीन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये लॉटरी पद्धतीने तसेच ऐच्छिक योगासने सादर करण्यात आली.