Home Blog Page 44

शहरात पाणी साठणाऱ्या भागांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करून तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणार — गणेश बिडकर

  • सुट्टीच्या दिवशीही महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत; सभागृह नेते गणेश बिडकरांकडून अधिकाऱ्यांची बैठक

पुणे ४ एप्रिल: पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील पाणी साठणाऱ्या भागांची माहिती संकलित करून संबंधित विभागांना तत्काळ तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी नियोजन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली.

आज सुट्टीचा दिवस असतानाही महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आला आहे. यावेळी सभागृह नेते गणेश बिडकर, मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभाग मुख्य अभियंता जगदीश खानोरे, पथ विभागाचे राजेश बनकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने, नगरसेविका अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील पाणी साठणाऱ्या संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करत तात्काळ उपाययोजनांसोबतच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी दीर्घकालीन नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी दूर करून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होईल, यासाठी व्यापक योजना आखण्यावर भर देण्याची सूचना गणेश बिडकर यांनी केली आहे.

सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया
“पुणे शहरात अतिवृष्टी झाल्यास कोणत्याही भागात पाणी साचू नये, यासाठी ड्रेनेज व्यवस्थेत आणखीन तात्काळ आणि दीर्घकालीन सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी युद्धपातळीवर ॲक्शन प्लॅन बनवण्याची सूचना केली आहे.

चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन-केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली माहिती

रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात संपन्न

पुणे:

दलित समाजावरील अन्याय दूर करून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याच्या संघर्षात महिलाचा टप्पा ठरलेल्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात चवदार तळे आंदोलनाचे शताब्दी वर्षात पदार्पण होत आहे. या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी व प्रमुख नेत्यांची बैठक येथे पार पडली. या बैठकीला राजाभाऊ सरोदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अविनाश महातेकर प्रदेश सरचिटणीस, गौतम सोनवणे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, बाबूराव कदम प्रदेश कार्याध्यक्ष, आशाताई लांडगे राष्ट्रीय सरचिटणीस, प्रदेश सचिव बाळसाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनाकांबळे, युवक आघाडी अध्यक्ष पप्पू कागदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने चवदार तळे आंदोलन शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या स्वरूपाबद्दल चर्चा करण्यात आली.

या शताब्दी वर्षानिमित्त राज्यव्यापी समता परिवर्तन यात्रेचे आयोजन केले जाणार असून तिच्या प्रारंभ 14 ऑक्टोबर या धम्मचक्र परिवर्तन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांचे स्मारक असलेल्या सातारा येथून केला जाणार आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून समारोप पुणे येथे दहा नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.

त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक विभागात सामाजिक समता परिषदा आयोजित करून दलित समाजाचा विकास, सवर्ण व दलित यांच्यातील समता यासाठी आवश्यक कार्यक्रमाबाबत परिषदांच्या माध्यमातून विचारमंथन करण्यात येणार आहे. याच उद्देशाने समतावादी विचारवंत आणि साहित्यिक यांच्या संमेलनांचे आयोजनही करण्यात येणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. सध्याच्या काळात अस्पृश्यता संपुष्टात आली असली तरी जातीभेद नष्ट झालेले नाहीत.अजूनही दलितांवर अत्याचारांच्या घटना घडतच आहेत, हे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

त्याचप्रमाणे या वर्षात 15 ऑक्टोबरला कोल्हापूर येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात महिला समता परिषदा, आंबेडकरी चळवळीतील शाहीर कलावंतांच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असे अनेक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

आपल्याला तीन वेळा लोकसभा आणि तीन वेळा राज्यसभेत जाऊन समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार आणि रिपब्लिकन पक्षाचा देशव्यापी विस्तार यासाठी या संधीचा उपयोग करणार असल्याची ग्वाही देखील आठवले यांनी दिली.

विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दमनशाहीचा पराभव करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण पाठिंबा राहील. या ठिकाणी पक्ष आपला उमेदवार उभा करणार नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. या राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सात तारखेपासून दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्ष तामिळनाडूमध्ये 40 जागा लढवणार असून आसाममध्ये चार जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. केरळमध्ये रिपब्लिकन पक्षाचा एक उमेदवार रिंगणात असेल तर पद्दुचेरी येथे सर्व जागांवर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांना पक्षाचा पाठिंबा असेल, असेही आठवले यांनी सांगितले.

लोकसभेच्या जागांमध्ये वाढ होऊन त्या 816 होणार आहेत. अर्थातच महिलांसाठी राखीव असलेल्या जागांमध्येही 273 पर्यंत वाढ होणार आहे. त्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना वेगळे आरक्षण असणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी 16 तारखेपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.

महिलांसाठी आरक्षित असलेल्या राखीव जागांचा लाभ इतर मागास प्रवर्ग व भटके विमुक्त प्रवर्ग यातील महिलांना मिळणार नाही. कारण या प्रवर्गांना अद्याप राजकीय आरक्षण दिले गेलेले नाही. मात्र, अनुसूचित जाती, जमातींप्रमाणेच इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त यांना देखील राजकीय आरक्षण मिळावे, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले असून आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी विविध महामंडळांवरील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाव्या, अशी मागणी ही आठवले यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेतील एक जागा, प्रत्येक जिल्ह्यात महामंडळाचे किमान एक सदस्यत्व आणि काही महामंडळांवर अध्यक्ष पद देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची लवकरात लवकर पूर्तता केली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपल्या पक्षाची अजूनही अपेक्षा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही निवडणूक लढण्याचा आग्रह सोडावा व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांना तशा सूचना द्याव्या, असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले. जर निवडणूक झालीच तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. नेत्यांनी काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने अशा भोंदू बाबांच्या नादी लागू नये, असे आवाहन त्यांनी केले. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार विशेष तपास पथकाकडून काटेकोर चौकशी केली जात असून संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होईल आणि दोषींना कठोरात कठोर शासन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, मोहन जगताप, जयदेव रंधवे, संदीप धाडोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकटयांनी प्रयत्न केले.  

सर्व महत्त्वाच्या बैठकांना उपमहापौरांना आमंत्रित केले जावे

भाजपा कडून महापालिका निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला मोठ्या मनाने उपमहापौरपद मिळाले आहे. त्यानंतर उपमहापौरांना योग्य सन्मान मिळत नसल्याची चर्चा आहे. ही चर्चा अयोग्य आहे. मात्र, रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घ्यावे. सर्व महत्त्वाच्या बैठकांना उपमहापौरांना आमंत्रित केले जावे. वेळ पडली तर यासाठी ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ही चर्चा करू, असे आठवले यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, त्याला आमचा पाठिंबा:शरद पवार

मुंबई-पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना साधताना शरद पवार म्हणाले, माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मोलाची मदत केली. आता विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमचे पूर्ण सहकार्य राहील.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील. कोणताही निर्णय सामूहिक पद्धतीने घेतला जाईल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.शरद पवार यांच्या विधानामुळे ही एकमेव जागा आता ‘ठाकरे गटा’च्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. पुढील महिन्यात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने, ते स्वतः मैदानात उतरणार की एखाद्या निष्ठावान सहकाऱ्याला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना खंबीर पाठिंबा दिला होता. आता या पाठिंब्याची शरद पवार ‘परतफेड’ करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. “विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल,” असा शब्द शरद पवार यांनी दिला आहे. या निर्णयामुळे विधानपरिषदेची महाविकास आघाडीची एकमेव जागा आता ‘ठाकरे गटा’च्या वाट्याला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला ८ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळण्याची शक्यता आहे. या एका जागेसाठी आघाडीत रस्सीखेच सुरू होती, मात्र शरद पवारांच्या भूमिकेमुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. या एका जागेवरून आघाडीत ओढाताण सुरू असतानाच शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.

विधान परिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. यामध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर, शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे.

दमानियांना ‘सीडीआर’ पुरवतंय कोण?:अशोक खरातच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? सुषमा अंधारेंचा सवाल

मुंबई-नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठे ‘राजकीय युद्ध’ सुरू झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (CDR) बाहेर काढल्याने खळबळ उडाली असली, तरी “विरोधकांना न मिळणारी गोपनीय माहिती दमानियांपर्यंत पोहोचतेच कशी? आणि या यादीत भाजपच्या एकाही नेत्याचे नाव का नाही?” असा टोकदार सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. शनिवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार आणि तपास यंत्रणांना धारेवर धरले.

सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. अंजली दमानियांनी खरातचे सीडीआर रेकॉर्ड बाहेर काढले ही चांगली गोष्ट आहे. पण ही गुप्त माहिती त्यांना पुरवतंय कोण? असा सवाल अंधारे यांनी केला. दमानिया म्हणतात की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खरातला १७ कॉल केले होते. त्यांचा रोख एकनाथ शिंदेंच्या दिशेने आहे. मात्र, ज्यांनी खरातच्या ‘इशान्येश्वर’ मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आणि १ कोटींचा निधी मंजूर केला, त्यांच्या कॉलचा रेकॉर्ड का समोर आला नाही? या यादीत भाजपच्या एकाही नेत्याचे नाव नसणे ही मोठी ‘गडबड’ वाटते,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

अशोक खरातच्या संपत्तीची आणि त्याच्या संपर्कातील लोकांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या एसआयटीकडून (SIT) अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर का आली नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आश्वासन दिले होते, मग अद्याप गमे, आवारे आणि पोफळे यांना ताब्यात का घेण्यात आले नाही? एसआरए खात्यातील अधिकारी भांडे तिथे काय करत होते? सरकारला हे प्रकरण तडीला न्यायचे आहे की फक्त काही लोकांना राजकीयदृष्ट्या ‘डॅमेज’ करायचे आहे?” असा घणाघात अंधारे यांनी केला

हडपसरमध्ये स्कूल बस धडकली विजेच्या खांबाला -२५ जखमी

पुणे- हडपसर येथील काळेपडळ परिसरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. विजेच्या खांबाला धडकल्याने झालेल्या या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अमोल विनायक बोराटे (रा. महादेव मंदिराजवळ, काळेबोराटेनगर, हडपसर) या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसकर्मचारी नंदकुमार जावळे यांनी काळेपडळ पोलिसठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालक हडपसरमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जात होता. काळेपडळ परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. या धडकेत बसमधील 25 ते 30 विद्यार्थ्यांना दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भरधाव वेगाने बस चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बसच्या धडकेने विजेचा खांब पूर्णपणे वाकला होता. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात बालविवाह:जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे आक्रमक -पोलिसात गुन्हा दाखल

पुणे- बिबवेवाडी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. बालविकास प्रकल्प कार्यालयातील मुख्यसेविका स्वाती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाइल्ड हेल्पलाइन 1098 कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या घटनेचा उलगडा झाला.

सुपरवायझर मोनिका जाधव आणि संबंधित पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता मुलीचा विवाह झाल्याचे आढळून आले. त्यानंतर मुलीचे वय निश्चित करण्यासाठी शाळेचा दाखला तपासण्यात आला असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांनी जाणीवपूर्वक बालविवाह घडवून आणल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदवला.

या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम 9, 10 आणि 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांची भूमिका तपासण्यास सुरुवात केली असून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल माने करत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटना आढळल्यास नागरिकांनी तत्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक अली अख्तर अन्सार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले

पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू; इंदोर गावातील एकाच कुटुंबावर काळाचा घाला

नाशिक- जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अत्यंत धक्कादायक अपघात घडला आहे. पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली. संबंधित कार थेट विहिरीत पडल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या दुर्घटनेत मृतांची नावे अशी आहेत: सुनील दत्तात्रय दरगोडे (32), रेशमा सुनील दरगोडे (27), आशा अनिल दरगोडे (32), गुणवती सुनील दरगोडे (11), श्रेयश अनिल दरगोडे (11), श्रावणी अनिल दरगोडे (11), सृष्टी अनिल दरगोडे (14), समृद्धी राजेंद्र दरगोडे (7) आणि श्रद्धा अनिल दरगोडे (13). सर्वजण इंदोरे, ता. दिंडोरी येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर गावातील सुनील दत्तू दरगोडे यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमावरून परतत होते. याच दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, कार थेट पाण्यात बुडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात लहान मुलांसह महिलांचाही समावेश असल्याने दुःख व्यक्त केले जात आहे. मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. तसेच, एकाच कुटुंबातील पाच जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख राखी सुनील दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, सुनील दत्तू दरगोडे, उषा अनिल दरगोडे आणि त्यांच्या चार नातेवाईक अशी झाली आहे. हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोर गावचे रहिवासी होते.

दरम्यान, अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांसह प्रशासनानेही मदतकार्य हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत क्रेनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. मात्र, तोपर्यंत कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अंधारामुळे आणि विहिरीत पाणी असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले. संबंधित कार ही मारुती सुझुकी अर्टिगा (MH15-JS-1053) असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, विहीर मालकाच्या नातेवाईकांनीही आपली बाजू मांडली. ॲड. विक्रम राजे यांनी सांगितले की, ही विहीर 1972 पासून अस्तित्वात असून दुष्काळाच्या काळात गावासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत ठरली होती. विहिरीवर पूर्वी जाळी आणि अँगल बसवण्यात आले होते, मात्र ते कोणीतरी काढून नेल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या रस्त्यावर संरक्षणासाठी जाळी बसवण्याची मागणी त्यांनीही नगरपंचायतीकडे केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी एक कोटींची तरतूद

पुणेकरांच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न : महापौर मंजुषा नागपुरे

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महामाता रमाई यांनी केवळ एका समाजासाठी कार्य केले नाही तर सर्व मानव जातीसाठी कार्य केले. प्रत्येकाचे आयुष्य प्रकाशमान होईल यादृष्टीने प्रयत्न केले. पुण्यातील सर्व जनेताचा विकास व्हावा असा आमचाही सामूहिक प्रयत्न असेल, अशी ग्वाही महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिला.स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, स्मारकाच्या विकासासाठी निधी देण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कर्तव्याच्या भावनेतूनच कार्य करत राहणार आहे.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचा आज (दि. ३) नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी महापौर नागपुरे बोलत होत्या. सत्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते.

कर्तव्याच्या भावनेतून महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर केल्याचे सांगून महापौर मंजुषा नागपुरे पुढे म्हणाल्या, सामाजिक कार्य करताना कौतुक स्वीकारणे योग्य वाटत नाही. समाजहितासाठी कार्य करत रहावे याच भावनेने आमचे प्रयत्न आहेत.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, लोकशाहीच्या विकासासाठी संवाद महत्त्वाचा असतो, त्याच भूमिकेतून महापौर, उपमहापौर वाटचाल करीत आहेत याचा मनस्वी आनंद आहे. त्यांच्या कारकिर्दीतील विकासाचे पर्व महत्त्वाचे ठरणार आहे.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या उपक्रमांची माहिती ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार लता राजगुरू यांनी मानले.

रा.स्व. संघात व्यक्तीला नाही तर विचारांना महत्त्व

सकल हिंदू समाज मानाजी नगर आयोजित विराट हिंदू संमेलन
पुणे : भीती वाटावे असे वातावरण देशात असताना २०१४ साली स्वातंत्र्याची कल्पना देशात आली. हिंदूंची दैन्यवस्था करण्याचे काम हिंदूंनीच केले आहे. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू समाजाचे संघटन करण्याचे ठरवले.घराणे शाही मोडून काढण्याचे काम संघाने केले आहे. कर्तृत्ववान कार्यकर्ते संघात निर्माण झाले आणि ते संघाने समाजासाठी दिले. फक्त देशभक्त या देशाचे प्रश्न सोडवू शकतील आणि देशभक्त फक्त संघातच घडू शकतो. संघात व्यक्तीला नाही तर विचारांना महत्त्व आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारणी सदस्य हेमंत हरहरे यांनी व्यक्त केले.

सकल हिंदू समाज मानाजी नगर नऱ्हे परिसर तर्फे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन प्रा. डॉ. सुधाकर राव जाधवर कॅम्पस येथे करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. राजेंद्र येप्रे महाराज,  सेवा भारती वैभव श्री आयाम प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या रेखाताई सोनुने, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष ऍड. शार्दूल जाधवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात भारुड सादरीकरण करण्यात आले.

राजेंद्र येप्रे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घ्यायचा असेल तर संस्थापक हेडगेवार यांना समजून घेणे गरजेचे आहे. या संमेलनाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा हिंदूंना संघटित करणे आहे. हिंदूंना संघटित करणे म्हणजे वाळूतून तेल काढण्यासारखे आहे. ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी ज्ञान विज्ञान आणि शांती आहे.

‘मुजरा शिवबाला’हे गाणे प्रदर्शित

मराठी संगीतविश्वात आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि ताकदीच्या आवाजाने वेगळी ओळख निर्माण करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र आता एका नव्या भूमिकेतून संगीतप्रेमींसमोर आली आहे. तिच्या आवाजातील गोडवा, अभिव्यक्तीची ताकद आणि प्रत्येक गाण्यातून जाणवणारी भावना यामुळे सावनीने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे आणि आता हाच सुरेल प्रवास पुढे नेत ती स्वतःचं म्युझिक लेबल घेऊन सज्ज झाली आहे. ‘सावनी रेकॉर्डझ्’ या नावाने तिने आपल्या म्युझिक लेबलची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात केली. मराठी संगीतविश्वातील दिग्गज गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते या म्युझिक लेबलचे लाँच करण्यात आले. यावेळी संगीत सृष्टीतील अवधूत गुप्ते, अभिजीत सावंत, कौशल इनामदार, अविनाश – विश्वजीत, नंदेश उमप, ऋषिकेश कामेरकर, मंगेश बोरगावकर, निहार शेंबेकर यांच्यासह लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे ही उपस्थित होत्या. विशेष म्हणजे लेबल अंतर्गत तिचं पहिलं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत सावनी रवींद्रने ‘मुजरा शिवबाला’ हे पहिले गाणे सादर केले आहे. वैभव देशमुख यांच्या ओजस्वी शब्दांना विजय नारायण गवंडे यांचे दमदार संगीत लाभले असून सावनीच्या आवाजाने या गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे. या गाण्यात सावनी रवींद्रने गायनासह लावणीही सादर केली आहे. हे गाणे लावण्यवतींनाही खूप भावले व या निमित्ताने सर्व लावण्यवतींचा सन्मान करण्यात आला.

आजपर्यंत सावनीने संगीतामध्ये सातत्याने निरनिराळे प्रयोग केले आहेत. ‘सावनी ओरिजिनल्स’ या तिच्या यूट्यूबवरील सिरीजअंतर्गत तिने विविध भाषांमध्येही गायन केले आहे. चित्रपटांच्या गाण्यांबरोबरच ती तिच्या संगीतिक प्रयोगांसाठीही ओळखली जाते.

या नव्या उपक्रमाबद्दल सावनी म्हणते, ”सर्व अडचणींवर मात करत कुटुंब आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आहे. संगीत हेच माझं बळ आहे आणि त्याच बळावर स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ‘सावनी रेकॉर्डझ्’ हे केवळ म्युझिक लेबल नसून ते माझं स्वप्न आहे. एक असं व्यासपीठ जिथे दर्जेदार, अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारे संगीत साकारेल. जिथे पोहोचण्याचा विचारही अनेकांसाठी धाडसी वाटतो, त्या वाटेवर चालण्याची हिंमत मी केली आहे. कलेच्या प्रेमापोटी सावनी रेकॉर्ड ही मोठी पायरी मी चढते आहे. या निमित्ताने मी सांगू इच्छिते की माझी गाणी अर्थातच या लेबलवर प्रदर्शित होतील त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित गायकांची व नवीन काही करू पाहाणाऱ्यांची गाणी प्रभावीपणे पोहोचवता येतील. पुढच्या काळात नव्या कलाकारांना संधी देत, संगीताच्या माध्यमातून काहीतरी वेगळं आणि अभिमानास्पद घडवण्याचा माझा प्रयत्न असेल.”

सुरेश वाडकर म्हणतात, “सावनीने तिच्या ‘मुजरा शिवबाला’ या गाण्यातून खरंच आपल्याला जुन्या काळात नेलं. पूर्वी ज्या ताकदीने आणि ठसक्यात लावण्या सादर केल्या जायच्या, तोच अनुभव या गाण्यातून मिळतो. सावनीने लावणीची परंपरा अत्यंत सुंदरपणे जपली आहे. गाण्याची चाल, शब्द आणि एकूणच सादरीकरण खूपच प्रभावी आहे. विशेष म्हणजे तिने स्वतः गायन करतानाच या गाण्यात उत्कृष्ट परफॉर्मन्सही दिला आहे, त्यामुळे स्क्रीनवर तिचं काम खूप सहज आणि उठून दिसतं. सावनीला संगीताचा उत्तम वारसा लाभला आहे. तिच्या या नव्या म्युझिक लेबलसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो.”

‘सावनी रेकॉर्डझ्’चा लोगोही तितकाच अर्थपूर्ण आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या ओळखीचं प्रतीक असलेल्या ‘चंद्रकोर’ आणि व्हिनाइल रेकॉर्ड डिस्क यांचा सुंदर संगम या लोगोमध्ये पाहायला मिळतो. हा लोगो केवळ डिझाइन नसून जिंकण्याची वृत्ती, संगीताची परंपरा आणि भविष्यकालीन दर्जेदार कामाची हमी दर्शवतो. मराठी स्त्री गायिकांमध्ये स्वतःचे म्युझिक लेबल सुरू करून त्याअंतर्गत गाणी प्रदर्शित करण्याचं धाडस फार कमी जणी करताना दिसतात

अशोक खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांवर कारवाई करा:लेखिका अरुणा सबाने यांची CM देवेंद्र फडणवीसांकडे पत्र लिहून मागणी

मुंबई-नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात आता लेखिका अरुणा सबाने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महिलांनाही दोषी धरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात अशोक खरात नावाचा व्यक्ती स्वतःला ज्योतिषी म्हणवत महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे. गोड बोलून, कधी धमकी देऊन तो महिलांना आपल्या कार्यालयात बोलावत असे. तेथे त्यांना पेढा आणि कडवट चवीचे पेय देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. एवढंच नव्हे तर या सर्व घटनांचे चित्रीकरणही केल्याचे तपासात समोर आले आहे.

एका महिलेच्या तक्रारीनंतर 17 मार्च रोजी पोलिसांनी खरातला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून, ज्या महिला स्वेच्छेने खरातकडे गेल्या त्यांना ‘पीडित’ न म्हणता दोषी मानून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

डॉ. अरुणा सबाने यांनी पत्रात काय लिहिलं?
भोंदूबाबा खरात ने जो पराक्रम गाजवला तो आता बऱ्यापैकी जगासमोर आलेला आहे. अद्यापही जगासमोर न आलेला इतिहास नक्कीच खूप मोठा असेल. तो पोलिसांच्या कस्टडीत आहे. त्याचा कसून तपास सुरू आहे, अशा बातम्या आपण वाचल्या. त्याच्या नादी लागलेल्या स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सुशिक्षित, श्रीमंत वर्गातल्या, राजकारणातल्या, प्रशासनातल्या, गर्भ श्रीमंत पुरुषांच्या बायका अशा सगळ्या कॅटेगरीतल्या आहेत. अनेक पुरुष त्याच्या ध्यानी लागलेले आहेत. यांना कोणी गळ घालून तिथे नेले किंवा यांच्यावर कोणी बळजबरी केली अशा अवस्थेत त्या कोणत्याच व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये दिसत नाहीत. याचा अर्थ या स्त्रिया स्वेच्छेने खरातपर्यंत पोचल्या. किंवा खरातने त्यांना भुरळ पाडली आणि त्या तिथपर्यंत पोहोचल्या. सुशिक्षित स्त्रिया सुद्धा या अशा कर्मकांडाला कशा काय भुलू शकतात हे आजच्या तांत्रिक युगामधलं फार मोठं आश्चर्य आहे. मंत्र, जप याच्यापलीकडे जाऊन त्याचे मूत्र पिऊन त्यांच्या आयुष्यात काही बदल घडतो असं या स्त्रियांना वाटणं हे जगातलं नववं आश्चर्य आहे. मुल हे केवळ स्त्री आणि पुरुष संबंधातूनच निर्माण होऊ शकतं .कुठल्याही आशीर्वादातून, राखेतून, गंडे, धागेदोरे यातून होऊच शकत नाही इतकी साधी अक्कल या शिकलेल्या बायांना अजूनही का येत नाही याचे आश्चर्य वाटते. आणि भोंदू बाबा तुमच्याशी शरीर संबंध ठेवून तुम्हाला मूल देऊ इच्छित असेल तर हा प्रसाद नसून सरळ सरळ बलात्कार आहे हे या स्त्रियांच्या का लक्षात येत नाही?

योनीपूजा किंवा योनीला शूचिर्भूत करणे वगैरे हाही एक प्रकार वाचला. स्त्रीची योनी (Vagina) कुणीही शुद्ध वगैरे करू शकत नाही. तिला शुद्ध, स्वच्छ करणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. योनी शुद्धीकरण ही वैज्ञानिक नव्हे, धार्मिक संकल्पना आहे, हे माहिती नसण्याइतपत स्त्रिया मूर्ख असतील तर यांनाही कडक शिक्षा झालीच पाहिजे.

चाकणकरांना कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे
रूपाली चाकणकर सारखी बाई स्वतः त्या भोंदूच्या अधीन होतेच बरोबर इतरही स्त्रियांना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. ही बातमी उघड करणाऱ्या पत्रकाराला धमकावते पोलीस यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी स्वतःच्या महिला आयोग अध्यक्ष पदाचा वापर करते. अशा स्त्रीला तर जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवणे ही काही शिक्षा नाही. तिला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशा ज्या ज्या स्त्रिया आहेत; ज्या स्त्रिया या सर्व प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या आहेत यात काही शंका नाही. त्यामुळे खरातला तर फाशीची शिक्षा व्हावीच पण त्यासोबतच त्याच्या नादी लागून समाजामध्ये ही जी गैरसमजाची फार मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली आहे यांनाही कडक शासन व्हायलाच हवे. खरात काय किंवा चाकणकर काय ही एक प्रवृत्ती आहे. तिला वेळीच ठेचले पाहिजे.

स्त्रिया इतक्या मूर्ख कशा काय असू शकतात?
आजच्या काळातल्या स्त्रिया इतक्या मूर्ख कशा काय असू शकतात हे जगातले नववे आश्चर्य आहे. यांना अशा सर्व गोष्टींसाठी जर आपण जबाबदार धरले नाही तर ही वृत्ती वाढत जाणार आहे. या अंधश्रद्धांना कुठेतरी आळा घालणं गरजेचे आहे. या सगळ्या प्रकारात खूप घाणेरडे राजकारण आहे, याची मला जाणीव आहे. तरीही जे समाजाच्या समोर आले ते भयानक आहे. त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे केवळ खरात तर दोषी आहेच यात काहीही शंका नाही. त्याला तर फाशीचीच शिक्षा व्हायला हवी, आमची मागणी आहे. पण त्याच्या नादी लागणाऱ्या बायाही तेवढ्याच दोषी आहेत हे मी परत परत म्हणेन. म्हणून त्यांनाही कडक शासन व्हायलाच हवे. जेणेकरून यानंतर अशा भोंदू बाबांच्या आहारी स्त्रिया जाताना दहादा विचार करतील. हीही माझी मागणी आहे.

गरीब आणि मध्यमवर्गीयांना आरामदायी आणि उत्तम प्रवासाचा अनुभव देण्याला रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट, विक्रमी मालवाहतूक आणि विशेष गाड्यांच्या संचालनाबद्दल रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे परिवाराचे केले अभिनंदन

रेल्वे स्थानके ही भारतीय रेल्वेचा चेहरा आहेत;अधिकाऱ्यांनी समर्पित प्रयत्नांनी स्वच्छता सुनिश्चित करावी: अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2026

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांच्या अध्‍यक्षतेखाली आज नवी दिल्लीतील रेल भवन येथे देशभरातील रेल्वे अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक झाली.

गरीब आणि मध्यमवर्गीयांना चांगल्या प्रवासाचा अनुभव देणे, याला भारतीय रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना या उद्दिष्टासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. अश्विनी  वैष्णव यांनी गेल्या वर्षीच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल संपूर्ण रेल्वे परिवाराचे अभिनंदनही केले. रेल्वे अपघातांमध्ये झालेली ऐतिहासिक घट आणि विक्रमी मालवाहतुकीमुळे देशभरात भारतीय रेल्वेची प्रतिमा लक्षणीय  सुधारली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येने विशेष गाड्यांच्या प्रभावी संचालनाचेही त्यांनी कौतुक केले. या सेवेमुळे प्रवासाची वाढलेली मागणी पूर्ण करण्यास मदत झाली.

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी गाड्यांचे वेळेवर संचालन सुनिश्चित करण्याच्या बाबतीत विभागांच्या (झोन्सच्या) कामगिरीचेही कौतुक केले. त्यांनी वक्तशीरपणाचा उच्च स्तर राखणाऱ्या विभागांचे अभिनंदन केले आणि विशेषतः ज्या मार्गावर  परिचालनसंबंधी  आव्हाने होती, तरीही  85% पेक्षा जास्त वक्तशीरपणा सुनिश्चित करून आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे, त्यांचे कौतुक केले.

प्रवाशांच्या अनुभवाचे महत्त्व अधोरेखित करताना, केंद्रीय मंत्री म्हणाले की, रेल्वे स्थानके म्हणजे  जनतेसमोर असलेला  भारतीय रेल्वेचा चेहरा आहे आणि ती स्वच्छ तसेच  सुस्थितीत ठेवली पाहिजेत. त्यांनी अधिकाऱ्यांना सर्व स्थानकांवर स्वच्छता आणि सुधारित प्रवासी सुविधा सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करण्याचे आवाहन केले. गेल्या दशकात रेल्वे आधुनिकीकरणासाठी झालेल्या विक्रमी निधी वाटपाचा संदर्भ देवून , त्यांनी यावर जोर दिला की,रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी  आणि प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी निधीचा पुरेपूर वापर सुनिश्चित केला पाहिजे.

गर्दीच्या काळात, विशेषतः सणासुदीच्या वेळी, गर्दीचे नियोजन अशा प्रकारे केले जावे जेणेकरून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर पोहोचणे आणि रेल्वेगाडीमध्ये चढणे कोणत्याही अडचणीशिवाय सुलभ होईल,यावर वैष्णव यांनी भर दिला . प्रवासी सुविधा आणि सुलभता सुधारण्यासाठी वाटप केलेल्या निधीच्या वापराला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

विद्यमान  रेल्वे प्रकल्पांसाठी प्रलंबित जमीन संपादनाच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. ही प्रक्रिया वेगवान करण्याचे आणि आवश्यक असल्यास, तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी राज्य महसूल आणि वन विभागाच्या अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना  दिले.

रेल्वे रुळांजवळ राहणाऱ्या लोकांशी संबंधित संवेदनशील मुद्द्यावर बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या उपजीविकेवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये. अशा प्रकरणांचे निराकरण करताना राज्य सरकारांशी समन्वय साधून मानवी आणि संवेदनशील दृष्टिकोन अवलंबण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. हा अनेक शहरी भागांतील एक मोठा प्रश्न असून याचे वेळेवर आणि सहानुभूतीपूर्वक निराकरण करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

या बैठकीत रेल्वे अंडरपास बांधण्याबाबतच्या आधीच्या निर्णयाचाही आढावा घेण्यात आला असून जिथे शक्य असेल तिथे, रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी स्टेशनच्या आवारात आणि बाहेरही, फूट ओव्हरब्रिजऐवजी सोयीस्कर आणि सुलभ अंडरपासला प्राधान्य दिले जावे.  अंडरपास हे वापरकर्त्यांसाठी अधिक सोयीचे आहेत आणि लोकांकडून त्यांचा वापर होण्याची शक्यता जास्त आहे, असे त्यांनी नमूद केले. असे अंडरपास बांधण्यासाठी देशाच्या विविध भागात प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्याचेही निश्चित करण्यात आले. हे अंडरपास केवळ पादचाऱ्यांसाठीच नव्हे तर सायकल, स्कूटर आणि मोटारसायकलच्या वाहतुकीसाठी देखील सुलभ असतील; तसेच काही ठिकाणी मोठ्या संरचनेमुळे ट्रॅक्टर आणि इतर वाहनांची वर्दळही शक्य होईल. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांच्या गरजांनुसार त्यांची रचना केली जाईल.

अविरत प्रयत्न, कार्यक्षम नियोजन आणि प्रवासी-केंद्रित दृष्टिकोनामुळे भारतीय रेल्वे देशभरातील प्रवाशांसाठी सुरक्षा, दर्जेदार सेवा आणि एकूण प्रवासाचा अनुभव अधिक समृद्ध करत  राहील, याचा  वैष्णव यांनी पुनरुच्चार केला.

प्रजित नायर आज अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट), पदाचा पदभार स्वीकारला.

पुणे-

आज पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) या पदाचा पदभार प्रजित नायर यांनी स्वीकारला. ते २०१७ च्या बॅचचे भाप्रसे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, उप विभागीय अधिकारी, जव्हार (पालघर) तसेच जिल्हाधिकारी, गोंदिया या पदांवर कामकाज केलेले आहे. पुण्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून नवीन योजना राबविण्यात येतील असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

ड्रेनेज विभागातील हजारो कोटींच्या खर्चाची चौकशी करा:महापौरांकडे नैमित्तिक समिती स्थापनेची भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

पुणे- महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे तातडीने नैमित्तिक समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासक काळात ड्रेनेज विभागाचे वार्षिक बजेट सुमारे साडेसातशे कोटी रुपये होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांत तब्बल ३००० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, ‘जायका’ प्रकल्पासाठी या वर्षाअखेर ९०० कोटी रुपये खर्च झाले असून, चालू वर्षात इतर कामे कमी करून २८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच, राष्ट्रीय पूर नियंत्रण अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून २८० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी १२५ कोटी रुपये पूरप्रवण भागांसाठी खर्च करण्याचे निर्देश होते. मात्र, या निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांत ड्रेनेज विभागाने साधारण ४२ कोटी रुपये खर्च केल्याचेही निवेदनात नमूद आहे.

मोठ्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमून त्यांना मोबदला देण्यात आला, तसेच विविध कामांची बिले काढण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः, नव्याने समाविष्ट नऊ गावांमध्ये ड्रेनेज व्यवस्थेची दयनीय अवस्था असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात मुंबई महानगरपालिका कायदा कलम ३१ नुसार, महानगरपालिकेला विशेष विषयांच्या चौकशीसाठी नैमित्तिक समिती स्थापन करण्याचा अधिकार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या समितीत निवडून आलेले सदस्य तसेच विषयातील तज्ज्ञ अशा व्यक्तींना सहभागी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनाची मनमानी वाढली असून, हजारो कोटींच्या खर्चाची पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ड्रेनेज विभागासाठी स्वतंत्र नैमित्तिक समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची तपासणी करावी, अशी मागणी संबंधित पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद नवनियुक्त सदस्यांची बैठक

0

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार

पुणे: पुणे जिल्हा परिषदेतील भाजपा, शिवसेना (एकनाथजी शिंदे), शिवसेना (उबाठा गट) यांच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाली. पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले सर्वांचे ध्येय असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याबाबत चर्चा झाली.

या बैठकीला आ. राहुल कुल, आ. शरद सोनावणे, आ. बाबाजी काळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, प्रदीप कंद, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी आ. संजय जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व नवनियुक्त सदस्य उपस्थित होते.

फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे १०, शिवसेना (शिंदे गट) ४, शिवसेना (उबाठा गट) ६, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शप) १ सदस्य निवडून आले. ह्या सर्व सदस्यांची बैठक आज संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा झाली. तसेच, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा