पुणे, दि. 18: जिल्ह्यात “गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार” अभियानांतर्गत धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती देण्यासाठी जलसंधारण, जलसंपदा , लघु पाटबंधारे जि.प. विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी. याबाबतची अधिकाधिकची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सूचना दिल्या आहेत.
अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांनी त्यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना पाठविलेल्या पत्रानुसार, संबंधित धरणांमधील गाळ काढण्यासाठी अंदाजपत्रके तयार करून सविस्तर प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयास सादर करावे. तसेच जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची आवश्यक मान्यता घेण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जलसंपदा विभागाकडून आवश्यक परवानगी प्रक्रियेस काही कालावधी लागत असल्यास त्या कालावधीत जिल्ह्यातील अति शोषित, संकटग्रस्त,अर्ध संकटग्रस्त तसेच टँकरग्रस्त गावांमध्ये गाळ काढण्याचे, जलसंधारण व दुरुस्तीची अधिकाधिक कामांबाबत नियोजन करून ती प्राधान्याने घ्याव्यात.
यामध्ये विशेषतः भूजल पुनर्भरण क्षमता असलेल्या कामांना प्राधान्य देऊन जलसंधारण संरचनांची दुरुस्ती, गाळ उपसा व पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या कामांवर भर देण्यात येणार आहे. या अभियानामुळे पाणीटंचाई कमी होण्यास, भूजल पातळी वाढण्यास तसेच शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही श्री. डुडी म्हणाले

