पुणे-पाणी टंचाईच्या काळातही पुणे महानगरपालिकेच्या नियोजनातील त्रुटींची मालिका काही थांबायचे नाव घेत नाही. गोकुळनगर चौकात मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेल्याची घटना घडली असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला असून, जबाबदार अधिकारी आणि अभियंत्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा २ दिवसांत शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांत पुणे महापालिकेच्या कारभारातील ढिसाळपणा वारंवार समोर आला आहे:
- भर पावसात झाडांना टँकरने पाणी घालण्याचा प्रकार
- नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता पावसात खचणे
- आता गोकुळनगर चौकात जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी
“दिवसाआड पाणीपुरवठा करणारे प्रशासन पाण्याची अशी उधळपट्टी करत असेल, तर नागरिकांनी पाणी कसे वाचवायचे?” असा सवाल भानगिरे यांनी केला.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, “पुणे महापालिकेच्या बेजबाबदार आणि गलथान कारभाराचा हा आणखी एक पुरावा आहे. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पुणेकरांच्या डोक्यावर पाणी आणणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.”
“जलवाहिनींच्या देखभाल-दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सार्वजनिक पैशाची आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी होत आहे. हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
भानगिरे यांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत देत म्हटले, “या प्रकरणातील संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांवर तात्काळ कारवाई करा. कारवाई न झाल्यास शिवसेना पुणे शहराच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. पाण्याची नासाडी करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
.

