पुणे | प्रतिनिधी
नवले पुलाकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मध्यरात्रीनंतर अडवून चालकाला मारहाण करत ट्रक व रोकड हिसकावून पळालेल्या चौघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही वेळात पाठलाग करून अटक केली. या धाडसी कारवाईमुळे मोठा गुन्हा उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (४ जुलै) पहाटे सुमारे २.३० वाजता नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या लेनवर, राजयोग टोयोटा शोरूमसमोर ही घटना घडली. फिर्यादी ट्रक (एमएच-१२ डब्ल्यूएक्स-९९३२) घेऊन जात असताना आरोपींनी वाहन आडवे घालून ट्रक थांबवला. त्यानंतर चालकाच्या बाजूची काच फोडून त्याला ट्रकमधून खाली ओढले व लाकडी बांबूने मारहाण केली. त्याच्या खिशातील १,५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेत ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
घटनेनंतर फिर्यादीने तातडीने डायल ११२ वर संपर्क साधला. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करून पाठलाग केला आणि काही अंतरावर ट्रकसह चारही आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, दागिने चोरी, रोकड चोरी, लूटमार आणि अपघाताचे गुन्हेही दाखल झाले आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोपानकाका नगर येथील फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे ६९ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
पर्वती परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावण्याचा प्रकार, तर पंचमी हॉटेलजवळ पीएमपीएमएल बसमध्ये चढताना एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील सुमारे १.१० लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी लंपास केल्या. कोथरूडमध्ये घरातून सुमारे दोन लाख रुपयांच्या हिऱ्याच्या अंगठ्या चोरीला गेल्याची नोंद झाली आहे.
याशिवाय, येरवडा परिसरात कारची काच फोडून १.५० लाख रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. हडपसरमध्ये भरधाव कारच्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला असून अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. संबंधित सर्व प्रकरणांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे

